Team Agrowon
अलीकडे बहुतांश शेतकरी ठिबक आणि अन्य सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर करू लागली आहेत.सुक्ष्मसिंचनातून आवश्यक अन्नद्रव्ये पुरविण्यासाठी पाण्यात संपूर्ण विरघळणाऱ्या खतांचा वापर केला जातो.
विद्राव्य खते
पाण्यात विरघळणाऱ्या अन्नद्रव्यांना विद्राव्य खते म्हणतात. त्यांच्या वापर ठिबक सिंचनासोबत फवारणीद्वारेही करता येतो.
विद्राव्य खताचा वापर केल्यास खताची नासाडी होत नाही. पीक फुलोऱ्यात येण्याचा काळ, फळधारणा झाल्यानंतर तसेच बिया, फळांची वाढ होण्याकरिता जेव्हा अन्नद्रव्ये जास्त प्रमाणात लागतात अशा वेळेस फवारणीद्वारे दिलेली खते खूप उपयोगी पडतात.
ही खते पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार द्यायची असतात. सध्या बाजारामध्ये प्रमुख आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये असलेली खते उपलब्ध आहेत.
फवारणीतून दिलेली खते जमिनीतून दिलेल्या खतांना पर्यायी होऊ शकत नाहीत. मात्र फवारणीतील खते अचानक निर्माण झालेल्या पानांतील अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढतात.
पिकांची पाने अन्नद्रव्यांचे शोषण करू शकतात. परंतु या पद्धतीने अन्नद्रव्यांचे शोषण फारच कमी प्रमाणात केले जाते. फवारणीद्वारे अन्नद्रव्ये देताना द्रावणातील अन्नद्रव्यांचे प्रमाण अत्यंत कमी असावे.