खरिपाचा पेरा अद्यापही माघारलेलाच

देशातील पावसाची तूट असलेल्या कापूस उत्पादक भागात माॅन्सून पुन्हा सक्रिय झाल्यास तेथे कापूस लागवड होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात कापूस लागवड वाढून यंदाही कापसाखालील क्षेत्र मागील वर्षातील क्षेत्राएवढे राहील. - शोभना पटनायक, सचिव, कृषी सहकार आणि शेतकरी कल्याण विभाग
पेऱणी
पेऱणी

नवी दिल्ली ः देशात गुरुवारपर्यंत (ता. १२) खरिपाची ५०.१७ दशलक्ष हेक्टरवर पेरणी झाली असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत १० टक्के लागवड कमीच झाली आहे. मागील वर्षी याच काळात ५५.७५ दशलक्ष हेक्टरवर पेरा झाला होता, असे केंद्रीय कृषी मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. देशात अनेक भागांत मागील आठवडाभराच्या काळात चांगला पाऊस झाल्याने पेरणीने वेग घेतला आहे. परंतु अद्यापही बऱ्याच भागांत पाहिजे त्या प्रमाणात पाऊस झाला नसल्याने पेरणी मागील वर्षापेक्षा कमीच आहे. गुरुवारी केंद्रीय कृषी मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात खरिपाचा पेरा ५०.१७ दशलक्ष हेक्टरवर झाला आहे. मागील वर्षी याच काळात ५५.७५ दशलक्ष हेक्टरवर पेरणी झाली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा लागवडीत १० टक्के घट झाली आहे. तसेच मागील पाच वर्षातील आकडेवारीवरून काढलेल्या सरासरी क्षेत्राच्या, ५१.७२ दशलक्ष हेक्टरपेक्षा कमीच पेरणी झाली आहे. काही राज्यातील पावसाचा खंड, काही राज्यात मॉन्सून पोचण्यास झालेला उशीर आणि काही ठिकाणी कमी पाऊस यामुळे खरिपाची पेरणी यंदा कमी झाली आहे.  देशातील महत्त्वाचे भात पिकाखालील क्षेत्र मागील वर्षी १२.६९ लाख हेक्टरवर होते. यंदा भात लागवडीत आठ टक्के घट होऊन ११.६७ लाख हेक्टरवर लागवड झाली आहे. महत्त्वाच्या भात उत्पादक आसाम आणि ओडिशा राज्यात एक जून ते १३ जुलैदरम्यान सरासरीपेक्षा २५ टक्के आणि २४ टक्के कमी पाऊस झाला आहे. त्याचा परिणाम भात लागवडीवर झाला आहे. 

कापूस लागवड १५ टक्के कमीच   गेल्या हंगमात महत्त्वाच्या कापूस उत्पादक राज्यांमध्ये बोंड अळीने कहर केल्याने यंदा देशात कापूस लागवडीत घट होण्याची शक्यता आहे. गुरुवारपर्यंत देशात ७.७५ दसलक्ष हेक्टरवर कापसाची लागवड झाली होती. मागील वर्षी याच काळात ९.०८ दशलक्ष हेक्टरवर लागवड झाली होती. यंदा लागवडीत १५ टक्के घट झाली आहे. गुजरात हे कापूस उत्पादनात महत्त्वाचे राज्य आहे. तेथील कापूस पट्ट्यात सरासरीच्या २६ टक्के कमी पाऊस झाला असून त्याचा परिणाम लागवडीवर झाला आहे. परंतु कृषी सहकार आणि शेतकरी कल्याण विभागाचे सचिव शोभना पटनायक यांनी म्हटले आहे, की देशात येणाऱ्या काळात कापूस लागवड वाढून गेल्या वर्षीएवढेच क्षेत्र राहणार आहे.  

लागवड वाढण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने येणाऱ्या काही दिवसांमध्ये पश्चिम किनारी भाग, दक्षिण कर्नाटकचा अंतर्गत भाग, गुजरात, मध्य महाराष्ट्र, मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड, पूर्व राजस्थान, पशिम उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. या भागात अद्यापही अनेक पिकांची पेरणी कमी झालेली आहे. त्यामुळे या भागात रखडलेली पेरणी जोर धरण्याची शक्यता आहे. परिणामी देशातील खरिपाखालील क्षेत्र येणाऱ्या काळात वाढण्याची शक्यता आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com