जे न करी गाव, ते करी कांतराव

अलौकिकास पात्र काम जगासमोर आणण्याचा आनंद अमर असतो. या माहिती पण प्रत्यक्ष भेट देऊन जाणलेल्या ‘सामाजिक कार्याचा’ शब्दपट आपल्या चांगल्या वाचनासाठी; या सद्‍भावनेने मांडत आहे; तो गावोगावी अधोरेखित होण्याच्या अपेक्षेसह...
gramsabha
gramsabhaAgrowon

‘जे करी गाव, ते न करी राव,’ अशी म्हण गावच्या एकोप्यासाठी पूर्वीच्या जाणत्या पण स्वतः एकलहाती काम न करणाऱ्या कारभारी लोकांनी आणली. पण काळानुरूप आपल्यात एकट्याने लढून कामे करणारी कर्तृत्ववान माणसं दिसत आहेत. त्यामुळे पहिल्या म्हणण्याला छेदून समाजासाठी अभेद्य काम करणाऱ्या माणसाची दखल घेणे आपले खरे लेखन असते. मातीत राबणाऱ्या माणसात माझा स्वतःचा दररोज राबण्याचा अनुभव असल्याने मला ला शब्दाला साजेशी माणसं गवसतात.

gramsabha
Khilar Cow : खिलार संगोपनातून कुटुंबाला आधार

हो, मी एखाद्या असामान्य कामाच्या बाबतीत शोध घेतो, तेव्हा अनेकदा काहीच सापडत नाही, पण अलौकिकास पात्र काम जगासमोर आणण्याचा आनंद अमर असतो. या माहिती पण प्रत्यक्ष भेट देऊन जाणलेल्या ‘सामाजिक कार्याचा’ शब्दपट आपल्या चांगल्या वाचनासाठी; या सद्‍भावनेने मांडत आहे; तो गावोगावी अधोरेखित होण्याच्या अपेक्षेसह...

gramsabha
Pomegranate : प्रयत्नवाद, अभ्यासातून उभारलेले कृषिवैभव

परभणी शहरातील दर्गा परिसरातील आसेफनगर, संभाजीनगर भागाला जोडणाऱ्या रस्त्यावर चिखलामुळे सगळा राडा झालाय. या भागातील एका महिलेचे निधन झाले. निधनानंतर अंत्ययात्रा चिखल तुडवत निघाली. ही बातमी मी दिनांक १० ऑक्टोबर २०२२ सोमवारच्या दैनिकात वाचली. ‘रोजचं मढं, त्याला कोण रडं?’ मला रोजचेच आहे, पण ‘मढं चाललंय मडातून’ हे काही गावचे अपवाद सोडले, तर सगळीकडेच जागोजागी दिसणारे गंभीर दर्शन! माणसाच्या मढ्याची हेळसांड माणसांच्याच बेजबाबदारपणामुळे झालेली असते.

ज्याला आपण स्मशानभूमी म्हणतो तिची अवस्था अत्यंत वाईट असते. काटेरी चिल्हारी, दगडधोंडे, फुपाटा, मोकार जनावरांचा आसरा, कुत्र्यांचे इव्हळण्याचे- रागदरबाराचे भयाण ठिकाण आणि काही बेवड्यांचेही अभयदान लाभलेले अक्षरशः अरण्य, त्याच्या चहूबाजूला हागणदारीचा दर्प सुटलेला. एवढी दर्पोक्ती स्वीकारून आपण अनेकदा अनेकांना ‘कायमचं वाटं’ लावून येतो.

तिथं आयाबाया म्हाताऱ्या-कोताऱ्यांची फार कुचंबणा होते, पण निधीचा ‘विधीपूर्वक’ वापर न केल्यामुळे हे सर्व गावकऱ्यांच्या सौजन्याने अखंड भोगणे चालू असते. तिथल्या दुःखाने माणसं विरघळतात पण ‘हिला’ कायमचे चांगले करण्याचा ‘नाद’ सगळे जण दुर्लक्षित करतात. तरीही स्मशानभूमी ‘सुंदर’ तयार करण्याचे काम झालेय. एखादा ‘कृषिभूषण’च हे अढळ काम करू शकतो. कारण त्याचे पाय मातीवरच आहेत.

परभणी - जिंतूर राज्य महामार्गावर परभणीपासून साधारणतः २० किलोमीटर अंतरावर झरी नावाचे खेडेगाव अगदी रोडला खेटून वसलेले आहे. त्याच गावच्या सरपंच ते सभापती असा प्रवास असलेल्या कांतराव देशमुख - झरीकर (९४२३७७६६००) या राजबिंड्या माणसाने हे काम उभे केले. दुधना नदीच्या काठावर या दानशूराने स्मशानभूमी शेजारील एक एकर जागा स्वतः विकत घेऊन ती ‘मातोश्री इंदिराबाई देशमुख’ स्मशानभूमीसाठी दान दिलीय. अगदी म्हाताऱ्या आयाबायाही आता इथे राजीखुशीने अंत्यसंस्काराला उपस्थित राहत असताना, ‘छटाक गूळ, पत्तीची पुडी अन् इंद्रामायच्या स्मशानात हाणते उडी’, अशा म्हणत म्हणत येत आहेत.

gramsabha
Flower Farming : फुलांच्या शेतीतून अकोळनेरला मिळाली ओळख

या स्मशानभूमीची वैशिष्ट्ये ः

एक गाव एक स्मशानभूमी, कोणत्याही समाजाच्या व्यक्तीचा अंत्यविधी करता येतो. मोठ्या प्रमाणावर कडुनिंब, पिंपळ, जांभूळ, वड, गुलमोहर, करंजी, रुचकी या झाडांची लागवड; तर फुलझाडे बोगनवेल, झेंडू, मोगरा, सदाफुली, कर्दळी लागवड, औषधी वनस्पती तुळस लागवड, ऐसपैस परिसर - हिरवागार परिवार, बोलक्या भिंती, ऑक्सिजन पार्क, स्टोअर रूम, सौरऊर्जेची सोय, दिव्य संदेश, दिव्यांगांसाठी रॅम्पची (उताराची) सोय, ध्वजस्तंभ, हनुमंत गोविंद पवार (सेवेकरी - संपर्क ९६९९४६७८९५) यांना राहण्यासाठी सिमेंट काँक्रीटचे घर, महत्त्वाचे फोन क्रमांक फलक,

पेव्हरब्लॉकचे जमिनीवर आच्छादन व संरक्षक भिंत, बैठक व्यवस्था, २४ तास पाणीपुरवठा, पर्यटनास साद घालणारी भूमी, मोफत स्वर्ग रथ उपलब्ध, सेवेकऱ्याच्या शेळीपालनासाठी- पिल्लांसाठी निवाऱ्याची सोय, अभिप्राय रजिस्टर आणि महत्त्वाचे म्हणजे आयएसओ मानांकन प्राप्त स्मशानभूमी, भगवान शंकराचा पुतळा, प्रवेशद्वारावर कमानी, उल्हासित करणारा माहोल अशी आहेत.

कुणीही - कधीही माणसाच्या ‘मातीसाठी’ नाही तर मनस्वी माणसाची ही देखणीभूमी नजरेत साठवावी अशीच आहे. आपल्या जावयाच्या मृत्यूनंतर लेकीला - आश्‍विनीला पेरू लागवड, पेट्रोल पंपाची उभारणी करून देणारा हा ‘काका’ मोठ्या उंचीचा माणूस. लोकांना आत्मनिर्भर करणारा हा अवलिया रमेश देव व सीमा देवांशी खास जानपहचान असणारी हस्ती! नाना पाटेकरांनी ‘तुझी उंची मला दे’, अशी साद घातलेला हा आनंदी- तरुण वयाच्या ६७ व्या वर्षातही ‘नाम’ फाउंडेशनमध्ये कार्यरत आहे. गावातील विधवा बहिणींना प्रत्येकी १५ हजार रुपये भेट भाऊबिजेला देऊन पाठराखण करणारा हा ‘जिंदा दिल’ आहे.

याचे साक्षीदार कवी इंद्रजित भालेरावसुद्धा आहेत. या माणसाच्या संकल्पनेतून परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील देऊळगाव (दुधाटे) येथे पैलवान गोविंदराव व गावकऱ्यांनी आणि परभणी तालुक्यातील टाकळी (कुंभकर्ण) येथील सरपंच प्रभाकर जैस्वालने व गावकऱ्यांनी आपल्या स्मशानभूमी साकारल्या आणि इतर अनेक ठिकाणी ‘स्वच्छ - सुंदर स्मशानभूमी’ चळवळीची उत्क्रांती होत आहे.

मी मागे देऊळगावचे (दुधाटे) पैलवान गोविंदराव यांना पाच हजार रुपये भेट देऊन दोस्त केलेले आहे. पदरगाठीचे हे अनुभव बोलण्यापेक्षा कामातून रुंदत जातात. गावात एकमेकांची फाकवाफाकवी करण्यापेक्षा सर्वांना सामावून घेणारे हे असे उठावदार कामे कामाची व महत्त्वाची आहेत, यासाठीच केलेला हा सायास!

- अरुण चव्हाळ, परभणी (७७७५८४१४२४)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com