
भाग ः १
Animal Disease बऱ्याच आजारांवर पशुपालक घरच्याघरी उपचार करू शकतात. यासाठी वनौषधी वनस्पतींचा (Herbal Plant) वापर उपयुक्त ठरतो. मात्र विशिष्ट आजारावरील (Animal Disease) उपचार पशुवैद्यकाद्वारेच करावेत.
वनौषधींचा वापर केल्यानंतर त्याचा कोणताही अंश पशुजन्य उत्पादनात आढळून येत नाही. त्यामुळे मानवी आरोग्यावर (Human Health) त्यांचा कोणताही परिणाम होत नाही. जनावरांच्यामध्ये औषधी वनस्पती प्रामुख्याने बाह्य आणि आंतरिक उपचारासाठी वापरल्या जातात.
उपयुक्त औषधी वनस्पती
आवळा ः
फळे, पाने आणि सालीमध्ये जीवनसत्त्व क, टॅनिन याबरोबरच अनेक औषधी गुणधर्म.
बियांची राख करून ती खोबरेल तेलात मिसळून, असे मिश्रण खरूज आणि कोरड्या खाजेवर लावल्यास जनावरांना आराम मिळतो.
कोवळी पाने व फांद्या बारीक कुटून जनावरांना तोंडावाटे पाजल्यास रक्ती हगवण कमी होते. हे मिश्रण किरकोळ जखम भरण्यास मदत करते.
कोवळी पाने खाद्यासोबत जनावरांना द्यावीत. त्यामुळे पचन प्रक्रिया सुधारते, आरोग्य उत्तम राहते.
बेल ः
पाने लांब, त्रिदली व सुगंधी असतात. पाने व फळे औषधी असतात.
हगवण किंवा मुरडा झालेल्या जनावरांना बेलाची पाने (१२५ ग्रॅम) बारीक कुटून १ लिटर ताकात मिसळून, मिश्रण पाजावे.
मादी जनावरांना बेलाची पाने १ किलो प्रमाणात ७ दिवस खाऊ घातल्यास २० ते २५ दिवसांत ती माजावर येतात.
फळांचा गर आणि डाळिंबाची साल प्रति अर्धा किलो जनावरांना खाऊ घातल्यास हगवण कमी होते.
शरीरावरील जखम लवकर भरून येण्यासाठी बेलाची पाने उपयुक्त ठरतात. पाने बारीक वाटून त्यात लोणी मिसळावे. हे मिश्रण जखमांवर लावल्यास जखम लवकर भरून येते.
अडुळसा ः
मुळ्या, फुलांचा वापर होतो. पानांचा रस ५० ग्रॅम, सैंधव मीठ ५० ग्रॅम आणि थोड्या जवाच्या पिठात पाणी मिसळून लाडू करावेत. हे लाडू जनावरांना खाऊ घातल्यास खोकला, श्वसन दाह कमी होतो.
गायी, म्हशींमधील पोटाच्या विकारासाठी पाने उपयुक्त ठरतात. पाने चाऱ्यासोबत खाऊ घालावीत.
पोटफुगीवरील उपचारासाठी पानांची राख १०० ग्रॅम प्रति २०० ग्रॅम गोडेतेलात मिसळून पाजावी.
पानांचा रस आणि जांभळाच्या सालीचा रस समप्रमाणात मिसळून दिवसातून तीन वेळा द्यावे. हे मिश्रण किमान एक आठवडा दिल्यास हगवण कमी होते. ताप कमी करण्यासाठी पानांचा अर्क द्यावा.
अश्वगंधा ः
मुळांची भुकटी शक्तिवर्धक असते. पाने, मुळे व फळांमध्ये विविध औषधी गुणधर्म असतात.
अश्वगंधा, तुळशी आणि शतावरी प्रत्येकी १०० ग्रॅम आणि गूळ ५० ग्रॅम एकत्र करून लाडू करावेत. हे लाडू आहारात दिल्यास सशक्त होण्यास मदत होते.
गाई, म्हशींतील मुका माज ओळखणे जिकिरीचे असते. अशावेळी अश्वगंधा मुळे आणि तीळ प्रत्येकी १५० ग्रॅम वाटून त्यात २ अंडी आणि २ केळी मिसळून लाडू तयार करावेत. हे लाडू सात दिवस खाऊ घालावेत. यामुळे जनावरे माजावर येण्यास आणि माजाची लक्षणे दिसण्यास मदत होते.
शतावरी ः
मुळ्या, अंकुर हा उपयुक्त भाग, दुग्धोत्पादनात वाढ करण्यासाठी फायदेशीर.
शतावरी दिल्याने दूध उत्पादनात १५ ते २० टक्के वाढ. तसेच २५ ते ३० टक्के नवजात जनावरांच्या वजनात वाढ. जनावरे योग्य वेळी तयार होतात.
कंदामध्ये सॅपोनिन, ग्लायकोसाइड्स, फॉस्फरस, रायबोफ्लेव्हिन, थायमीन, पोटॅशियम, कॅल्शिअम व इतरही रासायनिक द्रव्ये आहेत.
व्याल्यानंतर २० ते ३० दिवस होण्यापूर्वी आणि ९० दिवसांनंतर शतावरी देणे उपयुक्त.
दूध देत असेपर्यंत रोज ३० ग्रॅम सकाळी आणि ३० ग्रॅम सायंकाळी खाद्यातून शतावरीच्या मुळांची भुकटी द्यावी.
डॉ. अर्चना पाटील, ८५५२८३५३९५६
(पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.