Team Agrowon
मुळात इतक्या संख्येने हे कामगार ऊसतोडणीसाठी स्थलांतर का करतात? ऊसतोडणीच्या कामास दुसरा काही पर्याय मिळू शकतो का?
शासनाच्या कल्याणकारी योजना (मनरेगा व इतर) या कामगारांपर्यंत का पोहोचू शकत नाहीत? गावी (Village) आणि उसतोडणीच्या ठिकाणी या मजुरांच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनावर काय परिणाम होतो?
या मजुरांना दैनंदिन गरजा भागवण्याऐवढे वेतन मिळते का? या कामगारांची सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमी काय आहे? शिक्षणाची काय अवस्था?
शैक्षणिक (Education) आणि भौतिक सोयीसुविधांसाठी धोरण अद्याप का बनवले नाही? आरोग्याच्या समस्या काय आहेत? हे प्रश्न आहेतच. याशिवाय प्रत्यक्ष राहण्याच्या आणि कामाच्या ठिकाणी असणारे प्रश्न वेगळे आहेत.
उदा. ऊसतोडणीचा योग्य भाव-दर न मिळणे, मुकादमांचे कमिशन, सर्व मजुरांना ओळखपत्र आणि सेवापुस्तक नसणे, बसपाळी भत्ता, गाडीभाडे, मजुरांचा विमा प्रश्न, अपघात विमा, जनावरांचा-झोपडीचा विमा, कारखान्यांवर रेशन मिळण्याचा प्रश्न, अपुऱ्या सुविधा,
अशुद्ध पाणी, राहतात तेथे वीज नसणे, झोपडी-पालं असणारी घरे, मुलांच्या शिक्षणाचे प्रश्न, आरोग्याचे प्रश्न, गर्भपाताची समस्या, महिला कामगारांची गर्भपिशवी काढण्याची समस्या, शौचालय नसणे, कर्जबाजारीपणाचे चक्र, सुरक्षा, आत्मसन्मान अशा कितीतरी प्रश्न-समस्यांना हे कामगार (Worker) तोंड देत उपजीविकेसाठी ऊसतोडणीचे काम करत आहेत. या सर्व प्रश्न-समस्यांवर महामंडळाला हळूहळू मार्ग काढावा लागणार आहे.