
रोप अवस्था
- पुनर्लागवडीयोग्य (३५ ते ४० दिवसांची) भात (Rice) रोपांची लागवडीची (Rice Cultivation) कामे सुरु करावीत. पुनर्लागवडीपूर्वी चिखलणी करून घ्यावी. चिखलणी वेळी युरिया ८७० ग्रॅम, सिंगल सुपर फॉस्फेट ३१३० ग्रॅम आणि म्युरेट ऑफ पोटॅश ८४० ग्रॅम प्रमाणे प्रति गुंठा क्षेत्रास मात्रा द्यावी.
- १५:१५:१५ हे खत द्यावयाचे असल्यास ३ किलो प्रति गुंठे मात्रा द्यावी.
- पुनर्लागवडीसाठी भाताची १२ ते १५ सेंमी उंचीची ५ ते ६ पाने फुटलेली रोपे वापरावीत. पुनर्लागवड २० बाय १५ सेंमी अंतरावर करावी. एका चुडामध्ये २ ते ३ रोपे लावावीत. पहिल्या ३० दिवसांपर्यंत पाण्याची पातळी २.५ ते ५ सेंमीपर्यंत नियंत्रित करावी.
नारळ ः (Coconut)
- फळधारणा
- कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता असल्याने ३ ते ४ वर्षे वयाच्या माडांना ३ ते ४ दिवसांच्या अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करावी. पूर्ण वाढलेल्या माडांना जमिनीच्या मगदुराप्रमाणे ५ ते ६ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
- नारळाच्या मोठ्या माडांना ठिबक सिंचनाद्वारे पाणी देताना प्रति दिन ४० लिटर पाणी द्यावे.
- माडाच्या आळ्यामध्ये ओलावा टिकविण्यासाठी वाळलेल्या गवताचे १५ सेंमी जाडीचे आच्छादन किंवा नारळाची सोंडणे पुरावेत. तसेच झावळ्यांचे आच्छादन करावे.
- नवीन लागवड केलेल्या रोपांना वरून सावली करावी.
- नारळाच्या पाच वर्षावरील प्रति माडास निंबोळी पेंड ५ किलो, युरिया ७५० ग्रॅम आणि म्युरेट ऑफ पोटॅश ६६७ ग्रॅम प्रमाणे रासायनिक खताची तिसरी मात्रा बांगडी पद्धतीने द्यावी. ही खताची मात्रा ५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या लागवडीस देताना, पहिल्या वर्षी १/५ पट, दुसऱ्या वर्षी २/५ पट, तिसऱ्या वर्षी ३/५ पट आणि चौथ्या वर्षी ४/५ पट द्यावी. झिंक, बोरॉन, मॉलिब्डेनम व कॉपर ही अति सूक्ष्म अन्नद्रव्ये २०० ग्रॅम प्रति माड याप्रमाणे वर्षातून एकदा शक्यतो दुसऱ्या किंवा तिसऱ्या खताच्या मात्रेसोबत देण्यात यावी. खतांच्या मात्रा दिल्यानंतर लगेच पाणी द्यावे.
भेंडी ः
- पूर्व मशागत आणि पेरणी
- उन्हाळी हंगामात भेंडी लागवड करण्यासाठी जमिनीची नांगरणी करून ढेकळे फोडून घ्यावीत. चांगले कुजलेले शेणखत प्रति गुंठा १५० किलो प्रमाणे जमिनीत मिसळून घ्यावे.
- लागवड ४५ बाय १५ सेंमी अंतरावर करावी. पेरणीच्या वेळी युरिया ७०० ग्रॅम, सिंगल सुपर फॉस्फेट ३ किलो आणि म्युरेट ऑफ पोटॅश ४०० ग्रॅम प्रति एकर या प्रमाणे खताची मात्रा द्यावी. पेरणीनंतर हलके पाणी द्यावे.
कलिंगड ः
- फळधारणा ते पक्वता
- तापमानात वाढ संभवत असल्याने कलिंगडाच्या फळांचे सूर्यप्रकाशापासून बचाव करण्यासाठी फळे भाताच्या पेंढ्याने किंवा गवताने झाकून घ्यावीत.
- फळधारणा अवस्थेत असलेल्या पिकाला २ ते ३ दिवसांच्या अंतराने नियमित पाणी द्यावे. फळे काढणीपूर्वी आठवडाभर अगोदर पिकास पाणी देणे बंद करावे.
- तयार कलिंगड फळांवर टिचकी मारल्यास टणटण असा आवाज येतो. तसेच तयार फळांचा जमिनीलगतचा रंग पिवळसर आणि देठाजवळील लतातंतू सुकतात. ही कलिंगड फळ पक्वतेची लक्षणे असून अशा फळांची काढणी करावी.
(०२३५८) २८२३८७/ ८१४९४६७४०१ डॉ. विजय मोरे, ९४२२३७४००१ (ग्रामीण कृषी मौसम सेवा, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली.)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.