
नाशिक जिल्ह्यातील कुंदेवाडी (ता.निफाड) येथील कृषी संशोधन केंद्राने (Agriculture Research Station) हरितक्रांती तसेच अन्न सुरक्षा अभियानामध्ये मोलाचा वाटा उचलत गहू पिकात (Wheat Crop) आपली ओळख तयार केली आहे. गव्हाचे विविध वैशिष्ट्यपूर्ण २८ वाण प्रसारित केले आहेत. पीक व्यवस्थापन तंत्रज्ञान विकसित करून त्याचा शेतकऱ्यांपर्यंत चांगला प्रसारही झाला आहे.
नाशिक जिल्ह्यातील कुंदेवाडी (ता.निफाड)
येथील कृषी संशोधन केंद्राची स्थापना १९३२ मध्ये झाली. पूर्वी हे केंद्र राज्य सरकारच्या कृषी विभागांतर्गत कार्यरत होते. सन १९६९ मध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाची (राहुरी) स्थापना झाल्यानंतर ते विद्यापीठाकडे वर्ग करण्यात आले. आज गहू पिकासाठी महाराष्ट्रातील प्रमुख संशोधन केंद्र म्हणून ते नावारूपाला आले आहे. अखिल भारतीय समन्वित गहू सुधार प्रकल्पांतर्गत ते कार्यान्वित आहे. हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. नॉर्मन बोरलॉग तसेच डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांनी भेट देवून या केंद्राचा गौरव वाढवला आहे.
केंद्रातील तंत्रज्ञान
आतापर्यंत केंद्राने गव्हाचे २८ वाण व पीक व्यवस्थापनाच्या अनुषंगाने २७ शिफारशी प्रसारित केल्या आहेत. गहू विशेषज्ञ डॉ. सुरेश दोडके यांच्या मार्गदर्शनाखाली बांधावर मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळते. गहू पैदासकार डॉ. उदय काचोळे, वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. ज्ञानदेव गाडेकर, डॉ. नीलेश मगर, कृषी विद्यावेत्ता डॉ. संजय चितोडकर, मृद्शास्त्रज्ञ डॉ. योगेश पाटील, वनस्पती रोग शास्त्रज्ञ डॉ. बबनराव इल्हे, गहू रोगशास्त्रज्ञ डॉ. भानुदास गमे, कीटकशास्त्रज्ञ डॉ. भालचंद्र म्हस्के हे केंद्रात कार्यरत आहेत.
गव्हाचे अलीकडील वाण व वैशिष्ट्ये ः
फुले समाधान(एन.आय.ए.डब्ल्यू-१९९४)
बागायतीत वेळेवर किंवा उशिरा पेरणीसाठी एकमेव शिफारशीत सरबती वाण
तांबेरा रोगास प्रतिकारक्षम
प्रथिने १२ टक्क्यांपेक्षा जास्त
चपाती तयार करण्यासाठी उत्तम
पक्व होण्याचा कालावधी- बागायतीत वेळेवर ११५ दिवस. बागायतीत उशिरा- ११० दिवस
उत्पादनक्षमता- बागायतीत वेळेवर ४५ ते ५० क्विंटल प्रति हेक्टरी व बागायतीत उशिरा पेरणीखाली ४२ ते ४५ क्विं.
फुले सात्त्विक (एन.आय.ए.डब्ल्यू-३१७०)
एका ओलिताखाली वेळेवर पेरणीसाठी शिफारशीत सरबती वाण. उत्कृष्ट गुणवत्तेसाठी बेकरी उद्योगासाठी प्रसारित वाण
प्रथिने प्रमाण ११ ते १२ टक्के
‘ब्रेड’ गुणवत्ता स्कोअर- ७ ते ७.५०
‘ग्लूटेन इंडेक्स’- ८० ते ८५ टक्के
लोह (पीपीएम)-३५ ते ४०
झिंक (पीपीएम):३० ते ३५
तांबेरा रोगास प्रतिकारक्षम
उत्पादनक्षमता ३५ ते ४० क्विं. प्रति हेक्टर (एका ओलिताखाली)
एन.आय.डी.डब्ल्यू.-११४९
द्वीपकल्पीय विभागातील जिरायतीत किंवा एका ओलिताखाली (एक पाणी पेरणीनंतर ४२ दिवसांनी)
वेळेवर पेरणीसाठी शिफारशीत बन्सी वाण
तांबेरा रोगास प्रतिकारक्षम
प्रथिने- ११.५० टक्के
शेवया, कुरडया व पास्ता यासाठी उत्तम
पक्व होण्याचा कालावधी ११०-११५ दिवस
उत्पादनक्षमता ३५ ते ४० क्विं. प्रति हेक्टरी (एका ओलिताखाली)
फुले अनुपम(एन.आय.ए.डब्लू-३६२४)
महाराष्ट्रात एका ओलिताखाली वेळेवर पेरणीसाठी शिफारशीत सरबती वाण
प्रथिने- ११.४ टक्के
आकर्षक टपोरे दाणे
तांबेरा रोगास प्रतिकारक्षम
चपातीसाठी उत्तम वाण
पक्व होण्याचा कालावधी १०५ ते ११० दिवस
उत्पादनक्षमता ३० ते ३५ क्विंटल/हेक्टरी (एका ओलिताखाली)
पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता
संशोधन व विस्तार
सन २०१९ मध्ये प्रसारित ‘फुले सात्त्विक’ हा देशपातळीवर बेकरी उद्योगासाठी ‘सर्वोत्कृष्ट वाण’ म्हणून पुढे आला. कर्नाल येथील भारतीय गहू व सातू संशोधन संस्थेने सर्वाधिक मानांकन असलेला भारतातील वाण म्हणून त्यास मान्यता दिली आहे. राज्यातील विविध भागांत मिळून सुमारे दोन लाख हेक्टर क्षेत्रापर्यंत फुले समाधान वाण पोचले आहे. तंत्रज्ञान वापरामुळे एकरी उत्पादनात व उत्पन्नातही वाढ शेतकऱ्यांनी साधली असल्याचे डॉ. योगेश पाटील यांनी सांगितले.
शेतकरी अनुभव
कुंदेवाडी येथील वैकुंठ पाटील यांची संयुक्त शेती असून २० एकरांत ते गहू घेतात. पूर्वी पारंपरिक पद्धतीत सुधारित बियाणे व तंत्रज्ञानाचा अभाव होता. तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव अधिक व्हायचा. गरजेपेक्षा अधिक बियाणे व खतांचा वापर व्हायचा. सुधारित तंत्रज्ञान आत्मसात केल्याने त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. पाण्याच्या उपलब्धतेनुसार वाणांची निवड, बीजप्रक्रिया, सिंचन व्यवस्थापन, कीड- रोगनियंत्रण आदींच्या नियोजनातून अनावश्यक खर्चात बचत झाली आहे. एकरी उत्पादनात ६ ते ७ क्विंटल वाढ झाली आहे. एकरी २२ क्विंटलपर्यंत उत्पादन घेणे शक्य झाले आहे.
- वैकुंठ पाटील, ९३७१७८०८३७
ठळक लागवड तंत्रज्ञान व शिफारशी
हेक्टरी १० टन शेणखत जमिनीत शेवटच्या कुळवाच्या पाळीआधी जमिनीत पसरून देणे.
बागायत वेळेवर क्षेत्रात १२०-६०- ४० (६० किलो नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणीवेळी आणि उर्वरित ६० किलो नत्र ३ आठवड्यांनी) असे अन्नद्रव्य व्यवस्थापन.
संरक्षित पाण्याखालील व बागायत उशिरा क्षेत्रात ८०:४०:४० (४० किलो नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणी वेळी आणि उर्वरित ४० किलो नत्र ३ आठवड्यांनी द्यावे) असे व्यवस्थापन.
गहू पिवळा पडल्यानंतर तसेच धान्यातील ओलावा १५ टक्के असताना कापणी केल्यानंतर यंत्राच्या साह्याने मळणी.
अधिक उत्पादन व जमिनीतील लोहाची पातळी राखण्यासाठी शिफारशीत अन्नद्रव्यांसोबत
हेक्टरी २० किलो हिराकस १०० किलो शेणखतात १५ दिवस मुरवून जमिनीतून पेरणीवेळी
देणे.
मध्यम खोल काळ्या जमिनीत हेक्टरी ४५ ते ५० क्विंटल अपेक्षित उत्पादनासाठी हेक्टरी १० टन शेणखताबरोबर समीकरणानुसार नत्र, स्फुरद आणि पालाश या अन्नद्रव्यांची शिफारस.
बागायती क्षेत्रात अन्नद्रव्यांची मात्रा देवून पेरणीनंतर ५५ आणि ७० दिवसांनंतर १९:१९:१९ या विद्राव्य खताची किंवा डीएपी खताची शिफारशीनुसार फवारणी.
आर्थिक फायदा आणि खतांच्या कार्यक्षम वापरासाठी पेरणीपूर्वी १ टन शेणखत. हेक्टरी ७०:३५ किलो नत्र: स्फुरद ही अन्नद्रव्ये युरिया-डीएपी ब्रिकेटद्वारे १५-३० सेंमीच्या जोडओळ पद्धतीनुसार द्यावीत. प्रत्येकी २.७ ग्रॅम वजनाच्या ब्रिकेट्स गहू ऊगवणीनंतर ३० सेंमी अंतरावर खोचण्याची शिफारस.
डॉ.सुरेश दोडके, गहू विशेषज्ञ ९६०४२६११०१,
डॉ. योगेश पाटील ९४२१८८६४७४, डॉ. भानुदास गमे, ७५८८०३६३९१
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.