
- महारूद्र मंगनाळे
एकेकाळी अन्नाचं, जेवणाचं जास्तच महत्त्व होतं. अनेकांना दोन वेळेचं जेवण मिळत नव्हतं. लोकसंख्येच्या तुलनेत अन्नधान्याचा तुटवडा होता.
त्यामुळं गावजेवण, महाप्रसाद यांचं कौतुक होतं. कोणी जेवायला बोलावलं की, लोक आवर्जून जेवायला जात. यातूनच ‘अन्नदान महापुण्यम्' ही म्हण प्रचलित झाली असावी.
हरित क्रांतीनंतर सगळं चित्र बदललं. अन्नधान्य मुबलक झालं. आतबट्ट्याच्या धंद्यामुळं शेतकरी आत्महत्या सुरू झाल्या.
तरीही शेतीमालाचे भाव वाढू नयेत हेच सरकारचे धोरण राहिले. याला कोणतेच सरकार अपवाद ठरले नाही.
अन्नसुरक्षा कायदा हा तर शेती व्यवस्थेच्या मुळावर घाव घालणारा ठरला.
कॉंग्रेस राजवटीत आलेला हा कायदा भाजपा राजवटीतही कायम राहिला.
आज दररोजच्या वापरातील शेकडो वस्तुंच्या किमती अव्वाच्या सव्वा वाढलेल्या असल्या तरी, तुलनेने शेतीमालाच्या किमतींत झालेली वाढ अल्प आहे.
उत्पादन खर्चावर आधारित भाव, ही मागणी मृगजळ ठरली आहे.
आजही सर्वात स्वस्त जेवण आहे. लातूरसारख्या शहरात ४० रुपयांपासून राईसप्लेटचे दर आहेत.
आज जेवणाचं कोणी निमंत्रण दिलं तर, कोणीही सहजासहजी जेवायला जात नाही. जेवणावळीला काहीही किंमत नाही.
धार्मिक ठिकाणी श्रद्धेपोटी लोक जातात पण प्रसादापुरतंच खातात.
तरीही गावजेवण, सप्ताह, प्रसाद यांचं कौतुक थांबलेलं नाही. हा दांभिकपणा आहे. यामागे पुण्य कमावणे नावाची बकवास बाब आहे.
अन्नदान करणारे कोणीतरी श्रेष्ठ आहेत,ही भावना आहे.
एक तर त्यांना आजही बहुतांश लोक पोटभर जेऊ शकत नाहीत, असे वाटत असावे किंवा शेकडो पापकर्मांच्या बदल्यात हे एक तरी पूण्यकर्म करण्याची भाबडी भावना असावी.
यांना हे माहित नाही की, अगदी सर्वसाधारण मजूरही त्यांच्यापेक्षा अधिक चांगलं, चविष्ट आणि पौष्टिक अन्न खातो.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.