Team Agrowon
कोकणातील मालवण येथील समुद्रात असलेल्या आंग्रिया बॅंक या प्रवाळ बेटाचा १६ शास्त्रज्ञांकडून सागरी मोहिमेद्वारा अभ्यास होणार आहे.
खरेतर जागतिक पातळीवर १९६० च्या दशकापासून प्रवाळ बेटांचे सर्वेक्षण आणि अभ्यास केला जातोय.
समुद्राचे वाढते प्रदूषण, समुद्राच्या पाण्याचे वाढत असलेले तापमान, कार्बन डाय-ऑक्साईड वायूचे वाढते उत्सर्जन, मॅंग्रूव्ह वनांची होत असलेली तोड अशा अनेक कारणांमुळे प्रवाळ बेटे नष्ट होत आहेत.
वातावरणातील वेगाने होत असलेल्या बदलामुळे अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, कॅरिबियन समुद्र व ऑस्ट्रेलियातील ग्रेट बॅरिअर रिफमधील प्रवाळ बेटे २०५० पर्यंत नष्ट होतील, असा इशारा दशकभरापूर्वी ‘इंटरगव्हर्नमेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज’ने (आयपीपीसी) दिला आहे.
त्यामुळे प्रवाळ बेटे वाचविण्यासाठी ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, कोलंबिया या देशांनी प्रयत्न सुरू केले आहेत.
आपल्या देशातही लक्षद्वीप, कच्छ, अंदमान-निकोबार बेटे आणि कोकणातील समुद्रात प्रवाळ बेटे आहेत.
यामध्ये कोकणातील विजयदुर्गच्या पश्चिमेला समुद्रात २० मीटर खोलीवर असलेले आंग्रिया बॅंक नावाचे प्रवाळ बेट संशोधनाच्या पातळीवर दुर्लक्षितच म्हणावे लागेल. या बेटावर गोव्याच्या राष्ट्रीय सागर विज्ञान संस्थेमार्फत संशोधनाचे काम सुरू असते.