
पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढल्याने वातावरणात ओलसरपणा राहतो. सततच्या ओलसरपणामुळे जनावरांना विविध आजारांची (Animal disease) बाधा होत असते. पावसाळ्यात योग्य व्यवस्थापन केल्यास आजारांचे प्रमाण कमी करता येते. वातावरणातील बदलाला जनावरांच्या शरीराने चांगला प्रतिसाद न दिल्यास त्यांना विविध रोगांची लागण होत असते. हे टाळण्यासाठी वेळेत लसीकरण (Vaccination), जंतनिर्मुलन (Deworming), गोठ्याचे आणि खाद्याचे योग्य व्यवस्थापन केले पाहिजे.
पावसाळ्यात गोठ्यात पाणी येणार नाही आणि पावसाच्या पाण्यामुळे जनावरे भिजणार नाहीत, याची विशेष काळजी घ्यावी. गोठ्यातील हवा खेळती राहिली पाहिजे. जेणेकरून गोठ्यात तयार होणारा अमोनिया वायू (Ammonia) गोठ्यातच साचून राहणार नाही. गोठ्यातील मलमुत्र वेळोवेळी साफ करून घ्यावे. असे केल्याने गोठ्यात माश्यांचे प्रमाण वाढणार नाही.
पावसाळ्यात ओला झालेला चारा जनावरांना खायला देऊ नये. ओल्या चाऱ्यामध्ये बुरशीचा प्रादुर्भाव असण्याची शक्यता असते. असा बुरशीयुक्त चारा जनावरांच्या पोटात गेल्यास त्यांची पचनक्रिया बिघडू शकते.
पावसाळ्यात जनावरांना चरायला नेताना विशेष खबरदारी बाळगावी. वादळी पावसात जनावरांना चरायला बाहेर नेऊ नये. विजा चमकत असल्यास जनावरांना झाडाखाली उभे करू नये. पावसाळी वातावरण अनेक सूक्ष्मजीवाणूंच्या वाढीसाठी पोषक असते. त्यामुळे पावसाळ्यात जनावरांना बाहेर नेताना विशेष काळजी घ्यावी. पावसाळ्यात सर्वत्र चिखल झाल्याने, जनावरे घसरून पडण्याचीही शक्यता असते. त्यामुळे जास्त चिखल असलेल्या ठिकाणी जनावरांना चरायला नेऊ नये.
आपल्याकडे पावसाळ्यात पशुपालक जनावरांना नवीन उगवलेला हिरवा चारा देण्याचे प्रमाण वाढते. हिरवा चारा जनावरांना देताना सोबत कोरडा चाराही द्यावा. पावसाळ्यात कोरड्या चाऱ्याची कमतरता तयार होते. त्यामुळे कोरड्या चाऱ्याची व्यवस्थित साठवणूक करावी. कोरडा चारा भिजणार नाही किंवा ओलावा पकडणार नाही अशा ठिकाणी त्याची साठवणूक करून ठेवावी.
जनावरांना चरायला सोडण्याआधी त्यांना कोरडा चारा खाण्यास द्यावा. जनावरांना चरायला सोडताना ऊन आल्यावर म्हणजेच गवतावरील दवबिंदू गेल्यावर सोडावे. पावसाळ्यात जनावरांना पिण्यासाठी वापरले जाणारे पाणी बरेचदा गढूळ असते. असे पाणी जनावरांनी पिल्याने त्यांना जंतूसंसर्ग होण्याची शक्यता असते. पावसाळ्यात जनावरांना दिले जाणारे पाणी स्वच्छ, निर्जंतुक पाणी द्यावे. पाणी शुद्ध करण्यासाठी पाण्यात एक टक्के पोटॅशियम परमॅग्नेटचा टाकावे.
जनावरांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी जनावरांच्या आहारात मुख्यत्वे व्हिटामिन E आणि सेलेनियमचा समावेश करावा. जनावरांच्या आहारामध्ये योग्य प्रमाणात ३० ग्रॅमपर्यंत रोज क्षार मिश्रणांचा समावेश करावा.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.