Team Agrowon
दिवाळी संपली की जत्रांजे वेध लागायचे. गावोगावच्या जत्रा सुरू व्हायच्या. त्या पुढे उन्हाळाभर चालायच्या.
म्हणजे पावसाळा सोडला तर हिवाळा आणि उन्हाळा या दोन्ही ऋतूत गावोगाव जत्रा भरायच्या. या जत्रांसाठी खर्चायला आपल्याजवळ पैसे असावेत म्हणून गावाकडची माणसं आठवणीने जत्रांसाठी पैसे साठवून ठेवायची.
सगळ्या जत्रा ह्या प्रामुख्यानं तिथीनुसार भरत असतात. त्यामुळे दरवर्षी त्यांच्या तारखा बदलतात. ज्या देवाची जत्रा आहे त्या देवाची प्रमुख तिथी पाहून जत्रा भरवली जाते.
आमच्याकडे पूर्वी सगळ्यात मोठी जत्रा होती ती औंढा नागनाथाची. ही जत्रा मी कधी पाहिली नाही, पण आमच्या गावचे पुष्कळ लोक या जत्रेला जायचे, ते या जत्रेच्या आठवणी सांगायचे.
औंढयाचा डोंगरमाळ आमच्या शेतातून दिसायचा. शेतात तो डोंगरमाळ दिसू लागला की काम करणारे गडी आपल्या जत्रेच्या आठवणी सांगायचे.
ही जत्रा महाशिवरात्रीला भरायची. कारण औंढा नागनाथ महादेवाच्या बारा ज्योतिर्लिंगापैकी एक. त्यामुळे या जत्रेचा मुहूर्त हा महाशिवरात्रीचा असायचा. परिसरात सर्व गावातून लोक या जत्रेला येत असावेत.