पावसाळा (monsoon) सुरु होण्याआधी जनावरांचे विविध घातक आजारांपासून संरक्षण करण्यासाठी त्यांचे प्रतिबंधात्मक लसीकरण (vaccination) करून घेणे गरजेचे ठरते. जनावरांना कोणत्याही रोगाची बाधा झाल्यांनतर त्यांच्या उत्पादनक्षमतेवर (productivity) विपरीत परिणाम झालेला दिसून येतो. जीवघेण्या रोगांपासून बचाव करण्यासाठी जनावरांचे वेळेत लसीकरण गरजेचे आहे.
पावसाळ्यापूर्वी मोठ्या जनावरांमध्ये घटसर्प, फऱ्या, फाशी आणि सांसर्गिक गर्भपात या रोगाविरुद्ध तर शेळ्या – मेंढ्यामध्ये पीपीआर, आंत्रविषार, देवी आणि घटसर्पविरुद्ध लसीकरण करणे गरजेचे ठरते. लसीकरण नेहमी रोगाची साथ येण्याआधीच करावे. कारण लस टोचल्यानंतर जनावरांच्या शरीरात रोगप्रतिकारशक्ती तयार होण्यास १५ दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे रोगाची बाधा झाल्यानंतर किंवा साथ आल्यानंतर लसीकरण करणे फायद्याचे ठरत नाही.
पण लसीकरण करण्याआधी सर्व जनावरांना एक आठवडा आधी जंतनिर्मूलनाचे औषध दिले पाहिजे. यासोबतच जनावरांच्या शरीरावरील तसेच गोठ्यातील गोचीड, गोमाशी यांचाही बंदोबस्त करावा. जनावरांना आहारातून क्षार-मिश्रणांचा व जीवनसत्त्वाचा पुरवठा करावा. यामुळे जनावरांना टोचलेल्या लसीतून चांगल्या प्रकारची रोगप्रतिबंधक शक्ती निर्माण होऊन योग्य परिणाम दिसून येतो.
लसीकरणासाठी नेहमी नामांकित कंपनीची लस निवडावी. कारण या लसीवर योग्य संशोधन आणि चाचण्या झालेल्या असतात. लस योग्य तापमानात म्हणजे कोल्ड चेनमध्ये ठेवूनच लसीकरण करणे गरजेचे आहे. जनावरांना लागणाऱ्या बहुतांश लसी या नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात उपलब्ध असतात. काही कारणामुळे लस उपलब्ध नसल्यास पशुवैद्यकाच्या सल्ल्याने बाजारातून उपलब्ध करून घ्यावी.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.