Team Agrowon
कोल्हापूर जिल्ह्यातील्या राधानगरी तालुक्यातील ठिकपुर्ली हे सुमारे सहा हजार लोकसंख्या असेलेलं गाव भाजीपाला पिकांसाठी प्रसिद्ध आहे.
१९९० च्या सुमारास गावातील काही शेतकऱ्यांनी घरगुती स्वरूपात बर्फी तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला. अलीकडील काही वर्षांत सुमधुर बर्फीच्या माध्यमातून गोडवा निर्माण करणारे गाव अशी ठिकपुर्लीची ओळख तयार झाली आहे.
गावातील ८० टक्के कुटुंबांकडे १ ते १० संख्येपर्यंत म्हशी आहेत. तर गावात बर्फी निर्मिती करणारे सुमारे पंधरा व्यावसायिक आहेत.
या बर्फी व्यावसायिकांकडून दिवसाला १५०० लिटर एवढ्या दुधाची मागणी असते. दररोज सकाळी सहा वाजता बर्फी बनविण्याच्या कामाला सुरुवात होते.
धगधगत्या चुलीवर दुधाला उकळी दिली जाते. दररोज सुमारे ४०० किलो म्हणजे १३ ते १४ हजार बर्फी नगांची निर्मिती होते. निव्वळ खव्याची बर्फी म्हणून ठिकपुर्लीची बर्फी केवळ जिल्ह्यातच नव्हे तर जिल्ह्याबाहेरील ग्राहकांच्याही पसंतीस उतरली आहे.
बर्फी जिभेवर येताच त्याचा विशिष्ट स्वाद आणि खमंगपणा जाणवतो. सुरुवातीला काही किलोमध्ये विकल्या जाणाऱ्या बर्फीची आता दररोज एक लाख रुपयांपुढे उलाढाल होत असावी.
परिसरातील दुकानदारांसह जिल्ह्यातील काही गावे, निपाणी परिसर आणि कोकणात विकण्यासाठी येथून बर्फी जाते. मुंबई पुण्यालाही बर्फी पाठविली जाते.