
Agriculture News : सिंचनासाठी (Irrigation) वापरण्यात येणाऱ्या अयोग्य आणि समस्यायुक्त पाण्याचा पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. साधारणपने कमी पावसाच्या प्रदेशात जमिनीतील पाणी बऱ्याचशा प्रमाणात खारवट झालेले असते.
अतिखारट पाण्यात सोडियम आणि मॅग्नेशियम या धातूंचे क्लोराईड आणि सल्फेट क्षार जास्त विरघळलेले असतात. असे पाणी चवीला खारवट किंवा मचूळ असते. अशा पाण्याचा सिंचनासाठी वापर केल्यास शेतातील जमिनीच्या पृष्ठभागावर क्षारांचा पांढरा थर दिसून येतो. पिकाची उगवण नीट होत नाही. उगवलेल्या पिकांचे शेंडे करपतात.
जमीन चोपण चिबड होऊन पृष्ठभागावर पाणी थांबते. जमिनीवर चालताना जमीन टणक झाल्याचे जाणवते. अशा पाण्याचे परिक्षण करुन योग्य ते उपचार करावे लागतात. तर ज्या भागातील विहिरींना खारट पाणी आहे तेथे काही विशिष्ट प्रकारच्या व्यवस्थापन पद्धतीचा वापर केल्यावर पाण्याचे दुष्परिणाम टाळता येतात.
क्षारयुक्त पाणी ओलिताखाली वापरावयाचे असल्यास ते सहजासहजी जमिनीच्या थरातून काढून टाकणे आवश्यक असते. रेतीमय पोयटा किंवा जाड पोयट्याच्या जमिनीत क्षारवट पाण्याचे दु्ष्परिणाम न होता ते सिंचनासाठी वापरले जाऊ शकते.
रेतीमय चिकण पोयट्याच्या जमिनीला मर्यादित परंतु वारंवार पाणी दिल्यास पिकांची वाढ चागंली होते. जमिनीच्या पृष्ठभागावरुन पाणी देण्यापेक्षा फावरा पद्धतीने ओलीत केल्यास जमिनीमध्ये कमी प्रमाणात क्षार साचतात.
खारवट पाण्यात बोरॉनचे प्रमाण जास्त आणि सोडीयम कार्बोनेटचे प्रमाण ६०० मिली ग्रॅम प्रति लिटरपर्यंत असल्यास २० टन जिप्सम प्रति हेक्टर जमिनीत टाकल्यानंतर खारवट पाण्याचा वापर ओलीतासाठी केल्यास ते अतिशय उपयुक्त ठरते. खारवट पाण्यातील क्षार मध्यम प्रमाणात असल्यास जमिनीत शेणखताचा वापर केल्याने असे पाणी ओलीताखाली सर्रास वापरता येते.
खारवट पाणी ओलीतासाठी वापरत असताना जी पिके पाण्यातील खारवटपणा सहन करु शकतात तीच निवडणे योग्य ठरते. यामध्ये कापूस, करडई, बाजरी, ज्वारी आणि गहू या पिकांचा समावेश होतो.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.