Animal Care : योग्य प्रजनन, दूध उत्पादनासाठी समतोल आहार महत्त्वाचा

पोषण मूल्यांच्या कमतरतेमुळे जनावरांच्या प्रजननावर विपरीत परिणाम होतात. कालवडींना खाद्यातून योग्य प्रमाणात ऊर्जा पुरविल्यास त्या लवकर प्रजननात येतात. प्रजननासाठी अनुकूल वजन वाढ लवकर होते. यासाठी कालवडींना योग्य प्रमाणात खुराक मिश्रण, हिरवा व सुका चारा पुरवणे आवश्यक असते.
Animal Care : योग्य प्रजनन, दूध उत्पादनासाठी समतोल आहार महत्त्वाचा

डॉ. जी. एम. गादेगावकर,

डॉ. एस. एस. रामटेके

जनावरांना पाणी, तेलयुक्त पदार्थ, पिष्टमय पदार्थ, प्रथिने, कर्बोदके, क्षार आणि जीवनसत्त्वे या पोषणमूल्यांची आवश्यकता असते. जनावरांचे आहार आणि प्रजननाचा घनिष्ठ संबंध आहे. पोषण मूल्यांच्या कमतरतेमुळे जनावरांच्या प्रजननावर विपरीत परिणाम होतात. खनिज, जीवनसत्त्व, ऊर्जा, प्रथिनांची कमतरता तसेच प्रथिनांचे खाद्यामधील अति प्रमाणदेखील जनावरांच्या प्रजननावर विपरीत परिणाम करू शकते जसे की वांझपणा, जनावर माजावर न येणे.

ऊर्जा :

१) ऊर्जा हा आहारातील महत्त्वाचा घटक आहे. याची कमतरता जनावरांच्या प्रजननावर विपरीत परिणाम करू शकते. वेताच्या सुरुवातीच्या सहा आठवड्यात जनावरांचे दुग्धोत्पादन वाढत जाते. प्रसूतीनंतरच्या सहाव्या आठवड्यात दूध उत्पादनाचा उच्चांक गाठला जातो. परंतु प्रसूतीनंतरच्या दहा आठवड्यांपर्यंत दुधाळ जनावरांचे खाद्य ग्रहण करण्याचे प्रमाण कमी असते. त्या काळात जनावर ऋण ऊर्जा परिस्थितीमध्ये असते. म्हणजेच दुधातून ऊर्जा जास्त प्रमाणात शरीराद्वारे फेकली जाते आणि आहारातून ऊर्जा मिळण्याचे प्रमाण त्यापेक्षाही कमी असते.

कारण या काळात जनावरांचे खाद्य ग्रहण करण्याचे प्रमाण कमी असते. त्यामुळे या काळात गायीचे वजन घटते. त्याचा विपरीत परिणाम तिच्या प्रजननावर दिसून येतो. कारण या काळात दुग्धोत्पादनासाठी दुधाळ जनावर स्वतःच्या शरीरातील मेद व प्रथिनांचा वापर करत असते. या काळात योग्य आहार पुरविल्यास दुभत्या जनावरांचे वजन कायम राहते किंवा वाढते व त्याचा अनुकूल परिणाम प्रजननावर होतो. याउलट आहार असमतोल असेल तर दुधाळ जनावरांचे वजन कमी होते. त्याचा प्रजननावर विपरीत परिणाम दिसून येतो जसे, की प्रसूतीनंतर दाखवण्यात येणारा माज उशिराने येतो, जनावर गाभण राहत नाही, जनावर गाभण राहण्यासाठी एका पेक्षा जास्त वेळा कृत्रिम रेतन करावे लागते.

२) कालवडींना खाद्यातून योग्य प्रमाणात ऊर्जा पुरविल्यास त्या लवकर प्रजननात येतात. प्रजननासाठी अनुकूल वजन वाढ लवकर होते. यासाठी कालवडींना योग्य प्रमाणात खुराक मिश्रण, हिरवा व सुका चारा पुरवणे आवश्यक असते. या उलट ज्या कालवडी फक्त निकृष्ट चाऱ्यावर वाढवल्या जातात, त्यांचे वजन लवकर भरत नाही, त्या लवकर वयात येत नाहीत. एकंदरीत त्यांच्यावर प्रजननावर विपरीत परिणाम होतो. खाद्यातून अति ऊर्जा कालवडींना पुरविल्यास त्यांची वजन वाढ लवकर होते. अशा कालवडी लवकर प्रजननात येतात. परंतु त्यांच्या हाडांची वाढ विशेष करून प्रसूतीशी संबंधित, कमरेकडच्या भागाची वाढ व्यवस्थित होत नाही. परिणामी, अशा जनावरांना प्रसूतीच्या वेळी त्रास होऊ शकतो. वासरू प्रसूतीच्या वेळी अडकण्याचा समस्येमध्ये वाढ होते.

३) प्रसूतीच्या शेवटच्या काळात किंवा भाकड काळात अधिक ऊर्जा पुरवली तरी गायींमध्ये समस्या उद्‍भवू शकतात. अशा गाईमध्ये वार अडकणे, गर्भाशयाची बाधा, संसर्ग आणि अंडाशयाच्या समस्या अधिक दिसून येतात. अशा गाईंमध्ये चयापचयाचे आजारदेखील जास्त प्रमाणात दिसून येतात. गाई खाद्य खाण्याचे प्रमाणदेखील कमी असते. एकंदरीत कमी किंवा अधिक ऊर्जा पुरवठा केल्यास माजाचा काळ कमी होतो (स्टॅंडिंग हीट), जुळे होण्याचे प्रमाण वाढते, गर्भधारणेचे प्रमाण कमी होते. एकंदरीत प्रजननावर विपरीत परिणाम दिसून येतो.

वेताच्या सुरुवातीच्या काळात ऊर्जेचा योग्य पुरवठा ः

१) आहारातील तृणधान्य उदा. मका, ज्वारी, बाजरी भरडा यांचे प्रमाण वाढवावे. प्रमाण एकदम जास्त वाढविल्यास कोठी पोटातील आम्लता वाढते, ॲसिडोसिस होऊ शकतो.

२) वनस्पती तेल पाजावे. (१०० ग्रॅम/ जनावर/दिवस)

३) जनावरांच्या आहारात कोठी पोटात विघटन न होणारी मेद पावडर म्हणजेच बायपास फॅट वापरावे (१०० ते २०० ग्रॅम/ जनावर/ दिवस) किंवा शेकडा खुराक मिश्रणात १ ते २ टक्के बायपास फॅटचा अवलंब करावा.

४) कपाशीच्या बिया किंवा सोयाबीन बिया भाजून/ शिजवून त्यांचा खाद्यात अवलंब करावा.

प्रथिने :

१) प्रजननासाठी ऊर्जेपेक्षा प्रथिनांना कमी महत्त्व आहे. परंतु प्रथिनांच्या कमतरतेमुळे देखील वांझपणा व प्रजननाच्या समस्या उद्‍भवू शकतात. दीर्घ काळाकरिता आहारातून प्रथिनांचा पुरवठा कमी असेल तर त्याचा जनावरांच्या प्रजननावर विपरीत परिणाम होतो.

२) दुधाळ जनावरांच्या आहारात प्रथिनांचे प्रमाण जास्त ठेवल्यास त्याचा जनावरांच्या प्रजननावर विपरीत परिणाम होतो. जनावरांच्या आहारात प्रथिने किंवा युरिया यांचा अवलंब अधिक प्रमाणात केल्यास गर्भधारणेचे प्रमाण कमी होते. हे टाळण्यासाठी गाई, म्हशीच्या आहारात प्रथिनांचे प्रमाण वाढविल्यास ऊर्जेचे प्रमाण देखील आहारात वाढवावे.

३) प्रथिनांच्या आहारातील अधिक अवलंबाने गर्भाशयाचा सामू कमी होतो, जो गर्भाशयातील गर्भाला घातक/ अपायकारक ठरू शकतो. त्याचप्रमाणे असे दिसून आले आहे की गाईला गरजेपेक्षा १० ते १५ टक्के प्रथिने जास्त पुरवल्यास गाईंमध्ये गर्भधारणा होण्यासाठी एकापेक्षा जास्त वेळा कृत्रिम रेतन करावे लागते. दोन वेतांतील व प्रसूतीमधील अंतर वाढते.

जनावरांच्या आहारात प्रथिनांचे प्रमाण वाढविल्यास होणारे परिणाम ः

१) रक्तातील युरियाचे प्रमाण वाढते आणि शुक्राणू, अंडाशय व वाढणाऱ्या गर्भास अपायकारक ठरते.

२) शरीरातील संप्रेरकाचा समतोल ढळतो.

३) रक्तातील युरियाच्या अधिक प्रमाणाने ऋतुचक्र विस्कळित होते.

Animal Care : योग्य प्रजनन, दूध उत्पादनासाठी समतोल आहार महत्त्वाचा
Animal Care: जनावरांतील ब्रुसेलोसिस आजाराचे नियंत्रण

दुष्परिणाम टाळण्यासाठी उपाययोजना ः

१) वेताच्या सुरवातीच्या काळात दुधाळ जनावरांच्या आहारात बायपास प्रथिनांचा (कोठी पोटात विघटन न होणाऱ्या प्रथिनांचा) अवलंब करावा.

२) जनावरांच्या खाद्यात प्रथिनांचे प्रमाण १६ टक्के असावे.

३) वेताच्या शेवटच्या काळात दुधाळ जनावरांच्या आहारात प्रथिनांचे प्रमाण १२ टक्के असावे.

मेद :

- मेद व कोलेस्ट्रॉलचा जनावरांच्या प्रजननावर अनुकूल परिणाम दिसून येतो.

- आहारातील ऊर्जा वाढवण्याकरता खुराकामध्ये मेदाचे प्रमाण ३ ते ५ टक्के असावे. आहारातील मेदाचे ५ टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाण झाल्यास त्याचा कोठी पोटातील जिवाणू आणि खाद्याचा पाचकतेवर विपरीत परिणाम दिसून येतो.

- एकंदरीत मेदाच्या पुरेशा पुरवठ्याने जनावरांच्या प्रजनन क्षमतेवर अनुकूल परिणाम दिसून येतो. कारण प्रजननासाठी आवश्यक संप्रेरके तयार करण्यासाठी मेदाम्ले आवश्यक असतात. ज्यामुळे जनावरांची गर्भधारणा होते, गर्भ टिकून राहतो. प्रसूती सुलभ होते.

क्षार :

- क्षार हा घटक जनावरांना अल्प प्रमाणात लागतो. परंतु दुग्धोत्पादनासाठी आणि प्रजनन टिकवून ठेवण्यासाठी अतिशय महत्त्वाचा असतो.

- जनावरांच्या आहारात धान्य, पेंडी, हिरवा आणि सुका चारा यांचा वापर होतो. त्यातून जनावरांना प्रथिने, कर्बोदके, तेलयुक्त पदार्थ उपलब्ध होतात. परंतु या घटकांमधून जनावरांना योग्य प्रमाणात खनिजे म्हणजे क्षार उपलब्ध होत नाहीत.

- क्षारांची गरज भागविण्यासाठी जनावरांच्या आहारात खनिज मिश्रणाचा वापर करावा लागतो. बऱ्याच पशुपालकांना खनिज घटक माहीत नसतात. परंतु या घटकांच्या कमतरतेमुळे जनावरांचे दुग्धोत्पादन आणि महत्त्वाचे म्हणजे प्रजननक्षमता कमी होते.

- पशुखाद्यामध्ये खनिजे कमी प्रमाणात असल्यास जनावरांच्या चयापचयाच्या क्रिया व्यवस्थित पार पडत नाहीत. खनिज कमतरतेचा परिणाम वासरांच्या वाढीवर, मोठ्या जनावरांच्या दूध उत्पादनावर आणि प्रजोत्पादनावर होतो.

- खनिजे जनावरांच्या शरीरात तयार होत नसल्याने ती खनिज मिश्रणाद्वारे पुरविणे आवश्यक असते.

दुधाळ गाई आणि म्हशींचे दुग्धोत्पादन आणि प्रजनन टिकवून ठेवण्यासाठी बरीच खनिज द्रव्ये आवश्यक असतात. काही खनिजे जास्त प्रमाणात तर काही कमी प्रमाणात आवश्यक असतात. कॅल्शिअम,फॉस्फरस, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, सोडिअम, क्लोरिन आणि सल्फर ही खनिजे तुलनेने अधिक प्रमाणात तर लोह, झिंक, मँगेनीज, तांबे, आयोडीन, कोबाल्ट, सेलेनियम इत्यादी खनिजे कमी प्रमाणात लागतात.

- शरीरातून स्रावाद्वारे बाहेर पडणाऱ्या क्षारांची उणीव भरून काढण्यासाठी रक्तातील हिमोग्लोबिन, हाडातील कॅल्शिअम, स्फुरद व इतर क्षारांची झीज, स्नायूंची निरोगी अवस्था, पाचक रसाचे उत्पादन व सर्व शारीरिक क्रियांचे सुनियोजित नियंत्रण करण्यासाठी जनावरांना क्षारांची गरज असते.

- जनावरांची शरीरक्रिया संप्रेरके, पाचकरस व विकरांच्या नियंत्रणाखाली कार्य करतात. त्यांना कार्यक्षम ठेवण्यासाठी त्यांच्या कार्याला गती देण्यासाठी खनिज क्षारांची गरज असते. त्यामुळे शरीरातील कोणतीही क्रिया क्षारांच्या अभावी होऊ शकत नाही.

Animal Care : योग्य प्रजनन, दूध उत्पादनासाठी समतोल आहार महत्त्वाचा
Animal Care : भ्रूण प्रत्यारोपण तंत्रातून गीर कालवडीचा जन्म

प्रजननासाठी महत्त्वाची खनिजे आणि त्यांचे कार्य ः

१. कॅल्शिअम : दुग्धोत्पादन, हाडे व दातांच्या मजबुतीसाठी आणि स्नायूंच्या आकुंचन-प्रसरणासाठी आवश्यक. यांच्या कमतरतेमुळे प्रसूती सुरळीत होण्यास अडथळा निर्माण होतो. कारण गर्भाशयाच्या स्नायू आकुंचन-प्रसरण क्रियेमध्ये अडथळा निर्माण होतो.

२. फॉस्फरस : दुग्धोत्पादन, चयापचय आणि दातांच्या मजबुतीसाठी आवश्यक. याच्या कमतरतेमुळे पुनरुत्पादन चक्र अनियमित होते. गाभण जनावरांमध्ये गर्भपात होण्याची शक्यता असते.

३. मॅग्नेशियम : हाडे व दात मजबूत आणि प्रथिनांचे उत्पादन तसेच कर्बोदकावरील क्रियेसाठी आवश्यक.

४. सल्फर : प्रथिनांचे उत्पादन आणि कर्बोदकावरील क्रियेसाठी उपयोगी. “ब” गटातील जीवनसत्त्व थायमिन आणि बायोटीन यांचा घटक. मिथिओनीन आणि सिस्टीन अमिनो आम्लांच्या निर्मितीसाठी आवश्यक.

५. सोडिअम व पोटॅशिअम : शरीरातील अभिसरणाचा समतोल राखण्यासाठी आणि आम्लता टिकून ठेवण्यासाठी.

६. तांबे /कोबाल्ट : रक्तातील हिमोग्लोबिन उत्पादन, पेशी समूहाच्या रक्त छटासाठी आवश्यक. बऱ्याचशा धातुजन्य अंतस्रवांचे घटक आणि प्रजोत्पादन क्रियेसाठी महत्त्वाचे. कमतरतेमुळे जनावरांमध्ये वांझपणा दिसून येतो.

७. झिंक : शुक्रजंतूंच्या निर्मितीसाठी आणि लैंगिक अवयवांची प्राथमिक आणि त्यापुढील वाढीसाठी महत्त्वाचे. "अ" जीवनसत्त्व कार्यान्वित करते, वळूंची प्रजनन क्षमता टिकून ठेवण्यासाठी आणि वळूंकडून चांगल्या वीर्याची निर्मिती होण्यासाठी आवश्यक ठरते.

८. मँगेनीज : कर्बोदकांच्या उत्पादनासाठी कार्य करणाऱ्या शरीरातील अनेक अंतस्रवांच्या (टी ३, टी ४) निर्मितीसाठी आवश्यक. शारीरिक वाढीसाठी आणि प्रजोत्पादनासाठी आवश्यक. याच्या कमतरतेमुळे पुनरुत्पादन ऋतुचक्र अनियमित होते. गर्भपात होऊन मृत आणि दुबळे आणि केसविरहित गालगुंड असलेले वासरू जन्माला येते. जनावर मुका माज दाखविते.

खनिज कमतरतेमुळे होणारे परिणाम ः

१) खनिजांच्या अभावामुळे जनावरांमध्ये अनियमित ऋतुचक्र व अकार्यक्षम पुनरुत्पादन दिसून येते.

२) क्षाराच्या कमतरतेमुळे गाई माजावर येत नाहीत. माज सुप्त स्वरूपात राहतो. हंगामी वांझपणा येतो, गर्भपात व गर्भामध्ये उपजत दोष उत्पन्न होतात.

३) कमतरतेमुळे कालवडी माजावर येत नाहीत. माज सुप्त अनियमित राहतो, वाया जातो, गर्भधारणा होत नाही. कालवडीच्या पहिल्या विताचे वय वाढते. गर्भधारणा झालीच तर गर्भपात होतो किंवा अशक्त वासरू जन्माला येते. प्रसूती सुलभ होत नाही.

४) गाईंचा भाकड काळ वाढतो. दोन सलग वितातील अंतर वाढते. उत्पादन उपयुक्त आयुष्य कमी होते.

५) नर वासराच्या पुनरुत्पादन संस्थेतील अवयवांची वाढ समाधानकारक होत नाही. वयात येण्यास उशीर लागतो. चांगल्या प्रकारचे वीर्य उत्पादन मिळत नाही.

खनिजे मिळण्याची आवश्यकता ः

१) जनावरांच्या खाद्यातून आणि वैरणीतून पुरेशा प्रमाणात उपलब्ध न झालेली खनिजे जनावरांना खनिज मिश्रणातून पुरविणे गरजेचे असते.

खनिज मिश्रण देण्याचे प्रमाण

१) सर्वसाधारणपणे खुराकामध्ये १ टक्का मीठ, १ ते २ टक्का क्षार मिश्रणाचा वापर केल्यामुळे क्षारांची गरज पूर्ण होते.

२) दुभत्या गाई आणि म्हशी : ६० ते ७० ग्रॅम/जनावर/दिवस (दुग्धोत्पादनानुसार)

३) मोठी वासरे, कालवडी आणि भाकड जनावरे: ४० ते ५० ग्रॅम/ जनावर/दिवस

४) लहान वासरे : २० ते २५ ग्रॅम/जनावर/ दिवस

खनिज मिश्रणाचे फायदे ः

१) वासरू आणि कालवडींची योग्य प्रमाणात वाढ झाल्याने पैदासक्षम वयात त्या लवकर येतात आणि गाईची प्रजोत्पादनाची कार्यक्षमता वाढते.

२) वेताचा काळ वाढून दोन वेतांतील अंतर कमी होते, खाद्याची उपयुक्तता वाढते

३) दुग्धोत्पादनात वृद्धी होते. रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

खनिज मिश्रण देण्याची पद्धत

१) खनिज मिश्रण आंबोण मिश्रणातून जनावरांना खाऊ दिले जाते. बाजारात उपलब्ध असलेल्या खुराकात निरनिराळ्या प्रमाणात खनिज मिश्रण मिसळलेले असते. परंतु खनिजाचा योग्य पुरवठा होण्यासाठी खनिज मिश्रण देणे योग्य ठरते. क्षेत्रनिहाय खनिज मिश्रण वापरणे जास्त परिणामकारक आणि आर्थिकदृष्ट्या किफायतशीर ठरते.

जीवनसत्त्व :

१) जनावरांना जीवनसत्त्व अत्यल्पप्रमाणात आवश्यक असतात. परंतु ती दुग्धोत्पादन, प्रजननासाठी अत्यावश्यक मानली जातात. मेदामध्ये विरघळणारी जीवनसत्त्व जसे की जीवनसत्त्व अ, ड, ई आणि के.

२) बाजारात उपलब्ध असलेल्या पशुखाद्यांमध्ये जीवनसत्त्वांचा योग्य प्रमाणात अवलंब केला जातो. परंतु जर घरच्या घरी खुराक बनवून जनावरांना दिल्यास त्यात मेदात विरघळणाऱ्या जीवनसत्त्वांचा अवलंब करणे आवश्यक ठरते.

जीवनसत्त्व “अ” :

१) गर्भाशयाच्या पेशींच्या योग्य वाढीसाठी व त्या टिकवून ठेवण्यासाठी जीवनसत्त्व “अ” महत्त्वाचे ठरते. जीवनसत्त्व “अ”च्या अभावाने जनावरे प्रजननात उशिरा येतात, प्रजनन ऋतुचक्र अनियमित होते, जनावरे माज उशिरा दाखवितात, गर्भपाताचे प्रमाण वाढते, वार अडकण्याचे प्रमाण वाढते, मृत किंवा अशक्त वासरू जन्माला येते, गर्भाशयाचा दाह होण्याचे प्रमाण वाढते.

२) प्रसूतीनंतर गर्भाशय सुस्थितीमध्ये येण्यास वेळ लागतो, दोन प्रसूतींमधील अंतर वाढते, प्रसूतीपश्‍चात माज दाखविण्यास उशीर होतो.

३) जीवनसत्त्व “अ”चा पुरवठा होण्यासाठी जनावरांच्या आहारात हिरव्या चाऱ्याचा अवलंब करावा. जर आहारात हिरव्या चाऱ्याचा अवलंब केला नसेल तर खुराक मिश्रणामध्ये “अ” जीवनसत्त्व पावडरचा अवलंब करावा. आवश्यकता भासल्यास “अ” जीवनसत्त्वाचे इंजेक्शन द्यावे.

जीवनसत्त्व “ड” :

१) जीवनसत्त्व “ड”च्या अभावाने स्नायू आखडणे, धापा टाकणे, अशक्तपणा आणि कधी कधी आकडी येणे अशी लक्षणे दिसून येतात.

२) जीवनसत्त्वाच्या अभावामुळे जनावरे प्रजननात उशिरा येतात, माज उशिरा दिसून येतो. तसेच मृत, अशक्त आणि व्यंग किंवा अनियमित वाढ झालेली वासरे जन्माला येतात.

३) ज्या जनावरांवर सूर्यप्रकाश पडतो, त्यांचा त्वचेमध्ये जीवनसत्त्व “ड” तयार होते. बाजारात उपलब्ध असणाऱ्या पशुखाद्यामध्ये जीवनसत्त्व “ड”चा योग्य प्रमाणात अवलंब केलेला असतो.

जीवनसत्त्व “ई” :

१) अभावामुळे गर्भाशयाची हालचाल, शुक्राणू हालचाल, गर्भधारणेचे प्रमाण, प्रसूतीनंतरच्या क्रिया, प्रसूतीनंतर वार बाहेर पडण्याची क्रिया आणि गर्भाची वाढ यावर विपरीत परिणाम दिसून येतो.

-------------------------

संपर्क ः डॉ. जी. एम. गादेगावकर,९८६९१५८७६०

(पशू पोषण व आहार शास्त्र विभाग, पशुवैद्यकीय व पशू विज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com