Team Agrowon
चीन येत्या काही महिन्यांत कोरोना निर्बंध पूर्णपणे उठवण्याची शक्यता आहे. त्यामुळे झिरो कोरोना पॉलिसी संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत.
त्यामुळे चीनमधील अर्थकारणाला गती मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. चीनच्या निर्बंधांमुळे इतर देशांवरही मोठा परिणाम झाला असून जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे.
चीनने निर्बंध उठवल्यावर पुरवठा साखळी सुरळीत होण्यासाठी मदत होईल. भारतातील शेतकऱ्यांसाठी या घडामोडी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. प्रामुख्याने कापूस आणि सोयाबीनची मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पिकांचे भाव वाढण्याची चिन्हे आहेत.
चीन येत्या काही दिवसांत कोविड-१९ क्वारंटाईन प्रोटोकॉल शिथिल करण्याची शक्यता आहे. तसेच कोरोना चाचण्यांचे प्रमाणही कमी केले जाणार आहे.
चीन सरकारने झिरो कोरोना पॉलिसीची अंमलबजावणी करण्यासाठी नव्याने कडक निर्बंध लागू केले होते. त्याची लोकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली.
देशातील कोरोनाबाधितांची संख्या कमी झालेली नाही. ती विक्रमी पातळीवर स्थिर आहे. परंतु गेल्या काही दिवसांत अनेक शहरांनी लॉकडाऊन उठवला आहे.
तसेच विषाणूची रोगकारक क्षमता कमी झाल्याचे उप पंतप्रधानांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर निर्बंध शिथिल करण्याच्या निर्णयाप्रत सरकार आल्याचे बोलले जात आहे.
अर्थात प्रशासकीय यंत्रणेकडून निर्बंध मागे घेण्यासंदर्भात अधिकृत निवेदन करताना त्यात निदर्शनांचा उल्लेख दिसत नाही. निदर्शनांमुळे कोरोना निर्बंध मागे घेतले, हे सरकारला अधिकृतरित्या मान्य करायचे नाही.
परंतु चीनमध्ये कोरोना निदर्शनांच्या रूपाने गेल्या अनेक वर्षांत पहिल्यांदाच सविनय कायदेभंगाची घटना घडली आहे. आंदोलनाचे लोण झपाट्याने पसरत गेले.
बिजिंगमध्ये मेणबत्त्या मार्च ते ग्वांगझूमध्ये पोलिसांशी हिंसक झटापट असा मोठा पट या आंदोलनाने धारण केला.
चीनमध्ये झिरो कोरोना पॉलिसीची अंमलबजावणी करण्यासाठी सकारकडून टोकाचे प्रयत्न केले जात होते. एक जरी पॉझिटिव्ह रूग्ण आढळला तरी संबंधित परिसरात कित्येक आठवडे कडक लॉकडाऊन केला जायचा.
त्यामुळे लोकांमध्ये संतापाची भावना धुमसत होती. त्याचा गेल्या आठवड्यात भडका उडाला. विविध प्रांतांत सरकारच्या निर्बंधांविरोधात लोकांनी रस्त्यावर येऊन उग्र निदर्शने सुरू केली.