Team Agrowon
केंद्र सरकारने वेलचीच्या निर्यातीला परवानगी दिली आहे. त्यामुळे वेलचीच्या निर्यातीत वाढ झाल्याने भावात सुधारणा झाली आहे. पंधरा दिवसांपूर्वी १४०० रुपये किलो असलेली वेलची आता २४०० रुपयांवर गेली आहे. पंधरा दिवसांत भावात प्रतिकिलो १००० रुपये सुधारणा झाली आहे.
इंधन, जीवनावश्यक वस्तू, वीज दर, सिलिंडर आणि टोल टॅक्सच्या दरवाढीसोबत आता सणासुदीच्या दिवसांत वेलचीच्या मागणीतही वाढ झाली आहे. यामुळे दरात प्रतिकिलो १००० रुपयांनी सुधारणा झाली आहे.
भारतात सर्वाधिक मसाल्याच्या पदार्थांचे उत्पादन केरळमध्ये होते. महाराष्ट्रात सर्वाधिक वेलचीची आवक केरळातूनच होते; मात्र गत महिनाभरापासून वेलचीला परदेशातून मागणी वाढली आहे. त्यातच उत्पादन घटल्यामुळे वेलचीचे दर गत एक महिन्यापासून सुधारत गेले आहेत.
वेलची आरोग्यासाठी महत्त्वाची आहे. अॅसिडिटी, तणाव, रक्तदाब, बद्धकोष्ठता, युरीन इन्फेक्शन, पचनाचा त्रास अशा विविध विकारांसाठी वेलची उपयुक्त आहे.
पण मसाल्याच्या पदार्थांतून वेलची बेपत्ता होण्याच्या मार्गावर असल्याने त्याचा धोका आरोग्यालाही निर्माण होऊ शकतो.
वेलचीच्या निर्यातीला केंद्र सरकारने हिरवी झेंडी दाखविली आहे. त्यामुळे निर्यात वाढली असताना देशात उत्पादनही कमी झाले आहे.