Team Agrowon
लग्न हे इर्षा करण्याचे मैदान नाही किंवा संपत्ती व मोठेपणा मिरवण्यासाठीचा एकमेव मार्ग नाही तसेच भोगल्याशिवाय पर्याय नाही अशी कोणतीही शिक्षा नाही.
मोठेपणा मिरविण्याच्या इर्षेपोटी आणि पै- पाहुण्यांच्या ' बिनकामच्या पोकळ ' अग्रहापोटीच कित्येक पोरींच्या बापांनी आत्महत्या केल्या तर कित्येक कुटुंबे तोळा - अर्ध्या तोळ्याच्या पै - पाहुण्यांच्या इर्षेच्या/अहंकाराच्या वादात देशोधडीला लागलेली मी स्वतः समाजात आणि कोर्टात बघितली आहेत आणि बघतोच आहे.
आता मात्र या लग्न विषयावर विचार करावीच लागेल. मी कोर्टात वकिली करत असताना लग्नातल्या अंदाधुंद खर्चाने लग्नानंतर आलेल्या पैशाच्या अडचणीतून भांडणे सुरू झाल्याने कुटुंबाकुटुंबात आणि नवरा - बायकोत होणारी भांडणे विकोपाला गेलेली आणि त्याचा शेवट घर फुटण्यात आणि सोडचिठ्ठी झाल्यात स्वतः बघितली आहेत.
कोणी स्पष्टपणे बोलेल की नाही मला माहीत नाही पण मला मनापासून आणि प्रामाणिकपणे सांगावे वाटते की, कोणतेही लग्न हे लग्नातील विधी केल्याच्या कारणावरून यशस्वी होत नाही आणि लग्नात विधी न केल्याचा कारणावरून तुटत नाही.
पत्रिका आणि आकाशातील ग्रहताऱ्यांवरून कोणाचेही भविष्य ठरत नाही असा माझा ठाम विश्वास आहे.
नाहीतर तुकाराम महाराजांनी सांगून ठेवलेच आहे की,
वेदांचा तो अर्थ अम्हाशीच ठावा ,येरांनी वहावा भारमाथा !
आणि विशेष बाब अशी की, एखादा अपवाद वगळता "धूमधडाक्यात मोठं लग्न करा.." असे म्हणणारा कोणताही पाहुणा,भावकी किंवा मित्र - मैत्रीण लग्नानंतरच्या आर्थिक अडचणीत मदत करून साथ देत नाही. ज्यांची आर्थिक परिस्थिती उत्तम आहे त्यांचं एक ठीक पण इतर कुटुंबांचे काय ?