
Animal Health Care : वातावरणातील तपमान वाढल्याने जनावर त्याच्या शरीराचे तापमान वाढू नये आणि ते सर्वसाधारण राहावे यासाठी प्रयत्न करते. पहिल्यांदा शरीरात तयार होणारी ऊर्जा शरीराबाहेर ढकलणे आणि दुसरे म्हणजे शरीरात कमीत कमी ऊर्जा तयार होण्यासाठी दैनिक व्यवस्थापनात बदल करते.
सर्वसाधारणपणे जनावरासाठी १० अंश सेल्सिअस ते २६ अंश सेल्सिअस (२४ अंश सेल्सिअस ते २६ अंश सेल्सिअस तापमान संकरित गाईसाठी आणि ३३ अंश सेल्सिअस भारतीय गोवंश आणि म्हशीसाठी ३६ अंश सेल्सिअसपर्यंत हे वातावरणातील तापमान योग्य समजले जाते. तापमान ज्या वेळेस जास्त होते, त्या वेळेस जनावरे आपल्या शरीराचे तापमान घर्मग्रंथी किंवा धापण्याच्या प्राक्रियेमार्फत नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतात.
ज्या वेळी वातावरणातील तापमान या कक्षेबाहेर जाते म्हणजे कमी किंवा जास्त होते अशा वेळी जनावराला शरीरावर होणाऱ्या विपरीत परिणामांचा ताण सहन करावा लागतो.
१) शरीरात तयार होणारी ऊर्जा जनावर बाहेर टाकत असते परंतु अशा वेळेस बाहेरील तापमान वाढल्याने ऊर्जा बाहेर टाकणे जिकिरीचे होते. त्यातच बाहेरील ऊर्जेचा अधिक भार वाढल्याने जनावराच्या ऊर्जा निस्सारण यंत्रणेवर परिणाम होतो.
२) जनावराच्या हार्मोन्स निर्मितीत बदल होतो, त्यामुळे दूध उत्पादन,आरोग्य, आहार आणि प्रजननावर विपरीत परिणाम होतो.
३) शरीरातील अन्नघटक हे तापमान नियंत्रणासाठी वापरल्याने जनावर अस्वस्थ होते. आहार कमी होऊन तहान, भूक मंद होते. जनावर तापमान नियंत्रण करण्यासाठी स्वतःची यंत्रणा वापरण्यास सुरवात करते. यामध्ये श्वासोच्छ्वासाचा दर वाढून धाप लागल्यासारखे करते. तोंडाने श्वासोच्छ्वास करते. श्वासोच्छ्वास उथळ, जास्त वेगाने होतो. नाडीचा वेग वाढतो.
४) जनावर स्वत: तपमान नियंत्रण करण्यापलीकडे जाते. शरीराचे तापमान १०४ ते १०६ अंश फॅरानहाइट वाढून कातडी कोरडी पडते. डोळे लालसर होतात, डोळ्यांतून पाणी गळते. पित्ताचा त्रास होऊन अतिसार होण्याची शक्यता असते. लघवीचे प्रमाण कमी होते. जनावरे बसतात. गाभण गायी गाभडण्याचे प्रमाण वाढते.
५) ज्या वेळेस तापमान ३५ अंश सेल्सअसपेक्षा जास्त होते, त्यावेळेस दूध उत्पादनात ३० टक्क्यांपर्यंत घट येऊ शकते आणि जेव्हा हेच तपमान ४० अंश सेल्सअसपेक्षा जास्त जाते त्या वेळेस दूध उत्पादनामध्ये ५० टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते. योग्य काळजी न घेतल्यास ही घट वाढत जाते.
६) उष्णतेच्या परिणाम वासरे, कालवडींच्या वाढीवर अधिक प्रमाणात होत असतो. दुधातील स्निग्धांश व प्रथिनाचे प्रमाण कमी होते. आहार कमी होतो.
७) प्रजनन यंत्रणेवर परिणाम होते. उष्णतेचा ताण असणारी गाय माजावर येत नाही. गाभण राहण्यास अडचणीचे ठरते. गाभण गाईंना उष्णतेचा ताण बसल्यास गर्भपात होऊ शकतो किंवा अकाली प्रसूती होऊ शकते.
८) जनावराच्या शरीरातील क्षारांचे संतुलन बिघडल्यामुळे आम्ल पिताचा त्रास होऊन पातळ जुलाब होऊ शकतात. कासेच्या आरोग्यावर परिणाम होतो. दूध उत्पादन नियंत्रित करणाऱ्या हार्मोन्सवर परिणाम होतो. खुरांचे आजार तसेच लंगडेपणा वाढण्याची शक्यता असते.
जनावरांचे व्यवस्थापन ः
१) जनावरांना जास्तीत जास्त सावली पुरवावी. जनावरांना बसण्या-उठण्यासाठी सरासरी पेक्षा जास्त जागा द्यावी. एकाच जागेवर जास्त गर्दी असल्यास उष्णतेचे निस्सारण होण्यास वेळ लागतो.
२) गोठा हवेशीर असावा. गरम हवा बाहेर जाण्यासाठी आणि थंड हवा आत येण्यासाठी जागा असावी.
३) गोठ्याच्या छताला पांढरा रंग दिला तर उष्णतेचे परावर्तन होऊन उष्णतेचा त्रास कमी होऊ शकतो. छतावर पालापाचोळा किंवा पाचट टाकल्यास उष्णतेचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.
४) आपल्या गोठ्यात हवा खेळती राहण्यासाठी पंखे लावावेत. स्पिंकलर्सद्वारे छताचे तपमान नियंत्रित करता येते. गाईच्या अंगावर स्प्रिंकलर, फॉगर्स किंवा इतर मार्गाने पाणी मारून शरीर थंड ठेवावे.
५) फॉगर्सच्या माध्यमातून पाण्याच्या थेंबाचे रूपांतर हे लहान कणांच्या स्वरूपात होते. हे कण गोठ्यात किंवा गाईच्या अंगावर चिकटतात. अशा लहान कणांचे बाष्पीभवन होण्यासाठी शरीरातील ऊर्जा वापरल्याने गाईचे शरीर थंड ठेवण्यास मदत होते.
६) स्प्रिंकलरच्या पाण्याच्या कणांचा जनावरांच्या केसांवर एक थर तयार होतो. अशा परिस्थितीमध्ये पंखा लावला असेल किंवा खेळत्या हवेत जल कणांमुळे गाईच्या शरीराला थंडावा मिळतो.
७) गोठ्याभोवती बारदान बांधावे, जेणेकरून आत येणारी गरम हवा थंड होते. आतील थंड हवा आत राहते.
८) जनावरांना जास्तीत जास्त वेळ पाणी पिण्यास उपलब्ध असेल याची दक्षता घ्यावी.
९) मुक्तसंचार गोठ्यातील पाण्याच्या टाक्या सिमेंटच्या असाव्यात किंवा स्टेनलेस स्टीलच्या असतील तर त्यांना ओल्या बारदानाने गुंडाळावे.
१०) आहाराचे चांगले व्यवस्थापन ठेवावे. जास्त चावावा लागणारा चारा हा सकाळी किंवा सायंकाळच्या वेळेस देऊ नये. असा चारा चावण्यासाठी जनावरांच्या शरीरात अतिरिक्त उष्णता तयार होते.
या कालावधीत ताण सहन करण्यासाठी शरीरातील बिघडलेला क्षारांचा समतोल साधण्यासाठी योग्य प्रमाणात क्षारांचे प्रमाण द्यावे.
संपर्क ः डॉ. शांताराम गायकवाड, ९८८१६६८०९९
(सरव्यवस्थापक, गोविंद डेअरी, फलटण, जि. सातारा)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.