Rain : पावसाचा जोर वाढल्याने पाणी नदीपात्राच्या बाहेर!

Team Agrowon

राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस (Heavy Rain) बरसतोय. त्यामुळे राज्याच्या अनेक भागात पूरस्थिति (Flood Condition) निर्माण झालीय. काही भागात खरीप पिकांचं (Kharip Crop) मोठं नुकसान झालं आहे. कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातलाय.

मंगळवारी दुपारपर्यंत जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहिला. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश नद्यांमधून पाणी (River Water) पात्राबाहेर पडलं. जिल्ह्यातील विविध नद्यांवरील एकूण ७१ बंधारे दुपारी दोन वाजेपर्यंत पाण्याखाली गेले.

पावसाचा जोर कमी झाला नाही तर येत्या दोन दिवसांत बहुतांशी धरणातून पाणी (Dam Water) सोडण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले आहे. मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासांत गगनबावड्यात सर्वाधिक १०० मिलिमीटर पाऊस झाला.

पंचगंगा नदीची पातळी मंगळवारी दुपारी एक वाजता राजाराम बंधारा येथे ३७ फूट ७ इंच इतकी होती. या ठिकाणी इशारा पातळी ३९ फूट, तर धोका पातळी ४३ फूट आहे. कृष्णा-वारणा नद्यांच्या पाणीपात्रामध्ये झपाट्याने वाढ होत आहे.

चांदोली धरणाचे (Chandoli Dam) वक्राकार दरवाजे खुले झाले आहेत. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

जिल्ह्यातील एकूण १८ मार्ग पाणी आल्यामुळे बंद आहेत. अनेक ठिकाणी १०० मिलिमीटरपेक्षा जादा पाऊस झाला. यामध्ये आंम्ब्यामध्ये १९०, भुदरगड तालुक्यातील कडगावात १५७, आजारात तालुक्यातील गवसेमध्ये १३० मिमी पाऊस झाला.

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील सर्व नद्यांमधून अलमट्टी धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे. मंगळवारी दुपारी दोन वाजेपर्यंत अलमट्टीतून सव्वा लाख क्युसेक प्रतिसेकंद इतक्या पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू होता.

वारणा धरणातून ५ हजार क्युसेक पाणी वारणा नदी पात्रात येत आहे. त्यामुळे प्रशासनाने सर्वांना दक्षतेच्या सूचना दिल्या आहेत.