Devendra Shirurkar
भरडधान्य (मिलेट्स) हे मानवी आरोग्यासाठी सुपरफूड ठरू शकते. जगभरातील भरडधान्याची गरज भागवण्यासाठी भारताने भरडधान्य उत्पादन वाढवण्याची गरज असल्याचे गुरुवारी (२३ जून) केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पटेल म्हणाले.
असोचॅम आणि अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयातर्फे नुकतेच नवी दिली येथे भरडधान्यावर राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली. या परिषदेत पटेल बोलत होते.
भरडधान्याच्या माध्यमातून भारताची पोषक अन्नाची गरज भागू शकते. भरडधान्य (मिलेट्स) हे सुपरफूड ठरू शकते. भरडधान्याच्या माध्यमातून मानवी शरीराला आवश्यक पोषक घटकांची पूर्तता होत असते. त्यामुळे आपण दैनंदिन आहारातील भरडधान्यांचे महत्व लक्षात घेण्याची गरज असल्याचे पटेल म्हणाले.
भरडधान्य मानवी आरोग्य आणि पर्यावरणाच्यादृष्टीनेही लाभदायक असल्याचे सांगत पटेल यांनी मिलेट्स सुपरफूड ठरेल,असा विश्वास व्यक्त केला. मिलेट्सचे उत्पादन कमी काळात हाती येते. पेरणीनंतर अवघ्या ६५ दिवसांत या पिकाची काढणी करता येते. साठवणुकीची उत्तम यंत्रणा उपलब्ध असल्यास मिलेट्सची २ वर्षे अथवा त्याहून अधिक काळ साठववणूक करता येऊ शकते.
हरियाणा, उत्तर प्रदेश, छत्तीसगड,गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक,तामिळनाडू, तेलंगणा या राज्यांत प्रामुख्याने भरडधान्यांची लागवड केली जाते.
भरडधान्याची निर्यात करणाऱ्या प्रमुख देशांत भारताचा पाचवा क्रमांक लागतो. मिलेट्सबद्दल सध्या जगभरात जागरूकता निर्माण होत असल्याचे केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचे सहसचिव मिन्हाज आलम यांनी म्हटले.
संयुक्त राष्ट्रसंघाने २०२३ हे वर्ष आंतराराष्ट्रीय मिलेट्स वर्ष म्हणून जाहीर केले असून त्यामुळे मिलेट्समधील पोषक घटकांचे महत्व जगाला कळेल, असा विश्वासही आलम यांनी व्यक्त केला.
भरडधान्यातील पोषक घटकांमुळे केंद्र सरकारकडून माध्यान्ह भोजन योजनेत भरडधान्यांचा समावेश करण्याचा आग्रह धरला जातोय.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.