
पिकांच्या सुदृढ वाढीसाठी १८ अन्नद्रव्यांची आवश्यकता असून, प्रत्येक अन्नद्रव्य (Nutrients) पिकांमध्ये विशिष्ट प्रकारचे कार्य करते.
या अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे पिकांवर विपरीत परिणाम होतात.अन्नद्रव्यांचे वर्गीकरण हे प्रामुख्याने पिकांच्या आवश्यकतेनुसार म्हणजेच भरपूर लागणारी म्हणजेच मुख्य, मध्यम प्रमाणात लागणारी दुय्यम आणि कमी प्रमाणात लागणारी सूक्ष्म अन्नद्रव्ये (Micro nutrients) असे केले जाते.
या सर्व अन्नद्रव्यांचे कार्य समजून घेऊन, त्यांचा विविध खतांद्वारे वापर केल्यास पिकांच्या जीवनचक्रातील सर्व प्रक्रिया सुरळीत होतात. पिके निरोगी राहून उत्पादनामध्ये वाढ होते.
नैसर्गिकरीत्या माती,पाणी आणि वातावरणातील हवेतून मोठ्या प्रमाणात पुरविली जाणारी अन्नद्रव्ये म्हणजे कर्ब, हायड्रोजन, ऑक्सिजन. ही अन्नद्रव्ये पिकांच्या आंतरिक प्रक्रियेत भाग घेतात. मात्र, खतांद्वारे पुरवठा करण्याची गरज नसते.
नत्र
पिकांच्या शरीरातील प्रथिने आणि हरितद्रव्ये तयार करण्याच्या प्रक्रियेत मदत करणारा नत्र हा महत्त्वाचा घटक आहे. नत्रामुळे पिकांची पाने हिरवीगार होऊन पानांची आणि खोडाची वाढ झपाट्याने होते.
नत्रामुळे अन्नधान्य आणि कडधान्य बियांमध्ये प्रथिनांचे प्रमाण वाढते. नत्राच्या योग्य पुरवठ्यामुळे स्फुरद, पालाश व अन्य अन्नघटकांच्या शोषणाला मदत होते.
नत्राच्या कमतरतेमुळे झाडांची अधिक परिपक्व झालेली पाने अगोदर हळूहळू पिवळी पडतात. मुळे आणि खोडांची वाढ मंदावते.
झाडांना नवीन फूट होत नाही, फुले कमी येतात; तृणधान्य, दाणे व फळे पूर्णपणे पक्व होत नाहीत.तर अधिकच्या नत्रामुळे पालवीची अधिक वाढ होते. ती लुसलुशीत होऊन किडीचा प्रादुर्भाव वाढतो.
स्फुरद
पिकांच्या पेशींचे विघटन आणि त्यांच्या वाढीसाठी स्फुरदाची गरज असते. स्फुरदाच्या यथायोग्य उपलब्धतेमुळे अंकुरण लवकरच होते. बाल्यावस्थेत लवकर मुळ्या फुटतात. मुळ्यांचे जाळे तयार झाल्याने पीक जमिनीवर लोळत नाही.
फुले, दाणे भरपूर येतात. त्यातील खनिज द्रव्यांचे प्रमाण वाढते. द्विदल वनस्पतीमध्ये स्फुरदाच्या अस्तित्वामुळे सूक्ष्म जिवाणूंची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. मुळ्यांवरील गाठींच्या प्रामाणात वाढ होते.
स्फुरदाच्या कमतरतेमुळे सर्वसाधारणपणे पिकांची वाढ खुंटते. तृणधान्य, फळे आणि कडधान्याचे उत्पादन कमी होते.
पानांवर जांभळसर छटा दिसते. पानावरील दाट हिरवेपणा आणि जांभळी छटा हे स्फुरदाच्या कमतरतेचे मुख्य लक्षण असते. आवश्यकतेपेक्षा स्फुरदाची अधिक मात्रादेखील पिकांवर अनिष्ट परिणाम घडवून आणते.
पालाश
पिकांची वाढ जोमदारपणे होऊन धांड्यामध्ये ताठपणा येतो. पिके अधिक वाढली तरी जमिनीवर लोळत नाहीत. कोरडवाहू शेतीमध्ये पालाशच्या वापरामुळे बाष्पीभवनाची प्रक्रिया मंदावते. पेशींमध्ये पाणी अधिक साठवून राहते.
पिकांमध्ये पिष्टमय आणि शर्करायुक्त पदार्थ तयार करण्यासाठी पालाशाची गरज असते. पालाश हा विकराचा महत्त्वाचा घटक असून संश्लेशित शर्करा आणि पिष्टमय पदार्थ बिया, मुळे, कंद, फळांकडे वाहून नेण्याचे कार्य करते.
प्रथिने तयार करण्याचे कामही पालाशमुळे नियंत्रित केले जाते. कीड-रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा पालाशमुळे वाढते. फळाचा आणि दाण्याचा रंग चकाकदार होतो.
पालाश कमतरतेमुळे जुन्या पानाच्या कडा पिवळसर होऊन पानांवर तांबडे ठिपके पडतात. सर्वसाधारण पिकांची वाढ मंदावते. पिकांचे धांडे कमजोर होतात, शेंडे जळतात, बिया आणि फळांचा आकार ओबडधोबड होतो.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.