Team Agrowon
किन्जाला जिथं आम्ही दोन दिवस थांबलो त्यांचं नाव एल.जी.शेरपा.पर्यटकांसाठी म्हणून त्यांनी भव्य दुमजली लाकडी घर बांधलयं. त्यांना हिंदी येत असल्याने, त्यांच्याशी छान गप्पा झाल्या. त्यांची शेती समोरच्या डोंगरापलिकडे आहे. तिथंपर्यंत जायला दिड तास लागतो.ही त्यांची वडिलोपार्जित शेती
ते स्वत: कसत नाहीत.अर्धालीने देतात.गहू,बटाटे,मका, पालेभाज्या ही प्रमुख पिकं.ती पावसाच्या पाण्यावरच येतात. सगळ्याच ऋतूत पाऊस पडत असल्याने,ही पिकं येतातच.तशा नेपाळमधील जमिनी कसदार आहेत.शेतीतून किती उत्पन्न मिळतं? असं विचारल्यावर ते बोलले, काहीही गुंतवणूक न करता, काही पैसे मिळतात.मात्र वर्षभर खाण्यापुरतं सकस धान्य मिळतं.
ते शेतीत कुठली रासायनिक खतं वापरत नाहीत की, फवारण्या करीत नाहीत.त्यांच्या शेतीत यंत्रांचा वापर नाही.त्यांचा बाकी खर्च पर्यटनावर चालतो.तशीही त्यांची लाईफस्टाईल साधीच आहे.त्यामुळं त्यांना जगण्यासाठी तसे फारसे पैसे मिळत नाहीत.
आम्ही ज्या रस्त्यावरून पायी फिरलो तो भाग शेतीचा होता.घरांच्या अवतीभोवती छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये लोक शेती करतात.सगळी शेती पर्वतावरची,डोंगरावरची असल्याने, त्यासाठी विशिष्ट पद्धतीने जमीन तयार केलेली असते.कितीही पाऊस पडला तरी,माती वाहून जाऊ नये यासाठी टप्पे करून तीन बाजूंनी मातीचे कठडे असतात
या भागात सगळीकडं गहू,मका आणि बटाटा ही तीनच प्रमुख पिकं दिसली.बटाट्याचा रंग रताळ्यासारखा असतो.ती तीन प्रकारची असतात.यांच्या जेवणात बटाटा असतोच.तो उकडलेला,तळलेला किंवा दुसऱ्या एखाद्या पालेभाजीसोबत मिक्स.नेपाळी लोक शेतीत भरपूर कष्ट करतात.जन्मापासूनच खडतर जगण्याची सवय असल्याने,त्यांची या कष्टाबद्दल तक्रार दिसत नाही.डोंगरी भागातील बहुतांश लोक शेतीवर अवलंबून आहेत.
शेती हेच त्यांच्या जगण्याचे मुख्य साधन आहे.प्रत्येक शेतकऱ्याकडं चार- पाच बकऱ्या,काही कोंबड्या व दोन- चार गाईही दिसतात.त्यातून त्यांना दूध ,खाणं आणि काही पैसे मिळत असावेत. कधी काळी ठिकठिकाणी विविध डोंगरावर,पर्वतांवर लोक येऊन राहिले.तिथंच त्यांनी घर बांधली आणि शेती करायला सुरुवात केली.