Team Agrowon
आल्याच्या दरात सध्या तेजी आली आहे. मागील काही वर्षे उत्पादन खर्चापेक्षा कमी भावात विकल्या जाणाऱ्या आले पिकाने यंदा शेतकऱ्यांना दिलासा दिला.
आल्याच्या भावाने अनेक बाजारांमध्ये १० वर्षांतील उच्चांकी भावाचा टप्पा गाठलेला दिसतो. कोरोनानंतर सलग तीन वर्षे आले पिकानं शेतकऱ्यांचं आर्थकारण बिघडवलं.
आले पिकाला उत्पादन खर्च जास्त लागतो. पण बाजारात त्यातुलनेत खूपच कमी भाव मिळत होता. परिणामी शेतकऱ्यांना पीक परवडेना. त्यामुळं अनेक शेतकऱ्यांनी आले पिकाकडे पाठ फिरवली.
यंदा कमी लागवड, अवेळी पाऊस आणि कीड-रोगानं पिकाचं नुकसान होऊन उत्पादन घटलं.
परिणामी बाजारात आल्याचा पुरवठा कमी झाला. तर बाजारात मागणी वाढली आहे. लग्नसराईचाही फायदा आले बाजाराला मिळत आहे. त्यामुळे आल्याच्या भावात मोठी वाढ झाली. तसे आल्याचे भाव जानेवारीपासून वाढत आहेत.
सध्या अनेक हंगामातील उचांकी दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. सध्या आल्याला प्रतिक्विंटल सरासरी ८ हजार ते १२ हजार रुपयांचा दर मिळत आहे. लागवडीलाही आल्याची मागणी वाढत आहे.
गुणवत्तापूर्ण आल्याला निर्यात आणि सुंठ निर्मितीसाठी मागणी आहे. त्यामुळे आल्याच्या दरातील तेजी चालू हंगामात टिकून राहू शकते, असा अंदाज आले बाजारातील व्यापारी आणि अभ्यासक व्यक्त करत आहेत.