Team Agrowon
वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपिटीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर ग्रासलेले आहे. असे असतानाच रविवारी (ता. १६) पुन्हा सलग दुसऱ्या दिवशी पाऊस व गारपिटीमुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.
वाचलेला थोडाफार शेतीमाल विकता येईल, अशी अपेक्षा होती. मात्र आता धूसर झाली आहे. पावसाचा कहर कायम असून सोबत हलकीशी गारपीट झाल्याने पुन्हा एकदा दिंडोरी तालुक्यातील पूर्व तर सिन्नर तालुक्याच्या पश्चिम भागातील गावांना तडाखा बसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.
जिल्ह्यात कमाल तापमानात वाढ दिसून येत असून ३९ अंशांवर तापमान आहे. उन्हाचा चटका वाढत असून दुपारी ४ च्या सुमारास पावसाने दणका दिल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. जिल्ह्यात अनेक भागांत उन्हाळ कांदा काढणी सुरू आहे.
मात्र रविवारी (ता. १६) दुपारी दिंडोरी, सिन्नरसह मालेगाव परिसरात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी उपटून ठेवलेला कांदा अचानक आलेल्या पावसामुळे भिजला. तर दिंडोरी तालुक्यांतील मोहाडी परिसरात शेतात पाणी साचून कांदा पाण्याखाली गेल्याचे दिसून आले.
दिंडोरीतील मोहाडी परिसरात सव्वा पाचच्या सुमारास गावाच्या उत्तरेला २५ मिमी पावसाची नोंद झाली. पावसाचा जोर अधिक असल्याने या भागातील द्राक्ष बागा व कांद्याच्या शेतांमधून पाणी शिवारातून वाहिले. तर जोपुळ, खडक सुकेणे, चिंचखेड परिसरात पावसाने पुन्हा दणका दिल्याने द्राक्ष उत्पादक हतबल झाले आहेत.
सिन्नर तालुक्याच्या पश्चिम भागात सायंकाळी साडे पाचच्या सुमारास पश्चिम पट्ट्यातील शिवडे, घोरवड, बोरखिंड व पांढुर्ली परिसरात गारपीट झाली.