टोमॅटोला पाकिस्तानची सीमा उघडण्याची प्रतीक्षा

भारतीय टोमॅटोचा पाकिस्तान हा सर्वांत मोठा आयातदार देश आहे. नाशिक व नारायणगाव येथून हंगामात प्रति २० टन वजनाच्या दररोज २५० ट्रक बांगलादेश व पाकिस्तानात पाठविल्या जातात. सीमा बंदीचा मात्र दर वेळी व्यापाराला फटका बसतो. त्यावर कायमस्वरूपी उपाय योजना होणे गरजेचे आहे. - नसीम अहमद, टोमॅटो निर्यातदार.
टोमॅटो
टोमॅटो

नाशिक : भारतीय टोमॅटोचा लगतचा पाकिस्तान हा सगळ्यात मोठा आयातदार आहे. या दोन देशांतील तणावाचा फटका भारतीय टोमॅटोला नेहमी बसत आला आहे. भारतातून ट्रकद्वारे किमान ५० हजार टन टोमॅटो माल हंगामात पाकिस्तानला निर्यात होतो. बांगलादेशातही तब्बल ३० हजार टनांची निर्यात होते. मात्र, हे सगळंच गणित सीमेवरील स्थितीवर अवलंबून असते.  भारतात आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, ओरिसा, पश्‍चिम बंगाल, बिहार, गुजरात, छत्तीसगड, तमिळनाडू, झारखंड या राज्यांत वेगवेगळ्या हंगामामध्ये टोमॅटोचे उत्पादन होते. मात्र, महाराष्ट्र, कर्नाटक व गुजरात या राज्यात वर्षभर तिन्ही हंगामात टोमॅटोचे उत्पादन घेतले जाते. देशातील या सर्व राज्यांतील टोमॅटो उत्पादक मागील ७ महिन्यांपासून मोठ्या संकटात सापडले आहेत. टोमॅटोला प्रतिकिलोला किमान १० रुपये खर्च येतो. मात्र, डिसेंबर २०१७ पासून टोमॅटोला प्रतिकिलोला ३ ते ५ रुपये असा दर मिळत असल्याने उत्पादकांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे.  महाराष्ट्रात नाशिक व नारायणगाव हे टोमॅटोचे आगर आहेत. या भागातून हंगामात दररोज २५० ट्रक टोमॅटो पाकिस्तान व बांगलादेशच्या बाजारपेठेत पाठविले जातात. पुणे जिल्ह्यातील नारायणगावचा हंगाम सद्या सुरू आहे. यानंतर नाशिक जिल्ह्यातील हंगाम सुरू होण्याच्या तयारीत आहे. मागील ७ महिन्यांपासून टोमॅटो उत्पादकांना खर्च निघेल इतकेही उत्पन्न मिळाले नाही. हेच मंदीचे सावट पुढील हंगामावर आहे. पाकिस्तान सीमा बंद आहे. ती साधारण १० ते १५ ऑगस्टदरम्यान भारतीय भाजीपाल्यासाठी खुली होईल. या दोन देशांतील तणावाचे संबंध पाहता सीमा निर्धारित वेळेत खुली होईल का? निर्यात सुरळीत सुरू राहील का? याबाबत साशंकता आहे. मागील अनेक वर्षांपासून ऐन हंगामात भारतीय शेतमालासाठी सीमा बंद होण्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. याबाबत वाणिज्य मंत्रालयाने महत्त्वपूर्ण पावले उचलावीत व भारत-पाक सीमा टोमॅटोसाठी संपूर्ण हंगामभर खुली राहील, असे प्रयत्न करावेत, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

प्रतिक्रिया दर वेळी हंगाम सुरू असतानाच बऱ्याचदा सीमा बंद होते. १५ ऑगस्ट व ईद सणादरम्यान तर ती हमखास बंद होते. ही संधी साधून व्यापारीही भाव पाडतात. त्यात नुकसान शेतकऱ्याचेच होते. केंद्र शासनाने याबाबतीत तातडीने लक्ष घालून भारतातील टोमॅटो उत्पादकांना न्याय द्यावा. - आत्माराम कुशारे, सावरगाव, ता. निफाड, जि. नाशिक 

मागील ७ महिन्यांपासून टोमॅटो उत्पादकांना खर्च निघेल असा दर मिळालेला नाही. पाकिस्तान हा महत्त्वाचा खरेदीदार देश आहे. मात्र, बहुतांश काळ पाक सीमा बंद असल्याने त्याचा फटका टोमॅटोला बसतो. येत्या काळात महाराष्ट्रातील हंगाम सुरू होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर सीमा खुली होणे गरजेचे आहे. या संदर्भात केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांना पत्र लिहून याबाबतीत लक्ष घालण्याची विनंती केली आहे. - दीपक चव्हाण,   शेतमाल बाजार विश्‍लेषक, पुणे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com