
शेतकरी : शुभम सुनील रिठे
गाव : पालवाडी, ता. तिवसा, जि. अमरावती
एकूण शेती : ५० एकर
संत्रा लागवड : २४ एकर (३१५० झाडे)
अमरावती जिल्ह्यातील पालवाडी (ता.तिवसा) येथील शुभम रिठे यांचे चाळीस एकर बागायत क्षेत्र आहेत. शुभम व त्याचे वडील सुनील रिठे हे दोघे शेतीचे संपूर्ण व्यवस्थापन करतात. बागेमध्ये संत्र्याची ३१५० झाडे आहेत.
त्यातील १२०० झाडे ७ वर्षाची, १४०० झाडे १५ ते १८ वर्षाची, तर ५५० झाडे ही ४ वर्षे वयाची आहेत. संपूर्ण लागवड दोन झाडांत १६ बाय १६ फूट अंतरावर पारंपारिक पद्धतीने केली आहे. बागेत प्रामुख्याने आंबिया बहर धरला जातो. त्यासाठी डिसेंबर महिन्यापासूनच नियोजन सुरु केले जाते.
ताण व्यवस्थापन
- बाग फुटण्यासाठी झाडांना योग्य ताण बसणे गरजेचे असते. साधारण डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बाग ताणावर सोडली जाते.
- ताण कालावधीत झाडांवरील अतिरिक्त फांद्याची छाटणी, विरळणी इत्यादी कामे केली जातात. तसेच निंबोळी ढेप १ किलो, सेंद्रीय खते २ किलो प्रतिझाड प्रमाणे दिली जातात. उपलब्धतेनुसार शेणखताचा २ ते ३ वर्षातून एक वेळ वापर केला जातो. रासायनिक खतांच्या मात्रा दिल्या जात नाहीत.
- साधारणपणे १ महिना बाग ताणावर सोडली जाते.
- जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ठिबकद्वारे ८ तास सिंचन करत बागेचा ताण तोडला जातो. त्यानंतर झाडाची पाण्याची गरज आणि जमिनीतील ओलावा यांचा अंदाज घेऊन सिंचन केले जाते. सोबतच जीवामृत प्रति झाड १० लिटर प्रमाणे दिले जाते.
सिंचन व्यवस्थापन
संपूर्ण बागेत ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केला आहे. संत्रा ही झाडे पाण्याला अत्यंत संवेदनशील म्हणून ओळखली जातात. त्यामुळे बागेत पाण्याचा गरजेनुसार वापर करण्यावर भर दिला जातो.
बागेत उताराच्या दिशेने चर काढले आहेत. जेणेकरून बागेत पाणी साचून राहणार नाही. तसेच जास्त पाऊस झाल्यास बागेतील पाणी लवकर बागेबाहेर जाईल.
बागेत झाडांजवळ पाणी साचून राहिल्यास डिंक्या, मूळकूज यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यासाठी बागेत पाण्याचा प्रमाणशीर वापर करण्यावर भर दिला जातो. योग्य सिंचन व्यवस्थापन केल्यास बाग निरोगी राखणे शक्य झाल्याचे शुभम रिठे सांगतात.
कीड-रोग व्यवस्थापन
- जानेवारी-फेब्रुवारी मध्ये झाडाला नवती फुटण्यास सुरवात होते. झाडावर भरपूर पाने येतात. त्यामुळे विविध कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. प्रामुख्याने सिट्रस सायला, काळा मावा, नागअळी इत्यादींचा प्रादुर्भाव दिसून येतो.
- प्रादुर्भाव टाळण्यासाठी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात रासायनिक कीटकनाशकांची शिफारशीप्रमाणे फवारणी घेतली जाते.
- फुलधारणा, फळधारणा झाल्यानंतर कीड-रोगांसाठी झाडांचे सातत्याने निरिक्षण केले जाते. आवश्यकतेनुसार प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रासायनिक फवारणी घेतली जाते.
- मार्च महिन्यात फळांची गळ दिसून येते. फळगळ टाळण्यासाठी शिफारशीत घटकांची फवारणी घेतली जाते. तसेच १०ः२६ः२६ प्रति झाड १ किलो प्रमाणे रासायनिक खतांची मात्रा दिली जाते.
आगामी नियोजन
- एप्रिल महिन्यात तापमानात वाढ होते. वाढत्या तापमानाचा झाडांवर परिणाम होतो. यासाठी योग्य काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते.
- फेब्रुवारी महिन्यात बागेत वाढलेले तण रोटाव्हेटरच्या साह्याने जागेवरच दाबले जाते. त्यानंतर वाढलेले तण काढले जात नाही. त्याचा आच्छादन म्हणून वापर केला जातो.
- झाडांची पाण्याची गरज आणि जमिनीतील ओलावा यांचा अंदाज घेऊन सिंचन केले जाईल.
- ठिबकद्वारे अमोनिअम नायट्रेट ३०० ग्रॅम प्रति झाड प्रमाणे दिले जाईल. तसेच जीवामृत दिले जाईल.
शुभम रिठे, ९७६४३२५८३३, (शब्दांकन : विनोद इंगोले)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.