Silk Farming : शेतकरी नियोजन : रेशीम शेती

औरंगाबाद जिल्ह्यातील रजापूर (ता.पैठण) येथील किशोर मापारी यांच्याकडे ६ एकर शेती आहे. त्यात २ एकरांवर तुती लागवड, तर उर्वरित संपूर्ण क्षेत्रामध्ये शेवगा लागवड आहे.
Silk Farming
Silk FarmingAgrowon

शेतकरी ः किशोर हरिभाऊ मापारी.

गाव ः रजापूर ता. पैठण,

जि. औरंगाबाद

एकूण शेती ः ६ एकर

तुती लागवड ः २ एकर

औरंगाबाद जिल्ह्यातील रजापूर (ता.पैठण) येथील किशोर मापारी यांच्याकडे ६ एकर शेती आहे. त्यात २ एकरांवर तुती लागवड (Mulberry Cultivation), तर उर्वरित संपूर्ण क्षेत्रामध्ये शेवगा लागवड (Drumstick Cultivation) आहे. रेशीम शेतीस (Silk Farming) सुरुवात करण्यापूर्वी मोसंबी, कपाशी, पपई, शेवगा आदी पिकांचे उत्पादन किशोर घ्यायचे. परंतु त्यामधून उत्पादन खर्चाच्या तुलनेत अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळे शाश्‍वत उत्पन्न देणाऱ्या पीक पद्धतीचा शोध किशोर मापारी यांच्यासह गावातील शेतकरी करत होते. त्यातूनच रोजगार हमी योजनेतून रेशीम उद्योग (Silk Industry) करण्याची संधी मिळाली. तत्पूर्वी त्यांनी यशस्वी रेशीम उत्पादकांच्या (Silk Producer) शेडवर जाऊन प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच रेशीम व्यवसायातील (Silk Business) अर्थकारण समजून घेतले.

Silk Farming
Silk Farming : रेशीम शेतीत बेण्याऐवजी तुती रोपे लागवडीवर भर

२०१८-१९ मध्ये किशोर यांच्यासह गावातील २५ जणांनी सोबतच रेशीम व्यवसायास सुरुवात केली. किशोर यांनी रेशीम कीटकांच्या संगोपनासाठी २२ बाय ७० फूट आकाराच्या शेडची उभारणी केली. या संगोपनगृहाची क्षमता ४०० अंडीपुंज इतकी आहे. दर्जेदार रेशीम कोष निर्मितीमधून चांगला परतावा मिळण्यास सुरुवात झाली. रेशीम शेतीतून शाश्‍वत उत्पन्नाचा स्रोत निर्माण झाल्याचे किशोर मापारी सांगतात. रेशीम उत्पादकांमध्ये किशोर मापारी यांची सातत्याने दर्जेदार रेशीम कोष उत्पादन घेणारे शेतकरी म्हणून वेगळी ओळख निर्माण झाली आहे.

तुती बागेचे व्यवस्थापन

सुरुवातीला एक एकर क्षेत्रावर तुती लागवड केली. ही लागवड साधारण ५ बाय २ फूट अंतरावर आहे. मागील वर्षी आणखी १ एकर क्षेत्रामध्ये तुती लागवड केली आहे.

रेशीम कोषाच्या बॅच नियोजनानुसार आलटून-पालटून दोन्ही बागेतील तुती पाला वापरला जातो.

वर्षातून चार वेळा तुती बागेची ५५ ते ६० दिवसांच्या अंतराने छाटणी केली जाते. बुडापासून १ फूट अंतर सोडून तुतीची छाटणी होते.

छाटणीनंतर १०ः२६ः२६ एकरी १०० किलो आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये १० किलो प्रमाणे दिले जाते. खतमात्रा दिल्यानंतर ठिबकद्वारे सिंचन केले जाते.

Silk Farming
Silk Farming : अल्पभूधारक कुटुंबाने विणले रेशीम शेतीतून प्रगतीचे धागे

छाटणीनंतर २० दिवसांनी तुतीच्या खुंटावर फुटलेल्या पालवीवर कीटकनाशकांची फवारणी केली जाते.

त्यानंतर २१ दिवसांनी रेशीम अळ्यांना खाऊ घालण्यासाठी तुतीचा पाल्याची कापणी केली जाते. साधारणपणे कोष उत्पादन सुरू करण्यापूर्वी तुतीचा पाला कापणीस येईल अशी व्यवस्था केली जाते.

रोटाव्हेटर आणि खुरपणीद्वारे तण नियंत्रण केले जाते. दोन ओळींमध्ये रोटाव्हेटर फिरवून, तर दोन झाडांमध्ये खुरपणी करून तण नियंत्रण केले जाते.

बॅचचे नियोजन

रेशीम शेतीमध्ये संगोपनगृहाची स्वच्छता, निर्जंतुकीकरण या बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. प्रत्येक बॅच घेण्यापूर्वी शेडचे निर्जंतुकीकरण केले जाते. रेशीम कीटकांवर कोणत्याही कीड-रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी योग्य खबरदारी घेतली जाते.

कोष काढणी आणि चॉकी गेल्यानंतर फॉर्मेलिन, ब्लिचिंग पावडर तसेच अन्य शिफारशीत घटकांद्वारे संगोपनगृह आणि ट्रेचे निर्जंतुकीकरण केले जाते. त्यानंतर साध्या पाण्याने धुऊन घेतले जाते.

बॅच घेण्यासाठी साधारण दोन मोल्ट पास झालेले म्हणजेच १० दिवसांचे चॉकी (बाल्य कीटक) आणली जाते. सुरुवातीचे ३ दिवस अळ्यांना दररोज सकाळी आणि संध्याकाळी कोवळा तुती पाला दिला जातो. चौथ्या दिवशी शेडमध्ये पहिला मोल्ट येतो. तो पास होण्यासाठी १८ ते २४ तासांचा कालावधी लागतो. मोल्ट पास झाल्यानंतर पुन्हा ३ दिवस अळ्यांना पाला खाण्यास दिला जातो. त्यानंतर चौथा मोल्ट येतो. तो पास होण्यासाठी ३६ ते ४० तास लागतात. या काळात रेशीम कीटकांना सतत पाला पुरविणे गरजेचे असते. त्यानंतर साधारण ६ ते ७ दिवसांनी अळ्या कोष तयार करण्यास सुरुवात करतात. कोष तयार झाल्यानंतर योग्य खबरदारी घेऊन त्याची वेचणी सुरू होते. एक बॅच साधारण २१ दिवसांची असते.

सिंचन सुविधा

सिंचनासाठी विहीर आणि शेततळ्यातील उपलब्ध पाण्याचा वापर केला जातो. संपूर्ण तुती लागवडीमध्ये ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केला आहे. आठवड्यातून किमान २ वेळा तुती बागेस पाणी दिले जाते. उन्हाळ्याच्या दिवसांत आठवड्यातून ३ ते ४ वेळा सिंचन केले जाते.

कोष उत्पादन

एका वर्षात साधारण ४ ते ५ बॅच घेतल्या जातात. एक बॅच ३०० ते ३५० अंडीपुंजाची असते. साधारणपणे १०० अंडीपुंजांपासून ७० ते ८० किलो कोष उत्पादन मिळते. योग्य व्यवस्थापनातून आजपर्यंतच्या रेशीम कोष उत्पादनात तीन ते चार वेळा १०० अंडीपुंजांपासून ९० ते ९५ किलोपर्यंत कोष उत्पादन मिळाल्याचे किशोर मापारी आवर्जून सांगतात.

किशोर मापारी, ९८२२०७२३६४ (शब्दांकन ः संतोष मुंढे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com