टीम ॲग्रोवन
जव्हार, जि. पालघर : जव्हार तालुक्यातील ग्रामीण तथा आदिवासी भागामध्ये रोजगाराची कमतरता आणि कौशल्यपूर्ण शिक्षणाच्या अभावामुळे येथे नेहमीच आर्थिक अडचणी असतात.
शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून येथील आर्थिक परिस्थिती उंचावण्यासाठी लाभदायक ठरत आहेत. या योजनांपैकीच एक योजना ही विलासराव देशमुख अभय योजना महावितरणने सुरू केली आहे.
या योजनेस मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याने जव्हार तालुक्यातील वीजपुरवठा खंडित झालेल्या सहा हजार ग्राहकांना अभय योजनेचा कालावधी ३१ डिसेंबरपर्यंत वाढल्याने दिलासा मिळत आहे.
या योजनेनुसार थकबाकीची मूळ रक्कम हप्तेवारीने अथवा एकरकमी भरल्यास त्यावरील व्याज आणि विलंब आकार पूर्णतः माफ करण्यात येत आहे.
योजनेनुसार ३१ डिसेंबर २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी थकबाकीपोटी कायमचा वीजपुरवठा खंडित केलेले सर्व बिगर कृषी उच्चदाब आणि लघुदाब ग्राहक या योजनेत पात्र होते.
या योजनेचा कालावधी सहा महिन्यांसाठी (एक मार्च २०२२ ते ऑगस्ट २०२२ पर्यंत) होता.
ही योजना कृषी ग्राहक वगळून सर्व वर्गवारीतील ग्राहकांना लागू आहे.
योजनेत ग्राहकांनी थकबाकीची मूळ रक्कम एकरकमी भरली तर त्यांच्या थकबाकीवरील व्याज व विलंब आकार १०० टक्के माफ करण्यात येणार आहे.
लघुदाबाच्या वीज जोडणीसाठी मूळ थकबाकीच्या ९० टक्के आणि सोबतच अर्ज मंजुरीच्या ३० दिवसांच्या आत आवश्यक कायदेशीर शुल्क भरावे लागेल.