Team Agrowon
आंबा हंगाम अंतिम टप्प्यात असून आंब्याचा तुटवडा असल्यामुळे पेटीचा दर साडेतीन ते चार हजारांवर स्थिर राहिला आहे.
कॅनिंगच्या आंब्याचा दर देखील प्रतिकिलो ६० रुपये आहे. पूर्व पट्ट्यातील आंबा अजूनही बाजारपेठेत आलेला नाही.
फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीपासून किरकोळ आंबा बाजारपेठेत येऊ लागला. पहिल्या टप्प्यातील आंब्याची आवक मार्चच्या दुसऱ्या आठवड्यानंतर वाढली. त्यावेळी साडेचार हजारांपर्यंत पेटीचा दर होता.
देवगड हापूसकरिता ओळखल्या जाणाऱ्या देवगड बाजारपेठेत प्रतिडझन १ हजार ते १२०० रुपये दर होता. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील आंबा बाजारपेठेत आला. याचवेळी जिल्ह्यातील तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली.
तिसऱ्या टप्प्यातील मोहोराचे प्रचंड नुकसान झाले.त्यामुळे मे मध्ये येणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील आवक कमी झाली. सध्या अतिशय किरकोळ स्वरुपातील आंबा बाजारपेठेत येत आहे.
मे च्या दुसऱ्या आठवड्यात पूर्व पट्ट्यातील आंबा बाजारपेठेत येतो.त्या कालावधीत आंब्याचे दर काहीसे कमी होतात.
पूर्व पट्ट्यातील आंबाच अजूनही बाजारपेठेत न आल्यामुळे आणि देवगड परिसरातील आंब्याची आवक कमी असल्याने आंब्याचे दर आजही प्रतिपेटी साडेतीन ते चार हजारांवरच टिकून आहेत.