Raw Sugar Export: साखर निर्यातीचा वेग मंदावला

Team Agrowon

केंद्र सरकारने साखर निर्यातीवर मर्यादा घातल्यापासून निर्यातीची गती अतिशय संथ झाली आहे. कारखाना व बंदरांवर सुमारे सहा लाख टन कच्ची साखर शिल्लक आहे.

केंद्र सरकारने या साखरेबाबत तातडीने निर्णय न घेतल्यास पूर्ण साखर खराब होण्याचा धोका आहे. कारखानदार व निर्यातदार अजूनही गोंधळलेल्या स्थितीत असून शिल्लक साखरेचे करायचे काय, असा प्रश्‍न साखर उद्योगासमोर उभा आहे.

पंधरवड्यापूर्वी केंद्रातील प्रमुख अधिकाऱ्यांसोबत साखर उद्योगाच्या प्रतिनिधींची बैठक झाली होती, या वेळी किमान कच्च्या साखरेच्या निर्यातीला तरी परवानगी द्या, अशी मागणी साखर उद्योगाने केली होती.

त्या बैठकीत अधिकाऱ्यांनी सकारात्मकता दाखवली असली तरी अजूनही प्रत्यक्ष निर्णय झालेला नाही. यामुळे साखरेचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

देशामध्ये हंगामाच्या सुरुवातीला बहुतांश साखर कारखाने कच्च्या साखरेची निर्मिती करतात. यंदा हा सिलसिला हंगामाच्या शेवटपर्यंत सुरू राहिला. गेल्या दोन वर्षांपासून भारताने ब्राझील व थायलंड या प्रतिस्पर्धी देशापेक्षा सरस कामगिरी करत कच्ची साखर निर्यात केली आहे.

कच्ची साखर देशांतर्गत बाजारात खाण्यासाठी थेट विकली जाऊ शकत नसल्यामुळे त्याची खुल्या बाजारात विक्री होणे अशक्य असते. ही साखर जास्त काळ चांगल्या स्थितीत राहू शकत नाही. साखरेच्या निर्मितीनंतर ठरावीक कालावधीच्या आत साखर अपेक्षित ठिकाणी पोहोचणे गरजेचे असते.

साखरेचे संभाव्य नुकसान पाहता येत्या काही दिवसांमध्ये केंद्र शासन किमान कच्च्या साखरेच्या निर्यातीला परवानगी देऊ शकते, असे केंद्रीय सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.