‘स्वयम शिक्षण प्रयोग` करतेय ग्रामविकास, आरोग्याचा जागर

गाव पुनर्वसनाचा नकाशा बनविताना महिला बचत गटाच्या सदस्या.
गाव पुनर्वसनाचा नकाशा बनविताना महिला बचत गटाच्या सदस्या.

पुणे येथील ‘स्वयम शिक्षण प्रयोग` ही स्वयंसेवी संस्था महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू  आणि बिहार राज्यामधील अठरा जिल्ह्यांतील सुमारे दोन हजार गावांमध्ये कार्यरत आहे. आरोग्य, शुद्ध पाणी, स्वच्छता, अपारंपरिक ऊर्जा आणि सेंद्रिय शेती आणि ग्राम विकास या क्षेत्रांमध्ये संस्था विविध उपक्रम राबवीत अाहे.

स्वयम शिक्षण प्रयोग (एसएसपी) ही स्वयंसेवी संस्था महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू आणि बिहार राज्यातील अठरा जिल्ह्यांतील सुमारे दोन हजार गावांमध्ये कार्यरत आहे. मराठवाड्यातील भूकंपग्रस्त भागात पुनर्वसन कार्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे स्वयम शिक्षण प्रयोग या संस्थेची निवड करण्यात आली होती. संस्थेने लातूर, उस्मानाबादच्या भूकंपानंतर पुनर्वसन कार्यात महिलांना केंद्रबिंदू मानून त्यांना निर्णयप्रक्रियेत संवाद सहाय्यक म्हणून काम करण्याची संधी देण्याचा आग्रह जागतिक बँक व महाराष्ट्र शासनाकडे धरत तो मंजूर करून घेतला. यासाठी गावातील महिला मंडळे पुढे आली, प्रशिक्षण झाले. संवाद सहाय्यकांनी गावागावांत फिरून घरबांधणीच्या सरकारी योजनेचे लाभ आणि कार्यप्रणाली लोकांना समजावून सांगितली. महिलांना भूकंप सुरक्षित घरबांधणीचे तंत्र शिकविले. महिलांच्या गरजा लक्षात घेऊन घरांचे आराखडे तयार केले. भूकंपापासून सुरक्षा देणाऱ्या घटकांचा बांधकामात वापर कसा करायचा हे शिकवण्यात आले. सरकारी यंत्रणेशी सतत संवाद साधून बांधकामाचा दर्जा कुठेही कमी न होता खर्चात बचत होण्यासाठी महिलांनी चांगले काम केले. घरबांधणीपासून सुरू झालेला हा प्रवास स्वच्छता, पाणी, आरोग्य, शिक्षण, रेशन, ग्रामविकास, पंचायती राज असा पुढे सुरू राहिला. महिला ग्रामसभा, पंचायतीत सामील होऊ लागल्या. २००१चा गुजरातमधला भूकंप, २००४ मधील तामिळनाडूची त्सुनामी आणि २००८ मध्ये बिहारमधील पूर असो, प्रत्येक आपत्तीमध्ये संस्थेने आपले कार्यक्षेत्र विस्तारत नेले.  

  महिला बचत गटातून प्रगती 

संस्थेने लातूर, उस्मानाबाद, सोलापूर या जिल्ह्यातील १,१०० गावांमध्ये सात हजार बचतगट स्थापन करून महिलांची साखळी तयार केली. एकमेकांना सहकार्य करणे, समस्या सोडवण्यासाठी क्षमताबांधणी हे उपक्रम हाती घेण्यात आले. महिलांना बचतगटांच्या माध्यमातून संघटित करून बचत, कर्ज व परतफेडीची सवय लावली. प्रशिक्षणे, नवीन तंत्रज्ञानाची तोंडओळख, अभ्यास सहली, समुपदेशन, सरकारी यंत्रणांच्या संपर्कातून महिला सक्षमीकरणाची पावले उमटत गेली. बचतगटाच्या माध्यमातून महिलांना एकत्र आणणे, व्यवहार सचोटीने सांभाळणे, उद्योजकतेच्या प्रवाहात सामील होणे, गावविकासाचे अग्रक्रम आणि प्रकल्प खर्चाचा हिशेब ठेवून व्यवस्थित पार पाडणे अशा अनेक प्रकल्पात महिला सामील होत गेल्या. बचतगटामुळे सावकारी कर्जाच्या समस्येचे निराकरण झाले.     जलस्वराज्य उपक्रमात सहभाग 

  जागतिक बँकेच्या पाठिंब्याने पिण्याचे पाणी आणि संडास बांधणीसाठी २००३ मध्ये जलस्वराज्य योजना सुरू झाली. तेव्हा गाव समितीमध्ये पन्नास टक्के महिलांचा समावेश आणि महिला सक्षमीकरणासाठी स्वतंत्र निधी असावा, यासाठी संस्थेने महाराष्ट्र सरकार आणि जागतिक बँकेसोबत चर्चा करून शासन निर्णय अमलात आणला. जलस्वराज्यसाठी संस्थेने लोकसहभाग मार्गदर्शिका तयार केली. राज्यातील पंचवीस हजार गावांतून हा प्रकल्प राबवण्यात आला. यासाठी महिला गटांनी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. लोकवाटा गोळा करणे, पाण्याची टाकी कुठे असावी, टाकी-पाइपलाइनसाठी खर्चाचे अंदाजपत्रक,बांधकामावर देखरेख अशी कामे केली. जलस्वराज्य आणि स्वजलधारा योजना राबवून गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यात यश मिळवले. ‘संत गाडगेबाबा ग्रामीण स्वच्छता पुरस्कार’ आणि केंद्र सरकारचा ‘निर्मल ग्राम पुरस्कार’ मिळवण्यासाठी या गावांनी आघाडी                घेतली. विविध उपक्रमांतून विकास  

  • ब्रिटिश पेट्रोलियम कंपनीसोबत  ग्रामीण भागासाठी निर्धूर चूल उपलब्ध करून दिली. डॉ. सी. के. प्रल्हाद यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणस्नेही उपक्रमात संस्थेने या उत्पादनाची विक्री करण्यासाठी महिलांना प्रशिक्षण दिले. 
  •  संस्थेच्या प्रयत्नातून एक लाख कुटुंबांना निर्धूर चुली उपलब्ध. प्रत्येक ‘ऊर्जा सखी’ची दरमहा चार ते पाच हजार रुपयांची कमाई. 
  •  संस्थेने महिलांच्या उद्योजकतेला व्यावसायिकतेचे परिमाण दिले. यातूनच लक्ष्मी (बचतगट -लघुकर्जे), निर्मला (शौचालय बांधणी), अन्नपूर्णा (घरगुती किराणा),आशा (आरोग्य विमा व सेवा) आणि ज्योती (निर्धूर चूल/ बायोइंधन) महिला मोठ्या आत्मविश्वासाने व्यवसायात यशस्वी.
  •  डाळ उद्योग, मसाला निर्मिती, भाकरी उद्योग, पापड, कुरडई, चटणी, लोणचे, कापडी पिशव्या निर्मिती व्यवसायांना सुरवात. 
  •  गावाच्या गरजा पूर्ण करणारे छोटे किराणा दुकान, स्टेशनरी, बांगडी विक्री, पिठाची चक्की, गांडूळखत निर्मिती, मिरची कांडप, पशुपालन, कुक्कुटपालनातून आर्थिक प्रगती.
  •  निर्धूर चुली, सोलर दिवे, वॉटर-हीटर, विद्युत उपकरणे, बायोगॅस तंत्रज्ञानाचा प्रसार. संस्थेतर्फे महिला व्यावसायिकांना आर्थिक मदत. बाजारपेठ व कौशल्य प्राप्त करून देण्यासाठी सखी समुदाय कोश, सखी युनिक रुरल एंटरप्राईज, सखी सोशल एंटरप्राईज नेटवर्क या संस्थांची स्थापना.
  •  महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी उपक्रमाला सुरवात. या उपक्रमाला महाराष्ट्र शासनाचे पाठबळ. सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी व मोहोळ तालुक्यातील पाच हजार महिलांना उद्योजकतेचे प्रशिक्षण देऊन व्यवसाय उभे करण्यासाठी ‘स्टार्ट-अप व्हिलेज प्रोग्राम’ अंतर्गत सहाय्य. एकूण एक लाख चार हजार महिलांना उद्योजकतेचे प्रशिक्षण.
  •  महिलांनी सेंद्रिय पद्धतीने पीक उत्पादन घेऊन कुटुंबासाठी रसायनमुक्त सकस आहार उपलब्ध करावा, यासाठी प्रयत्न. शेती जरी संयुक्त असली तरी त्यातून महिलांनी किमान एक एकर शेतीमध्ये कुटुंबाच्या गरजेपुरते अन्नधान्य, भाज्या, फळे, औषधी वनस्पतींचे सेंद्रिय पद्धतीने उत्पादनाला सुरवात. बियाणे, सेंद्रिय खते व कीटकनाशके स्वतः बनवावीत यासाठी मार्गदर्शन. अनेक महिला आज स्वतः उत्पादित बियाणे, गांडूळखत, जीवामृत, सेंद्रिय खत, दशपर्णी, निंबोळी अर्क वापरतात. यामुळे खर्चाची  बचत.
  •  कमी पाण्यावर मिश्र पिके घेतल्याने जमिनीच्या सुपीकतेत वाढ. पोषक व सुरक्षित आहाराची उपलब्धता. संस्था राज्याच्या ‘महिला किसान सक्षमीकरण परियोजने’अंतर्गत सोलापूर, उस्मानाबाद व बीड जिल्ह्यातही हा उपक्रम राबवत आहे. उपक्रमामध्ये महिला शेतकऱ्यांचा मोट्या प्रमाणात सहभाग.
  • महिला परिषदेचे आयोजन  स्वयम शिक्षण प्रयोगच्या स्थापनेला वीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ‘उन्नती ग्लोबल फोरम अँड अवॉर्ड्स ' या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ग्रामीण भागातील वीस उपक्रमशील महिलांना निवडून एक लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य, हाती घेतलेल्या प्रकल्पातील स्थानिक समस्या सोडवण्यासाठी लागणारे मार्गदर्शन व प्रशिक्षण वर्षभर देण्यात येणार आहे. संस्थेला यूएनडीपीतर्फे  'इक्वेटर प्राईझ' आणि यूएनएफसीसीचा 'मोमेंटम फॉर चेंज' पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. संस्थेच्या कार्यकर्त्या कमल कुंभार, गोदावरी डांगे आणि अर्चना भोसले यांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे, अशी माहिती संस्थेच्या संस्थापक संचालिका प्रेमा गोपालन यांनी दिली.

    - उपमन्यू पाटील (संचालक कार्यक्रम), ८६०५०१६७००

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com