Animal Husbandry : जनावरांना का द्यावे लागते पुरेसे पाणी?

Animal Care : पाणी चाऱ्याला कोठी पोटात भिजवून किण्वन प्रक्रियेस मदत करते. चाऱ्याचे योग्य पचन होण्यासाठी गरज असलेली लाळ आणि पाचक द्रव्येसुद्धा पाण्यापासून बनलेली असतात. पाणी कमी पडल्यास पचन क्रिया मंदावते आणि दुग्धोत्पादन घटते. हे लक्षात घेता जनावरांना पुरेसे पाणी पाजावे.
animal drinking water
animal drinking water Agrowon

Animal Water Management : जनावरांचे शरीर ७० ते ८० टक्के पाण्याने बनलेले असते. पाणी चाऱ्याला कोठी पोटात भिजवून किण्वन प्रक्रियेस मदत करते. चाऱ्याचे योग्य पचन होण्यासाठी गरज असलेली लाळ आणि पाचक द्रव्येसुद्धा पाण्यापासून बनलेली असतात.

चाऱ्यातील घटक विरघळून ते रक्तामार्फत शरीरभर पोचविण्याचे आणि चाऱ्यातील न पचलेला भाग आतड्यातून बाहेर नेण्यासाठी पाणी मदत करते. पाणी कमी पडल्यास पचन क्रिया मंदावते आणि दुग्धोत्पादन घटते.

१) दूध तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवश्यकता असते. दुधात ८० ते ८५ टक्के पाणी असते. घामामार्फत आणि रक्ताभिसरण करून शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते.

२) शरीरातील विविध रासायनिक क्रिया पार पाडण्यासाठी तसेच शरीरातील टाकाऊ पदार्थ लघवी वाटे बाहेर काढण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते.

३) जनावरांना सुका चारा खाल्यावर, दूध दिल्यावर आणि तहान लागेल तेव्हा पाण्याची गरज असते. सर्वसाधारणपणे पशुपालक दोन किंवा तीन वेळा जनावरांना पाणी पाजतात.

त्यामुळे जनावराला तहान लागेल तेव्हा पाणी उपलब्ध होत नाही तसेच अनेक वेळा जनावरे गरज नसताना सुद्धा सवय म्हणून मालकाने पाणी ठेवल्यावर अधिक पाणी पितात. या दोन्ही गोष्टींचा परिणाम चाऱ्याच्या पचनावर होतो, त्यामुळे दूध उत्पादन मोठ्या प्रमाणावर घट येते.

animal drinking water
Animal Care : विदर्भ-मराठवाड्यातील जनावरांना लागणार कॉलर

४) मुक्त संचार गोठा पद्धतीत जनावरे तहान लागल्यावर पाणी पिऊ शकतात, याचा फायदा एक ते दीड लिटर प्रति जनावर दूध उत्पादन वाढीवर झालेला पाहावयास मिळतो.

ज्यांच्याकडे मुक्त संचार गोठा नाही ते पशुपालक बादलीला फ्लोट व्हॉल्व्ह बसवून कमी खर्चात, बांधलेल्या जनावरांना सुद्धा २४ तास पाणी उपलब्ध करून देऊ शकतात किंवा सकाळी व संध्याकाळी चारा खाऊन झाल्यावर गव्हाणी स्वच्छ करून त्यात पाणी भरून ठेवून सुद्धा जनावरांना तहान लागेल तेव्हा पाणी पिण्यास उपलब्ध करून देता येईल.

५) स्वच्छ व पिण्यायोग्य पाणीपुरवठा करण्यासाठी पाण्याचा हौद किंवा टाकी पंधरा दिवसांतून एकदा संपूर्ण कोरडी करून त्याला आतून चुना लावावा. त्यामुळे त्यात शेवाळ वाढणार नाही तसेच पाणी थंड राहून त्यातून कॅल्शिअमचा थोडा पुरवठा होईल.

६) गढूळ पाणी स्वच्छ करण्यासाठी पाण्यात तुरटी फिरवणे सारखा सोपा उपाय करू शकतो. बाजारात पाणी स्वच्छ करण्यासाठी सॅनिटायझर टॅबलेट ही उपलब्ध आहेत.

७) जनावरांच्या ओल्या चाऱ्यात ६५ ते ८५ टक्के पाण्याचे प्रमाण असते. त्यामुळे जनावरांनी ओला चारा जास्त प्रमाणात खाल्ला तर ते कमी पाणी पितात. तर सुका चारा जास्त प्रमाणात खाल्ला तर जास्त पाणी पाजले पाहिजे.

८) नवीन आणलेली जनावरे पाण्यातील बदलामुळे कमी पाणी पितात. अशावेळी पाण्यात थोडा गूळ टाकून पाणी पाजावे.

९) दुभत्या जनावरांना पाणी दिवसातून दोनदा देण्यापेक्षा चार वेळा दिल्यास जनावरे १५ ते २० टक्के जास्त दूध देतात.

१०) उन्हाळ्यात जनावरांना मुबलक व योग्य तापमानाचे पाणी मिळेल याची काळजी घ्यावी. दूध देणाऱ्या गाईंना एक वेळ जरी कमी पाणी मिळाले, तरी त्यांचे २० टक्के दूध कमी होऊ शकते.

११) जनावरांनी जर हिरवा चारा (६५ ते ८५ टक्के पाण्याचा अंश) खाल्ला, तर ते पाणी कमी प्रमाणात पितात; मात्र उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्याची मात्रा कमी असते, त्यामुळे ते सुका / वाळलेला चारा जास्त खातात. त्यामुळे त्यांना उन्हाळ्यात जास्त पाणी पाजावे.

१२) नवीन आणलेली जनावरे शक्‍यतो पाण्यातील बदलामुळे पाणी कमी पितात. अशा वेळी पाण्यात थोडा गूळ टाकून पाणी पाजावे.

१३) जनावरांचा प्रकार- सर्वसाधारण पाण्याची गरज शरीर आकारमानाच्या समप्रमाणात असते. म्हशीच्या तुलनेत गायी, शेळ्या, मेंढ्या, उंट, वराह यांना पिण्यासाठी पाणी कमी लागते.

१४) भारतीय गाईच्या कातडीची जाडी अधिक असल्यामुळे कातडीमधून बाष्पीभवनाद्वारे होणारी पाण्याची उलाढाल कमी होते. त्यामुळे विदेशी संकरित गायीपेक्षा भारतीय गायीला पिण्यासाठी पाणी कमी लागते.

१५) गाभण व दुभत्या जनावरांपेक्षा लहान वयातील वासरांना पिण्यासाठी पाण्याची आवश्यकता अधिक असते. परंतु दुधावर जोपासलेल्या वासराच्या आहारात दुधाचा वापर अधिक असल्यामुळे वासरे पाणी कमी पितात.

१६) भाकड गायी, म्हशी, कामाच्या बैलापेक्षा लहान वयातील वासरे, गाभण व दुभत्या गायीला अधिक पाणी लागते.

१७) पिण्यासाठी लागणाऱ्या पाण्याची गरज वातावरणातील तापमानाच्या समप्रमाणात वाढते. कारण बाष्पीभवनाद्वारे शरीरातून वाया जाणाऱ्या पाण्याच्या प्रमाणात वाढ होते. उदा. प्रति चौरस मीटर कातडीमधून २७ ते ४० सेल्सिअस तापमानाला प्रत्येक तासात अनुक्रमे २३ ते ४० मिलि पाणी बाष्पीभवनाद्वारे कातडीमधून शरीराबाहेर टाकले जाते. त्यामुळे हिवाळ्यापेक्षा उन्हाळ्यात जनावरांना दुप्पट पाणी लागते.

१८) मुक्त व्यवस्थापनातील वाढत्या शारीरिक हालचालींमुळे बंदिस्त व्यवस्थापनामध्ये जोपासलेल्या जनावरांपेक्षा दीडपट अधिक पाण्याची आवश्यकता असते. एक किलो शुष्क चाऱ्याचे पचन करण्यासाठी ३ ते ५ लिटर पाण्याची आवश्यकता असते.

१९) युरिया / अमोनियाची विषबाधा टाळण्यासाठी प्रथिनांचे प्रमाण अधिक असलेल्या आहारावर जोपासलेल्या जनावरांना अधिक पाण्याची गरज असते.आहाराचा प्रकार स्निग्धांशाचे प्रमाण अधिक असलेल्या आहारावर जोपासलेल्या जनावरांना अधिक पाणी लागते.

२०) विषारी घटक लघवीद्वारे शरीराबाहेर टाकण्यासाठी आणि विषबाधेपासून संरक्षणासाठी, विषारी घटकांचे प्रमाण अधिक असलेल्या आहारासोबत वाढीव पाण्याची आवश्यकता असते.

२१) पूरक खाद्यपदार्थ खुराकामध्ये मीठ, क्षारमिश्रण, युरिया, गूळ, प्रथिने, औषधी घटक व संप्रेरकाच्या वापरामुळे पिण्याच्या पाण्याची गरज वाढते. पाणी अधिक प्यावेसे वाटते.

२२) दूध उत्पादन दुभत्या जनावरांना दूध उत्पादनाच्या २ ते ३ पट अधिक पाण्याची गरज असते.

२३) आतड्यातील कृमी, जंत, आहारामध्ये रेचकाचा वापर तसेच पचन संस्थेच्या विकाराने आजारी असलेल्या जनावरांना अधिक पाण्याची गरज असते.

animal drinking water
Animal Water Management : पाण्याच्या गुणवत्तेचा जनावरावर काय परिणाम होतो?

पाण्याच्या कमतरतेचे परिणाम

१) शरीरामध्ये चार ते पाच टक्के पाणी कमी असेल तर जनावरांना अशक्तपणा जाणवतो. भूक मंदावते आणि पंधरा टक्क्यांपेक्षा पाणी कमी झाले जनावरांचा मृत्यू ओढवतो.

पाण्याच्या वाढत्या वापराचे परिणाम

१) आहार क्षमता कमी होते, पातळ हगवण लागण्याची शक्यता अधिक

२) अन्नद्रव्यांची पाचकता कमी होते; परंतु तंतुमय पदार्थाची पाचकता वाढते.

३) वारंवार लघवी होते. रक्तातील युरियाच्या प्रमाणात घट होते.

प्रतिबंधक उपाय :

१) चाऱ्यातील ओलाव्याचे प्रमाण कमी करावे.

२) आहारामध्ये हिरव्याऐवजी वाळलेल्या चाऱ्याचे प्रमाण वाढवावे.

३) चारा, वैरण, खुराक देण्यापूर्वी सकाळी पाणी पाजू नये.

४) वाळलेला चारा खाल्ल्यानंतर विश्रांतीपूर्वी पाणी पाजावे.

५) तातडीचा उपाय म्हणून थंड पाणी द्यावी.

संपर्क - डॉ. सी. व्ही. धांडोरे, ९३७३५४८४९४, (पशुधन विकास अधिकारी वर्ग-१, सांगोला, जि. सोलापूर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com