पावसाच्या खंडाने शेतकरी धास्तावला; पेरण्या रखडल्या

जमिनीत पहिल्या पावसाचा ओलावादेखील आहे. या ओलाव्यामुळे आता तण उगवून येईल. मात्र, पेरा केल्यास पुढे दुबार पेऱ्याचे संकट किंवा तण काढण्याचा मजुरी खर्च अशा समस्येला शेतकऱ्याला तोंड द्यावे लागेल. त्यामुळे सध्याचे उगवलेले तण काही दिवस थांबून पेरा केल्यास आपोआप मोडले जाईल. अशी ‘तणमोड’ केल्यास खर्चही वाचेल. पावसाचा खंड पडलेला आहे. मात्र, शेतकऱ्यांनी सैरभैर न होता पावसाची वाट पहावी. त्यानंतर अंदाज घेऊन पेरणीचे नियोजन करावे. - डॉ. अशोक ढवण, कुलगुरू, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ
पेरणी
पेरणी

पुणे : वाजतगाजत आलेला माॅन्सून राज्याचा उंबरा ओलांडून परागंदा झाल्यामुळे शेतकरी राजा धास्तावला आहे. राज्यात किमान २३ जूनपर्यंत पावसाचा खंड राहण्याची शक्यता असली तरी कृषी विभागाने अधिकृत कोणताही सल्ला प्रसारित केलेला नाही.  दरम्यान, जमिनीत सध्या ओलावा असला तरी पेरा केल्यास दुबार पेरणीचे संकट ओढावू शकते, असे मत शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे.  २० जूनपर्यंत पेरण्याची घाई करू नये, असा सल्ला सात दिवसांपूर्वी कृषी विभागाने दिला होता. त्यानंतर माॅन्सूनने राज्यात प्रवेश करीत काही भागात जोरदार वृष्टी केली होती. आता मात्र पुढील एक-दोन आठवडे पावसाचा खंड राहण्याचे संकेत मिळाले आहेत. आतापर्यंत खरिपाचा फक्त ४५ हजार हेक्टरवर पेरा झाला आहे. गेल्या खरीप हंगामाच्या तुलनेत पेरण्या ३३ टक्क्यांनी मागे आहेत. ‘‘हवामान विभागाने पावसाचा खंड २३ जूनपर्यंत राहण्याची शक्यता वर्तविली असली तरी कृषी विभागाने अमुक एका तारखेपर्यंत पेरा करू नका असे घोषित केलेले नाही. मुळात राज्यात जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून माॅन्सून सुरू होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरण्याच कारण नाही’’, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.  माॅन्सूनची लपाछपी बघता राज्यातील शेतकऱ्यांनी निश्चित काय भूमिका घ्यावी, असे कृषी विभागातील काही अधिकाऱ्यांना विचारले असता ‘‘वरिष्ठांच्या परवानगीशिवाय आम्ही बोलू शकत नाही,’’ असे सांगण्यात आले. कृषी आयुक्तालयात बुधवारी एकही अधिकारी जागेवर नव्हता. ‘‘साहेब मंडळी मंत्रालयात बैठकीला गेले आहेत. त्यांच्याशिवाय पीकपेऱ्याची माहिती आम्हाला देता येणार नाही’’, असे काही कर्मचाऱ्यांनी सांगितले. राज्यात यंदा १४० लाख हेक्टरवर खरिपाचा पेरा होण्याची शक्यता आहे. त्यापैकी जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ४५ हजार हेक्टरवर पेरा झाला. गेल्या हंगामात याच कालावधीत ६८ हेक्टरपर्यंत पेरा झाला होता. शेतकऱ्यांनी आतापर्यंत ३२ हजार हेक्टरवर धान तर १२ हजार हेक्टरवर कापूस पेरला आहे. कृषी शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, सध्या शेतकऱ्यांनी पेरण्याची घाई करू नये. पुढील काही दिवसांत मान्सूनचा राज्यात पुनर्प्रवेश होईल. त्यामुळे जमिनीचा ओलावा दीर्घकाळ टिकणारी स्थिती तयार झाल्यास पेरा करता येईल.  कृषी विभागातील एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, जूनच्या शेवटच्या आठवडयापासून पेरण्या सुरू होतात. १५ जुलैपर्यंत राज्यभर पेरण्यांना वेग घेतात. त्यामुळे सध्या पेरा लांबला असे म्हणता येत नाही. तसेच, राज्यात माॅन्सून यंदा लवकर आलेला आहे. त्यामुळे पावसाचा खंड पडला असेदेखील म्हणता येणार नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com