शेततळ्यात पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या पाण्याबरोबर खेकडे, वाम, बेडूक यांसारखे भक्षक प्राणी प्रवेश करणार नाहीत याची व्यवस्था करावी. शेततळ्यात खाद्य व्यवस्थापनासाठी सुविधा करावी. पाणी काढल्यानंतर माशांची काढणी करण्यासाठी तळ्यात (विशेषतः प्लॅस्टिक अस्तर टाकलेल्या) सहज चढ-उतार करण्यासाठी पायऱ्यांची सोय करावी. सर्वसाधारणपणे मातीच्या तलावात माशांची विष्ठा, शिल्लक खाद्य यासारख्या सेंद्रिय पदार्थांचे मातीतील जिवाणूंमुळे सहज विघटन होते. मात्र प्लॅस्टिक अस्तर टाकलेल्या तलावात असे होत नाही. यामुळे या तळ्यातील पाणी लवकर खराब होते. तसेच प्लॅस्टिक अस्तर, लहान आकार इ. कारणांमुळे शेततळ्यातील पाण्याचे गुणधर्मही (उदा. तापमान, सामू इ.) सतत बदलत असतात. याशिवाय डिसेंबर-जानेवारीनंतर शेततळ्यांतील पाण्याची पातळी कमी होत जाते. उन्हाळा सुरू होताना तापमान वाढते. साठवणूक केलेल्या माशांची वाढ झालेली असल्याने, खाद्य जास्त प्रमाणात द्यावे लागते. त्या अनुषंगाने माशांची विष्ठा, शिल्लक खाद्य यांचे प्रमाणही वाढते. त्यामुळे शेततळ्यातील पाण्याची प्रत मोठ्या प्रमाणावर खराब होण्याची शक्यता असते. अशावेळी शेततळ्यातील पाणी शेतीला देणे, शेततळ्यात नवीन पाणी भरणे आवश्यक ठरते. सर्वसाधारणपणे शेततळ्याची खोली दोन ते तीन मीटर असते. या अनुषंगाने माशांची काढणी करण्यासाठी पुरेशा उंचीची (किमान पाच मीटर) ओढजाळी असावी. पावसाळ्यात शेततळी भरून वाहतात. अशा वेळी ओव्हरफ्लोमधून साठवणूक केलेले मासे वाहून जाणार नाहीत, यासाठी योग्य काळजी घ्यावी, तसेच जनावरे शेततळ्यात जाऊन प्लॅस्टिक कागद फाटणार नाही, याची काळजी घ्यावी. भारतीय प्रमुख कार्प मासे ः कटला, रहू, मृगळ या तीन मत्स्य जातींना भारतीय प्रमुख कार्प मासे म्हणतात. झपाट्याने होणारी वाढ व आकाराने खूप मोठे होत असल्याने मत्स्यशेतीकरिता या जाती फायद्याच्या ठरतात.
चिनी कार्प : चंदेरा व गवत्या हे चांगले उत्पादन देणारे मासे आहेत.
भारतीय प्रमुख कार्प मासे हे परंपरागतरीत्या नैसर्गिक तळी व कृत्रिम तलावामध्ये वाढविले जातात. नैसर्गिक अन्न आणि जागेसाठी या तीन जातींची पूरकता असल्याने त्यांचे तलावामध्ये एकत्रित संवर्धन केले जाते. मिश्र मत्स्यशेतीमध्ये कटला पाण्याच्या पृष्ठभागाजवळ असलेल्या प्राणी प्लवंगांचा अन्न म्हणून वापर करतो. रहू मधल्या थरातील अन्न खातो, तसेच मृगळ तळाशी असलेले अन्न खातो. चांगली वाढ आणि उत्तम मागणी असल्यामुळे मिश्र मत्स्यशेती फायदेशीर ठरते. - ०२३५२-२३२२४१ मत्स्य महाविद्यालय, रत्नागिरी.