टीम ॲग्रोवन
दिवाळी सणाला शहरातील सुवर्ण बाजार लाभदायी ठरला आहे. एकट्या धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने खरेदीचा उच्चांक झाला.
एकाच दिवसात शहरासह जिल्ह्यात ५० किलोपेक्षा अधिक सोन्याची विक्री झाली.
सुमारे २५० कोटींपेक्षा अधिक रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज सुवर्ण व्यावसायिकांनी वर्तविला आहे.
मोठ्या शोरूममध्ये तर ग्राहक सोने खरेदीसाठी ‘वेटिंग’वर दिसून आले. शोरूमध्ये प्रचंड गर्दी होती.
तब्बल दोन वर्षांनंतर धनत्रयोदशीला एवढ्या मोठ्या प्रमाणात उलाढाल झाली आहे. सर्वच बाजारपेठांमध्ये गर्दीचा उच्चांक पाहायला मिळाला.
दिवाळीत येणाऱ्या धनत्रयोदशीला नवीन सोने खरेदीने वर्षभर सुवर्ण खरेदीचा योग येतो, असे सांगितले जाते.
जळगावचा सुवर्ण बाजार राज्यासह इतर भागात प्रसिद्ध आहे. मध्य प्रदेश, गुजरात, विदर्भातील ग्राहकही जळगावात सोने खरेदीसाठी येतात. सुवर्णरूपी धनाची, पैशांची पूजा केली जाते.
धन्वंतरी जयंती असल्याने धन्वंतरी देवतेची आराधना करून सुदृढ आरोग्याची मनोकामना केली जाते. यामुळे धनत्रयोदशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
सुवर्ण बाजारात सोन्याचे विविध प्रकारचे आकर्षक दागिने, फॅन्सी दागिने, मणी मंगळसूत्र, बांगड्या, अंगठी, ब्रेसलेट आदींना मोठी मागणी होती. काहींनी सुवर्ण चीपही खरेदी केल्या.