जनावरांना का देऊ नये कोवळी ज्वारी?

जनावरांच्या आहारात कोवळ्या ज्वारीचा समावेश जास्त प्रमाणात झाल्यास जनावरांना विषबाधा होते. उन्हाळ्यात जनावरांमध्ये विषबाधा होण्याचे प्रमाण जास्त असते.
कोवळी ज्वारी जनावरांच्या आहारात येणार नाही,याची काळजी घ्यावी.
कोवळी ज्वारी जनावरांच्या आहारात येणार नाही,याची काळजी घ्यावी.

जनावरांमध्ये विविध कारणांमुळे अनेक प्रकारची विषबाधा (toxicity) दिसून येते. उन्हाळ्यात जनावरांमध्ये विषबाधा होण्याचं प्रमाण काहीसे जास्त असते. कारण, उन्हाळ्यात (summer season) हिरव्या चाऱ्याची (green fodder) टंचाई भासत असते. त्यामुळे उन्हाळ्यात जनावरांना चरायला सोडल्यानंतर दिसेल ते हिरवे गवत जनावरे खाऊ लागतात.

उन्हाळ्यात जनावरांमध्ये ज्वारीची विषबाधा मोठ्या प्रमाणात दिसून येते. पण ज्वारीची विषबाधा नेमकी कशी होते? तर ज्वारीचे पिक लहान अवस्थेत म्हणजे कोवळे असताना खाल्ल्यास ही विषबाधा होत असते. यालाच किराळ लागणे असे देखील म्हणतात. ज्वारीच्या कोवळ्या पोंग्यामध्ये धुरीन नावाचा विषारी घटक असतो. हा घटक जनावरांच्या पोटात गेल्यानंतर धुरीनपासून हायड्रोसायनिक ॲसिड तयार होते. या हायड्रोसायनिक ॲसिडमुळे जनावरांना विषबाधा होत असते.

ज्वारीचे कोवळे पोंगे कमी प्रमाणात खाल्ले असल्यास या विषबाधेची तीव्रता कमी असते. यात जनावर अस्वस्थ होऊन, पोट दुखायला सुरुवात होते. जनावरांना श्वसनास त्रास होतो. हृदयाचे ठोके वाढतात. जनावर थरथर कापायला, बेशुद्ध पडते यांसारखी लक्षणे दिसू लागतात. या अवस्थेत वेळेत उपचार मिळाल्यास जनावर वाचू शकते.

काही पशुपालकांना आपल्या जनावरांना विषबाधा झालीय हेच लक्षात येत नाही. किंवा लक्षात येईपर्यंत बराच वेळ निघून गेलेला असतो. मग आपले पशुपालक घाबरून जातात. पण अशा वेळी घाबरून न जाता, त्वरित तुमच्या जवळच्या पशुवैद्यकाशी संपर्क साधला पाहिजे. विषबाधेमध्ये जनावरांचे पोट फुगते, त्यामुळे सर्वप्रथम पोटातील हवा बाहेर काढावी. यावर त्वरित उपचार म्हणून पशुवैद्यकाच्या सल्ल्याने चार लिटर व्हिनेगर वीस लिटर पाण्यात मिक्स करून द्यावं. इतर औषधेही पशुवैद्यकामार्फत द्यावीत.

ज्वारीची विषबाधा ही ज्वारी कोवळी म्हणजे दीड ते दोन महिन्याची असताना होत असते. त्यामुळे जनावरांना ज्वारी देत असताना ती फुलोऱ्याच्या अवस्थेत आल्याशिवाय देऊ नये.
जनावरे ज्वारीचे कोवळे पोंगे खाणार नाहीत याकडे विशेष लक्ष द्यावं. ज्वारीचे पीक लहान अवस्थेत वाया गेल्यास असे पोंगे उन्हात वाळल्यानंतरच जनावरांच्या खाद्यामध्ये द्यावेत. कारण वाळल्यानंतर त्यामधील विषारी घटकांचे प्रमाण कमी होत असते. ज्वारीचे पीक कापून काढल्यानंतर काही शेतकरी ज्वारीच्या शेतात पाणी सोडतात त्यामुळे पुन्हा ज्वारीचे पोंगे तयार होतात. अशा शेतामध्ये आपली जनावरे चरण्यासाठी सोडू नयेत.


Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com