अमरावती : सुमारे बारा एकरांरील सोयाबीनला शेंगाच धरल्या नसल्याने पीक हातचे गेल्याची जाणीव झालेल्या शेतकऱ्याने सहा एकरांरील पिकावर नांगर फिरविला. सुभाष विघे असे या शेतकऱ्याचे नाव असून ते जळका हिरापूर येथील रहिवासी आहेत.
भातकुली तालुक्यात पावसाने दिलेला खंड आणि तापमानात झालेली वाढ यामुळे फुलधारणेच्या अवस्थेत असलेल्या सोयाबीनला फटका बसला. पिकावर कीडरोगांचा प्रादुर्भाव झाला. परिणामी फूल आणि त्यानंतर शेंगाही धरल्या नाहीत.
८ हजार ६०० हेक्टरवरील सोयाबीनला शेंगाच नाही तर ९ हेक्टरवरील क्षेत्र कीडरोगाने प्रादुर्भावग्रस्त आहे. या पिकाची लागवड व व्यवस्थापन खर्चाची भरपाईदेखील शक्य नसल्यामुळे शेतकरी पिकावर नांगर फिरवित आहेत. दिवाळीच्या तोंडावर घडलेल्या या प्रकारामुळे शेतकऱ्यांना सण साजरा करण्यासाठी लागणाऱ्या पैशाची सोय कशी करावी, अशी विवंचना लागली आहे.
सुभाष विघे यांच्याकडील संयुक्त कुटुंबाची १२ एकर जमीन. यातील सहा एकरांवर सलग तर सहा एकरांत तुरीत आंतरपीक म्हणून सोयाबीन घेतले आहे. या १२ एकरांवरील सोयाबीनला शेंगाच धरल्या नाही. याप्रकरणी त्यांनी रितसर तक्रार केली. त्यानंतर कृषी सहायक व तलाठ्यांनी पाहणी केली. मात्र त्यानंतर याप्रकरणी काहीच हालचाल झाली नाही. अखेरीस त्रस्त सुभाष विघे यांनी सहा एकरांवरील सोयाबीनवर नांगर फिरविला. अधिकाऱ्यांकडून पुन्हा सर्वेक्षण होणार असल्याचे सांगितल्याने त्यांनी तुरीतील सोयाबीन कायम ठेवले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.