कापूस लागवडीत ३० टक्के घट

पेरणी
पेरणी

नवी दिल्ली : मॉन्सूनने संपूर्ण देश व्यापल्यानंतरही पावसाचा जोर काही राज्ये वगळता इतर ठिकाणी पावसाचा जोर कमीच आहे. त्यामुळे खरिपाची पेरणी यंदा माघारली आहे. २९ जूनपर्यंत देशात कापसाची केवळ ३२ लाख २० हजार हेक्टरवर लागवड झाली आहे. मागील वर्षी याच काळात ४६ लाख १० हजार हेक्टरवर लागवड झाली होती. मागील वर्षीच्या तुलनेत कापूस लागवडीत यंदा तब्बल ३०.१६ टक्क्यांनी घट झाली आहे. देशातील सरासरी क्षेत्राच्या, एक कोटी १९ लाख ७५ हजार हेक्टरच्या तुलनेत आयातपर्यंत केवळ २६.८८ टक्केच लागवड झाली आहे. त्यामुळे यंदा देशात कापूस लागड घटणार असल्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.  देशात यंदा माॅन्सून वेळेच्या आधी दाखल झाला आणि वेळेआधीच पूर्ण देश व्यापला. मात्र पावसाचे प्रमाण कमी असल्याने पेरणीने वेग घेतला नाही. २९ जून २०१८ पर्यंत देशात १६५ लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली. त्यात कापूस लागवड घटल्याचे चित्र आहे. नगदी पीक म्हणून कोरडवाहू तसेच हंगामी बागायती शेतीत शेतकरी मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड करतात. मात्र २०१६-१७ च्या हंगामात पंजाब, हरियाना आणि गुजरात राज्यात बोंड अळीने धुमाकूळ घातला. पंजाब आणि हरियाना दोन्ही राज्यांमध्ये तेव्हा जवळपास ४० टक्के नुकसान झाल्याचे तेथील सरकारांनी स्पष्ट केले होते. मागील हंगामात या तीनही राज्यांनी बोंड अळी नियंत्रणासाठी कार्यक्रम राबवून नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला आणि काही प्रमाणात यशही आले.  मात्र, २०१७-१८ महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमध्ये बोंड अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला. ही तीनही राज्ये कापूस उत्पादनात अग्रेसर असल्याने त्याचा परिणाम देशातील कापूस उत्पादनावर झाला. महाराष्ट्रात बोंड अळीचा प्रादुर्भाव जास्त जाणवला. येथील शेतकऱ्यांचे ५० टक्क्यांपर्यंत नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. पहिल्याच टप्प्यात बोंड अळी आल्याने कापूस कमी दर्जाचा निघाला. कवडीयुक्त कापसाला तर मातीमोल भाव मिळाला. दर्जायुक्त कापूस नसल्याने दर नाही आणि मजुरीचे दर मात्र जास्त, यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कापूस वेचनीच बंद केली आणि कापूस सोडला.  गेल्या हंगामात बोंड अळीने हाहाकार केला. मात्र नियंत्रणासाठी सरकारी पातळीवर ठोस उपाययोजनांचा अभाव जाणवला. त्यामुळे २०१८-१९ च्या हंगामात शेतकरी पर्यायी पिकांकडे वळतील असा अंदाज तज्ज्ञांनी सुरवातीलाच व्यक्त केला होता. त्याप्रमाणेच शेतकऱ्यांनी कापूसाची लागवड कमी करुन इतर पर्यायी पिकांच्या लागवडीवर भर दिला आहे.  खरिपात कडधान्य पेरणीतही घट झाली आहे. कडधान्याची १० लाख ७ हजार हेक्टरवर पेरणी झाली होती. मागील वर्षी याच काळात १८ लाख २ हजार हेक्टरवर पेरा होता. तेलबिया लागवडीतही ४४ टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. यंदा १४ लाख ६ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. मागील वर्षी २६ लाख ९ हजार हेक्टरवर पेरणी झाली होती. मका पेरणीतही सहा टक्क्यांनी घट होऊन १५ लाख २ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com