Turmeric : शेतकरी पीक नियोजन : हळद

कदम बंधूनी धडाडीने आपल्या शेतीचे सपाटीकरण केले. केवळ शेतीच्या उत्पन्नातून हळूहळू शेती बागायत करत २००७ पर्यंत सर्व शेती सिंचनाखाली आणली.
Turmeric
Turmeric Agrowon

शेतकरी नाव ः उदय कदम

साप (ता. कोरेगाव, जि. सातारा)

एकूण शेती ः जालिंदर आणि भगवान कदम बंधूची एकत्रित २५ एकर

हळद पीक ः दरवर्षी दोन ते तीन एकर.

सातारा जिल्ह्यातील साप (ता. कोरेगाव) येथील जालिंदर व भगवान या कदम बंधूंची एकूण २५ एकर शेती आहे. सुरुवातीला ही शेती पूर्ण कोरडवाहू (Dry Land) होती. मात्र १९८७ मध्ये धोम धरणाचा कालव्यामुळे सिंचनासाठी (Irrigation) सोय उपलब्ध झाली. कदम बंधूनी धडाडीने आपल्या शेतीचे सपाटीकरण केले. केवळ शेतीच्या उत्पन्नातून हळूहळू शेती बागायत करत २००७ पर्यंत सर्व शेती सिंचनाखाली आणली. २००५ मध्ये जालिंदर यांचे चिरंजीव उदय, सूरज आणि भगवान यांचे चिंरजीव अनिष हेही शेतीमध्ये उतरले. या मुलांनीही आपल्या आजोबांची शिकवण लक्षात ठेवत, कोणत्याही कर्जाशिवाय शेतीसाठी आधुनिक अवजारे (Modern Implements), ट्रॅक्टर व जीप, बंगला उभा केला.

Turmeric
Turmeric : हळद निर्यातीत भारत अव्वल

हळद पिकांचा आधार

जालिंदर कदम यांनी १९९२ मध्ये प्रथम हळद पीक घेतले. हे पीक फायदेशीर वाटल्याने आजतागायत हे पीक त्यांच्या शेतात कायम झाले आहे. आता पिढीनुसार लागवड तंत्रात अनेक बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेमध्ये उत्पादनातही वाढ मिळत असल्याचे उदय सांगतात. सुरुवातीला हळद पीक वाकुरी पद्धतीने केले जाई. पुढे त्यात बदल करून सरी पद्धती वापरू लागले. आता गादीवाफ्यावर हळदीची लागवड होते. वाकुरी व सरीवर सुमारे २० ते २२ क्विंटल प्रति एकर उत्पादन मिळत असे. मात्र गादीवाफ्यावरील लागवडीमध्ये एकरी ३८ ते ४० क्विंटल हळदीचे उत्पादन मिळत आहे. २० वर्षांपेक्षा अधिक काळ हळद पिकाने साथ दिली आहे. उसापेक्षाही अधिक फायदेशीर असल्याने हे पीक कुटुंबाचा मुख्य आर्थिक आधार झाले आहे.

Turmeric
Turmeric : हळदीमध्ये भरणीचे महत्त्व

हळदीचे नियोजन

- प्रत्येक वर्षी साधारणपणे दोन ते तीन एकर हळदीचे पीक घेतले जाते.

- मशागतीनंतर एकरी पाच ट्रेलर शेणखत व दोन ट्रेलर मळी जमिनीत एकजीव केली जाते.

- एक ते दहा मे या कालावधीत लागवड.

- साडेचार फुटी गादीवाफ्यावर दोन ओळींत एक फूट व दोन गड्ड्यांतील अंतर दीड फूट ठेवून लागवड केली जाते.

- लागवडीसाठी साधारणपणे एकरी १२ क्विंटल हळद लागते.

- सिंचनासाठी ठिबक पद्धतीचा, तर खतांसाठी विद्राव्य खतांचा वापर करतात.

- लागवडीनंतर साधारणपणे २० दिवसांनी बाळ भरणी व त्यांनतर टप्प्याटप्प्याने दोन भरणी केल्या जातात.

- भरणीसाठी छोट्या ट्रॅक्टरचा वापर केला जातो.

- जनावरांच्या चाऱ्यासाठी मक्याचे आंतरपीक घेतले जाते.

- उत्पादनवाढीसाठी दर चार वर्षांनी बियाण्यांमध्ये बदल केला जातो.

- नऊ महिन्यांच्या कालावधीनंतर हळद ट्रॅक्टरद्वारे काढली जाते.

- बॉयलर व कुकरद्वारे शिजवून शेतातच सुकवली जाते. त्यासाठी शेडनेटचा वापर करत असल्यामुळे हळदीतील पाणी निघणे, गोळा करणे सोपे होते.

- दोन ट्रॅक्टरसह विविध अवजारे आणि हळद काढणी यंत्रही स्वतःचे आहे. परिणामी शेतीतील सर्व कामे वेळेवर करणे शक्य होते.

कामाची विभागणी ः

उदय हे पाणी व्यवस्थापन, पीक संरक्षण आणि मजुराची हाताळणी याकडे लक्ष देतात.

सूरज यांच्याकडे सर्व ट्रॅक्टर, बैल जोडीची जबाबदारी आहे.

सर्वांत लहान अनिष यांच्याकडे जनावरे, गोठा व्यवस्थापन व दुग्ध व्यवसायाची जबाबदारी आहे.

अर्थात, आवश्यकतेनुसार एकमेकांला मदत केली जाते. आजही घरातील वडिलधाऱ्यांचे तसेच अनिल ढोले मार्गदर्शन मिळते.

पुढील पंधरा दिवसांचे नियोजन

- हळदीत खताचा बेसल डोस नुकताच दिला असून त्यावर मातीची भर देण्याचे काम सुरू होईल.

- त्यानंतर रोग-किडीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवून आहे. पुढील आठवड्यांमध्ये एक प्रतिबंधात्मक फवारणीचे नियोजन केले आहे.

- हळदीत वैरणीसाठी आंतरपीक म्हणून मका पीक घेतले आहे. त्यासाठी दसऱ्याला पुन्हा एक खताचा डोस दिला जाईल.

उदय कदम, ९५६१६१४२६०

(शब्दांकन ः विकास जाधव)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com