कऱ्हाड, जि. सातारा ः जनावरांत ‘लम्पी स्कीन’चा प्रादुर्भाव (Lumpy Skin Outbreak) दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पशुपालक शेतकरी चिंतेत आहेत. या आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांतील जिल्हा प्रशासन सतर्क (Administration Alert On Lumpy Skin Disease Outbreak) झाले आहे. संबंधित जिल्ह्यातील ५९ तालुक्यांतील १४३५ जनावरांना लम्पीने ग्रासले (Lumpy Infected Animal) असून, राज्यात आतापर्यंत २५ जनावरांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या वाढू नये यासाठी संबंधित जिल्ह्यातील सर्व जनावरांचे बाजार पुढचे काही काळ बंद ठेवण्याचे आदेश पशुसंवर्धन खात्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushn Vikhe Patil) यांनी अकोला येथे दिले.
त्याचबरोबर जनावरांच्या वाहतुकीस जत्रा-यात्रेतील बाजार, जनावरांचे प्रदर्शनेही बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे जनावरांची खरेदी-विक्री थांबून बाजार समित्यांमधील कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. शेतकऱ्यांची दौलत असलेल्या जनावरांना दृष्ट लागल्यासारखा लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत. कीटकांपासून गाई व म्हशीला प्रामुख्याने ‘लम्पी स्कीन’ची लागण होत आहे. त्याचा प्रसार, माश्या, गोचीड, गोमाश्यांमार्फत होतो. त्या आजारांमुळे जनावरांच्या अंगावर फोड येणे, ताप येणे, नाकातून स्राव येणे, पायांवर सूज येणे, दुधाचे प्रमाण कमी होणे, चारा खाणे, पाणी पिणे कमी होणे असे प्रकार होत आहेत. हा आजार जनावरांपासून मानवास संक्रमित होत नाही. मात्र लम्पी स्कीन हा जनावरांत वेगाने पसरत आहे.
महाराष्ट्रातील जळगाव, नगर, धुळे, अकोला, पुणे, लातूर, औरंगाबाद, बीड, सातारा, बुलडाणा, अमरावती, उस्मानाबाद, कोल्हापूर, सांगली, यवतमाळ, परभणी व सोलापूर या १७ जिल्ह्यांतील ५९ तालुक्यांतील जनावरांना हा त्वचा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. संपूर्ण राज्यात एक हजार ४३५ जनावरांना लम्पीने ग्रासले आहे. लसीकरणामुळे त्यापैकी आतापर्यंत ८९५ जनावरे बरी झाली असून, उर्वरित जनावरांवर उपचार सुरू आहेत. राज्यात २५ जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आली आहे.
आजार नियंत्रणासाठी समिती
जिल्हा आणि तालुकास्तरावर आजार नियंत्रणासाठी समितीची स्थापना करण्यात आली असून, यात जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी आणि तालुकास्तरावर तहसीलदार समितीचे अध्यक्ष आहेत. जिल्हास्तरावरील समितीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, पशुसंवर्धन उपायुक्त आणि पशुसंवर्धन अधिकारी यांचा समावेश राहणार आहे. तालुकास्तरावर गटविकास अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी, सहायक आयुक्त पशुसंवर्धन व पशू विकास अधिकारी यांचा समावेश राहणार आहे.
अकोला जिल्ह्यात बोलताना श्री. विखे म्हणाले, की देशात राजस्थान, पंजाबमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव अधिक आहे. तुलनेने महाराष्ट्रात कमी प्रमाण आहे. पण शेतकऱ्यांमध्ये भीती तयार झाली आहे. शासनाने हा विषय गांभीर्याने घेतला असून जनावरांचे लसीकरण करण्यात येत आहे. आतापर्यंत ‘लम्पी’मुळे ४३५ जनावरे बाधित झाली आहेत. ५ लाख ७१ हजार जनावरांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट असून आजवर २ लाख ८० हजार जनावरांचे लसीकरणही पूर्ण झाले. दरम्यान विखे पाटलांनी निपाणा येथे बाधित जनावरांची पाहणी करीत शेतकऱ्यांसोबत चर्चाही केली. तसेच आजवर केलेल्या कामांची माहिती जाणून घेतली.
‘लम्पी स्कीन’ नियंत्रणात ः विखे पाटील
अकोला ः राज्यात ‘लम्पी स्कीन’चा १७ जिल्ह्यांत प्रादुर्भाव आढळून आला आहे. आजवर लम्पीसदृश आजाराने ३४ जनावरे दगावली असून, त्यांच्या मृत्यूचे विश्लेषण होत आहे. ‘लम्पी स्कीन’चा प्रादुर्भाव रोखण्यात राज्याला यश आले. वाढता प्रादुर्भाव पाहता उपाययोजनेचे आदेश दिल्याची माहिती पशुसंवर्धन खात्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. अकोला जिल्ह्यात गुरुवारी (ता. ८) त्यांनी आढावा बैठक घेतली. त्या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पशुसंवर्धन आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह, जिल्हाधिकारी निमा अरोरा, आमदार हरीश पिंपळे, प्रकाश भारसाकळे उपस्थित होते.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.