मॉन्सूननिर्मितीसाठी पोषक वातावरण

मॉन्सूननिर्मितीसाठी पोषक वातावरण
मॉन्सूननिर्मितीसाठी पोषक वातावरण

पुणे : समुद्राच्या पृष्ठभागाच्या वाढलेल्या तापमानामुळे हिंद महासागर, दक्षिण अरबी समुद्र, बंगालच्या उपसागरात बाष्पनिर्मिती होऊन ढगांची दाटी होऊ लागली आहे. उत्तरेकडे भूपृष्ठावर हवेचा दाब कमी होऊन, दक्षिणेकडे समुद्रावर हवेचा दाब वाढू लागल्याने वाऱ्यांच्या दिशा बदलण्यास सुरवात झाली आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांसाठी (मॉन्सून) पोषक हवामान तयार होत असल्याने, लवकरच माॅन्सून उत्तर दिशेकडे चाल करेल असे संकेत आहेत. मॉन्सून येण्यापूर्वी हवेच्या दाबामध्ये बदल होतात. उत्तर भारतात हवेचे दाब कमी होऊन दक्षिण भागात विशेषत: समुद्रावर हवेचे दाब वाढतात. सध्या उत्तरेकडे हवेचे दाब कमी, तर समुद्रावर हवेचे दाब वाढू लागले आहेत. जम्मू- काश्‍मीर परिसरावर सध्या हवेचे दाब १००० हेप्टापास्कल आहेत. मध्य प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेशात १००४ हेप्टापास्कल, महाराष्ट्रावर १००६ हेप्टापास्कल, तर हिंदी महासागरामध्ये हवेचे दाब १००८ हेप्टापास्कलपर्यंत आहेत. माॅन्सूनकाळात उत्तरेकडील हवेचे दाब आणखी कमी होतील, तर दक्षिण भागात समुद्रावर दाब वाढणार आहेत.  हिंद महासागर, अरबी समुद्र, बंगालच्या उपसागरातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरी २७ अंश सेल्सिअस असते; मात्र तीन ते चार महिन्यांपासून सातत्याने वाढत सध्या ३१ अंश सेल्सिअसपर्यंत गेले आहे. समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा अधिक असल्याने बाष्पनिर्मिती होत असल्याने देशभर पूर्वमोसमी पावसाच्या सरी पडत आहेत. वाढते तापमान हे मॉन्सूनसाठी उपयुक्त असून, पावसाच्या ढगांसाठी बाष्पनिर्मितीची गरज पूर्ण होण्यास वाढते तापमान अनुकूल आहे. विषुववृत्तीय हिंद महासागर, अरबी समुद्र, बंगालच्या उपसागरात ढग गोळा होऊ लागले आहेत.  वाऱ्यांची दिशा मॉन्सूनचे आगमन होण्यापूर्वी साधारणतः हिवाळ्यात उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांना अडथळा निर्माण होऊन मध्य व दक्षिण भारतात खंडित स्वरूपात वाऱ्यांचे प्रवाह वाहतात. हळूहळू वाऱ्यांची दिशा बदलू लागते. सुरवातीला अग्नेय दिशेकडून उत्तरेकडे, दक्षिण दिशेकडून उत्तरेकडे आणि नंतर नैऋत्येकडून ईशान्येकडे होते. सध्या दक्षिण भारतातील राज्य आणि हिंदी महासागरातील वाऱ्याची दिशा बदलू लागली आहे. भूभागावर अनेक ठिकाणी नैऋत्येकडून वारे वाहत असले तरी ही दिशा कायम होण्यासाठी आणखी कालावधी लागणार आहे. मात्र, हिंद महासागरात विषुववृत्ताजवळ वाऱ्यांची दिशा बदली आहे. मात्र माॅन्सूनसाठी ठराविक उंचीपर्यंत नैऋत्य दिशेकडून सातत्याने वाहणे आवश्‍यक आहे.  मॉन्सूनपूर्वी विषुववृत्तालगत पाच अंश अक्षांशादरम्यान हवेचे दाब वेगाने कमी होतात. यामुळे या भागात चक्राकार वारे वाहून ते वादळी स्वरूप घेतात आणि वारा वेगाने उत्तरेकडे वाहू लागतो. थोडे उत्तरेकडे येताच हे वारे नैऋत्येकडून वाहू लागतात, वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे वाफेच्या स्वरूपात असलेले बाष्प लोटण्याचे काम केले जाते. यासाठी प्रचंड ताकद लागते. मॉन्सूनच्या आगमनाच्या काळात वारे दररोज सरासरी पाचशे किलोमीटर वेगाने वाहून मोठा टप्पा पार करू शकतात. माॅन्सून वारे अंदमान- निकोबार बेटांकडे वाहताना त्यांनी आणलेल्या ढगांमुळे अंदमान बेटांवर मॉन्सूनच्या पावसाचे आगमन होते. त्यापाठोपाठ वारे बंगालच्या उपसागरावरून तसेच अरबी समुद्राकडे वळून केरळ आणि उत्तर भारताकडे वाटचाल करतात. सध्या विषुववृत्ताजवळ हवेचा दाब कमी होत असून, लवकरच नैऋत्य मोसमी वाऱ्यांना चालना मिळणार असल्याचे हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले.  दक्षिण समुद्रात वाऱ्याची दिशा बदलत आहे... मॉन्सूनच्या आगमनासाठी आवश्‍यक बदल होत आहेत. मात्र, हे बदल खूपच सौम्य होत असतात. दक्षिणेकडील समुद्रामध्ये वाऱ्याची दिशा बदलत असून, नैऋत्येकडून वारे वाहताना दिसत आहे. मात्र नुकतेच हे वारे तयार होऊ लागले असून, ते तीन ते चार किलोमीटर उंचीपर्यंत सातत्याने या दिशेने वाहणे आवश्‍यक आहे. सध्या जमिनीवर तापमान वाढत असल्याने हवेचे दाब कमी होत आहेत. मात्र अधूमधून पाऊस पडत असल्याने तापमानात चढ-उतार होत आहे. माॅन्सूसाठी आवश्‍यक कमी दाब तयार होण्यासाठी तापमानवाढीत सातत्य गरजेचे आहे, अशी माहिती हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ ए. के. श्रीवास्तव यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com