
शेतकरी ः राधेश्याम खुडे
गाव ः बोरगव्हाण,
ता. पाथरी, जि. परभणी
एकूण क्षेत्र ः २.५ एकर
तुती लागवड ः १.५ एकर
परभणी जिल्ह्यातील बोरगव्हाण (ता. पाथरी) येथील राधेश्याम खुडे पारंपरिक शेतीला रेशीमशेतीची (Silk Farming) जोड दिली आहे. त्यांची एकूण अडीच एकर शेती आहे. अभियांत्रिकीमध्ये शिक्षण घेतल्यानंतर काही काळ पुणे येथे खासगी कंपनीत नोकरी केली.
मात्र नोकरीत मन न रमल्यामुळे गावी येऊन शेती करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. अल्पभूधारक असल्याने शेती क्षेत्र कमी. पारंपरिक पीक पद्धतीतून उत्पादन (Agriculture Production) आणि उत्पन्नाची खात्री वाटत नव्हती.
गावातील काही शेतकरी पूर्वीपासून रेशीम शेती (Sericulture) करत होते. त्यांच्यापासून प्रेरणा घेत त्यांनी देखील रेशीम शेती करण्याचा निर्णय घेतला.
रेशीम शेतीस सुरुवात
२०१३ मध्ये दीड एकर क्षेत्रावर तुतीच्या ‘व्ही १’ या वाणाची लागवड केली. त्याशेजारीच शेतामध्ये २६ बाय ६० फूट आकाराचे रेशीम कीटक संगोपनगृह उभारले आहे. त्यात गेल्या नऊ वर्षांपासून बायव्होल्टाइन जातीच्या अंडीपुंजांपासून कोषनिर्मिती करत आहेत.
प्रति बॅच साधारण २८० ते ३०० अंडीपुंजांपासून २५० ते २७० किलो कोष उत्पादन मिळते. त्यातून दरमहा पगाराप्रमाणे उत्पन्न मिळू लागल्याने आत्मविश्वास वाढला.
आता तुतीच्या क्षेत्रामध्ये अडीच एकरांपर्यंत विस्तार केला. परंतु काही कारणास्तव एक एकरावरील तुती लागवड काढून टाकावी लागली. सध्या दीड एकर क्षेत्रावर तुती लागवड आहे.
आजवरचे अनुभवातून विविध प्रयोग करत व्यवस्थापनात आवश्यक सुधारणा करून दर्जेदार रेशीम कोष उत्पादनात सातत्य राखले आहे. प्रत्येक बॅचपासून दर्जेदार रेशीम कोषाचे उत्पादन ते घेतात.
मागील दोन वर्षांपूर्वी रेशीम कीटकांच्या संगोपनासाठी २२ बाय ६६ फूट आकाराच्या आणखी एका संगोपनगृहाची उभारणी केली आहे. आता रेशीम कीटकांसाठी दोन निवारे उपलब्ध झाल्याने सलग बॅच घेणे शक्य झाले आहे. तसेच रोगांचा प्रादुर्भावदेखील कमी झाला आहे.
महिनाभरातील कामकाज
जानेवारी महिन्याच्या शेवटी तुती बागेस सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या दोन फवारणी केल्या आहेत. त्यामुळे तुती पानांचा दर्जा सुधारला आहे. पानांचा आकार आणि जाडी वाढली आहे.
२ फेब्रुवारीला २७५ बाल्य कीटकांची नवीन बॅच सुरू केली आहे. दररोज सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी कीटकांना दर्जेदार तुती पाला खाद्य म्हणून देत आहे.
मागील काही दिवसांत कमाल अन् किमान तापमानात वाढ झाली आहे. रेशीम कीटकांच्या संगोपनासाठी संगोपनगृहात योग्य तापमान राखणे अत्यंत आवश्यक असते. योग्य आर्द्रता आणि तापमान राखण्यासाठी निवाऱ्याच्या बाजूने लावलेल्या गोणपाटावर मिनी स्प्रिंकलरद्वारे पाणी सोडले जाते.
आगामी नियोजन
साधारण १ मार्चपर्यंत कोष काढणीस येतील. मजुरांच्या मदतीने कोष काढणी पूर्ण केली जाईल.
सध्या राज्यातील रेशीम कोष मार्केटच्या तुलनेत कर्नाटकातील रामनगरम येथे चांगले दर मिळत आहेत. त्यामुळे पुन्हा रामनगरम येथील मार्केटमध्ये कोष विक्रीसाठी घेऊन जाण्याचे नियोजन आहे.
बॅच पूर्ण गेल्यानंतर संगोपनगृहाची स्वच्छता केली जाईल.
तुती बागेची छाटणी, मशागत, खतांची मात्रा देऊन वखरणी केली जाईल.
तुती बागेस ठिबकद्वारे आवश्यकतेनुसार पाणी दिले जाईल.
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ३०० अंडीपुंजाची घेण्याचे बॅच प्रस्तावित आहे.
व्यवस्थापनातील बाबी
थंडी, उन्ह, वारे यापासून संरक्षणासाठी निवाऱ्याभोवती गोणपाट (तागाचे पोते) लावले जाते. त्यामुळे रेशीम कीटक संगोपनासाठी आवश्यक २२ ते २५ अंश तापमान राखता येते.
वातावरण बदलानुसार संगोपनगृहामध्ये आवश्यक बदल केले जातात.
रेशीम कीटकांच्या वाढीसाठी दर्जेदार तुती पाला आवश्यक असतो. त्यासाठी बागेची नियमित नांगरणी करून सिंगल सुपर फॉस्फेट, पोटॅश, अमोनिअम सल्फेट, मॅग्नेशिअम सल्फेट आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये या खतांच्या मात्रा दिली.
सुरुवातीच्या काळात बंगलोर जवळील रामनगर येथील बाजारपेठेमध्ये रेशीम कोषांची विक्री केली जात असे. मात्र कोरोना काळात लावलेल्या लॉकडाउनमध्ये रेल्वे बंद असल्यामुळे कोष विक्रीत अडचणी आल्या. तेव्हापासून पूर्णा (जि. परभणी) येथील स्थानिक बाजारपेठेत कोष विक्री करण्यास सुरुवात केली.
- राधेश्याम खुडे, ८८८८९३१७९३ (शब्दांकन ः माणिक रासवे)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.