कोलकता: वीरभूम जिल्ह्यातील ८ जणांना जिवंत जाळल्याच्या प्रकरणाने संपूर्ण देशात खळबळ उडालेली असताना आज दोन ठिकाणी तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्यांवर प्राणघातक हल्ले झाले. नादिया जिल्ह्यात एका तृणमूल कॉंग्रेस नेत्या असलेल्या महिलेच्या पतीवर गोळीबार करण्यात आला तर हुगळी जिल्ह्यात दुचाकीवरून जाणाऱ्या तृणमूल कॉंग्रेसच्या महिला नगरसेवकाला अज्ञात वाहनाने उडवले. दोघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.
वीरभूम जिल्ह्यातील रामपूरहाट येथे मंगळवारी घरांना आगी लावल्याने आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला. तृणमूल कॉंग्रेसचे नेते बहादूर शेख यांची हत्या झाल्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात घरे पेटवून देण्यात आली. या घटनेचे संपूर्ण राज्यात पडसाद उमटलेले असताना गेल्या चोवीस तासात दोन वेगवेगळ्या घटनेत तृणमूल कॉंग्रेसच्या(Trinamool Congress) नेत्यांवर प्राणघातक हल्ले करण्यात आले. हुगळी जिल्ह्यात तारकेश्वर भागात नवनिर्वाचित नगरसेवक रुपा सरकार यांना अज्ञात मोटारीने जोरात धडक दिली. त्यांना दवाखान्यात दाखल केले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. ही घटना काल रात्री घडली. त्या दुचाकीवरून घरी येत असताना एका मारुती व्हॅनने त्यांना धडक केली. या घटनेचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दुसऱ्या घटनेत नादिया जिल्हयात एका स्थानिक तृणमूल नेत्यावर गोळीबार झाला. सहदेव मंडल असे त्यांचे नाव असून बगुला ग्रामपंचायत सदस्या अनिमा मंडल यांचे ते पती आहेत. जखमी मंडल यांना बगुला आरोग्य केंद्रात नेण्यात आले. परंतु त्यांची तब्येत ढासळल्याने त्यांना शक्तीनगर रुग्णालयात पाठवण्यात आले. नवनिर्वाचित नगरसेवकांवर यापूर्वी हल्ले झाले आहेत.
रामपूरहाट पीडितांना प्रत्येकी सहा लाख
रामपूरहाट हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या आठ जणांच्या कुटुंबातील प्रत्येकी एका व्यक्तीस राज्य सरकारकडून नोकरी देण्याची घोषणा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी(Mamata Banerjee) यांनी केली. याशिवाय प्रत्येक कुटुंबाला प्रत्येकी सहा लाख रुपये देण्याचे देखील जाहीर केले. या प्रकरणात प्रशासनाने निष्काळजीपणा दाखवल्याचे त्यांनी मान्य केले. ममता बॅनर्जी यांनी आज रामपूरहाटच्या बोगतुई गावाचा दौरा केला आणि पीडित कुटुंबाची भेट घेतली. ड वर्गातील नोकरी, पाच लाख रुपये घरखर्च करण्यासाठी आणि घराची दुरुस्ती करण्यासाठी प्रत्येकी एक लाख असे सहा लाख रुपये देण्याचे आश्वासन ममतांनी पीडित कुटुंबांना दिले. यावेळी त्यांनी जखमींची विचारपूस केली. जखमींवर आणखी चांगले उपचार करण्यासाठी कोलकता येथून डॉक्टरांची टीम पाठवली जाईल, अशी माहिती ममता बॅनर्जी यांनी दिली.