Team Agrowon
कीड-रोगांचा कमी प्रादुर्भाव, लागवड आणि काढणी करण्यासाठी मिळणारा पुरेसा वेळ, जंगली प्राण्यांचा त्रास नाही, नैसर्गिक आपत्तीतही नुकसान कमी, बऱ्यापैकी उत्पादन दरही चांगला म्हणून राज्यातच नव्हे, तर देशात हळदीचे क्षेत्र वाढत गेले. असे असले तरी मागील हंगामात मराठवाडा, विदर्भात हळदीचे क्षेत्र घटत असल्याचे निदर्शनास आले.
सततची अतिवृष्टी, कंदमाशी कीड, तसेच कंदसडचा वाढता प्रादुर्भाव, हळद लागवड-काढणी-प्रक्रिया यासाठी लागणारे मजूर, पीक उत्पादनाचा वाढता खर्च, घटते उत्पादन आणि मिळणारा कमी दर यामुळे राज्यात प्रामुख्याने विदर्भ-मराठवाड्यात हळद क्षेत्र घटत आहे.
जुनी शिल्लक हळद, त्यात नव्या उत्पादनाची भर पडत आहे. त्यामुळे मिळेल त्या दरात हळद विक्रीवाचून उत्पादकांकडे पर्याय नाही.
हंगामाच्या सुरुवातीला हळदीला सरासरी प्रतिक्विंटल ७५०० रुपये दर मिळाला. हा दरही कमीच होता, आता तर या दरातही घसरण चालू आहे. हळदीच्या दरावर मंदीचे सावट असल्याने विक्रीविना शिल्लक हळदीच्या समस्येने उत्पादकांना चांगलेच ग्रासले आहे.
भारत आणि हळद हे नाते अतूट आहे. हळदीच्या पेटंटची लढाई जेव्हा आपण जिंकली, तेव्हा हे नाते अधिक ठळकपणे जगापुढे आले. आजही हळदीच्या जागतिक उत्पादनात आणि बाजारात भारताचा दबदबा कायम आहे. असे असले तरी हळद उत्पादनाचे प्रगत तंत्र तसेच काढणीपश्चात व्यवस्थापनात आपण खूपच मागे आहोत.
राज्यात सेलम, वायगाव अशा काही जाती सोडल्या, तर फारसे पर्याय शेतकऱ्यांकडे नाहीत. हळदीच्या बियाण्यात भेसळीचे प्रमाण खूप वाढले आहे. देशात ५३ हून अधिक हळदीच्या जातींची लागवड होते.
या वर्षी तर ऐन काढणी करताना झालेल्या अवकाळी पावसाने अन् गारपिटीने हळदीचे मोठे नुकसान केले. त्यातच आता हळदीचे दर सातत्याने कमी होत आहेत. त्यामुळे या पिकाचा उत्पादन खर्च देखील निघत नसल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे.