Team Agrowon
ग्रामीण भागात आढळणाऱ्या एकूण ३३ हजार वनस्पतींपैकी फक्त ७५०० वापरात आहेत.
आयुर्वेदिक औषधांसाठी केवळ ३७० वनस्पतींचा प्राधान्याने वापर केला जातो. औषधी वनस्पतींच्या लागवडीची चळवळ झाली पाहिजे.
सध्या औषधे आणि सुगंधी वनस्पती यांची भारतात एकत्रित बाजारपेठ सुमारे ७ हजार कोटी रुपयांची आहे. या निर्यातीचा व्यापार ही सुमारे सहाशे कोटीच्या घरात पोहोचला आहे.
केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने २००१ मध्ये आपल्या देशी प्राचीन आयुर्वेदाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आयुष मंत्रालयांतर्गत औषधी वनस्पती व सुगंधी वनस्पतीच्या लागवडीला महत्त्व देण्यात आले आहे.
देशातील बहुतांश सर्व कृषी विद्यापीठांनी स्वतंत्र औषधी वनस्पती विभाग सुरू केले आहे. त्यांच्या रोपवाटिकाही सुरू केल्या आहेत. मात्र शेतकऱ्यांच्या पातळीवर लागवड, उत्पादन, व्यवस्थापन या बाबींचा काही विभाग वगळता फारसा योजनाबद्ध विकास झालेला दिसत नाही.
केवळ उत्पादन करून शेतकऱ्यांचा माल विकला न गेल्याच्याही अनेक घटना पुढे आलेल्या दिसतात. यामुळे शेतकरी औषधी वनस्पतींच्या लागवडीला फारसे धजावत नाहीत. म्हणूनच औषधी वनस्पतीचे मूल्यवर्धन व प्रक्रिया यावर भर देण्याची आवश्यकता आहे.