पावसाच्या स्थितीवर कापसाचे भवितव्य अवलंबून

उत्तर भारतात कापसाची लवकर लागवड होत असल्याने आवक लवकर सुरू होते. तिथे काही बाजारपेठांमध्ये मुहूर्ताचे सौदे ४५०० रुपये प्रति मन या भावाने निघाले आहेत. परंतु आवक वाढण्यासाठी अजून एक महिना वाट पाहावी लागणार आहे.
अॅग्रोवनी
अॅग्रोवनी

देशात यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत कापूस लागवडीत १७ टक्के वाढ झाली आहे. कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशात यंदा १० ऑगस्टपर्यंत ११७ लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ९९ लाख हेक्टरवर लागवड झाली होती. जूलै महिन्यापासून लागवड क्षेत्रात वाढ झाल्याचे अंदाज जाहीर होऊ लागले. तेव्हापासूनच यंदा देशात ३९० ते ४०० लाख गाठी कापूस उत्पादन होण्याचे अंदाज बाजारात येऊ लागले. परंतु जुलैच्या अखेरीस गुजरात आणि राजस्थानच्या काही भागांत पूरस्थिती, तर उत्तर भारत, महाराष्ट्र आणि तेलंगणातील काही भागांत कापसाच्या पिकावर पांढरी माशी आणि गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे कापूस उत्पादनाचा अंदाज ३७५ ते ३८० लाख गाठींपर्यंत खाली उतरला. ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात महाराष्ट्र आणि कर्नाटकातील काही भागांत पावसाने ताण दिल्यामुळे दुष्काळी स्थिती उद्भवली. त्याच्या बातम्या येऊ लागताच तथाकथित विश्लेषक आणि स्वयंघोषित तज्ज्ञांनी कापूस उत्पादनाचा आकडा ३६० ते ३७५ लाख गाठींपर्यंत खाली आणला. गंमत म्हणजे अजून काही ठिकाणी लागवड सुरूच आहे, तरीही उत्पादनाचा आकडा काय राहील, यावर चर्चा सुरू आहे.  `कॉटनगुरू`ने गेल्या नऊ वर्षांतील कापसाचे लागवड क्षेत्र आणि उत्पादन या आकडेवारीचा अभ्यास केला असता लागवड क्षेत्रात वाढ होऊनही देशातील कापूस उत्पादन वाढत नसल्याचे आढळून येते. त्यामुळेच केवळ लागवडीखालचे क्षेत्र वाढले हा एकच निकष लावून उत्पादनात वाढ होणार, असा अंदाज वर्तविणे योग्य नाही.  वरील तक्त्यावरून स्पष्ट होते की पिकाची उत्पादकता (प्रति हेक्टरी उत्पादन) हा घटक महत्त्वपूर्ण ठरतो. उदाहरणार्थ २०१२-१३ आणि २०१५-१६ या वर्षांमध्ये कापूस लागवडीचे क्षेत्र जवळपास सारखेच असताना उत्पादनात मात्र २२ लाख गाठींचा फरक आहे. तर २०१६-१७ मध्ये आधीच्या वर्षीच्या तुलनेत कापूस लागवडीत १२ टक्के घट होऊनसुद्धा उत्पादनात मात्र वाढ झाली आहे. या सगळ्यांचा विचार करता चालू हंगामात (२०१७-१८) जोपर्यंत पिकांच्या स्थितीचा पूर्ण अंदाज येत नाही, तोपर्यंत एकूण उत्पादन किती राहणार याची चर्चा करणे निष्फळ ठरणार आहे. उलट अशा प्रकारच्या उलट-सुलट चर्चेमुळे बाजारात चुकीचा संदेश जातो आणि संभ्रमाची स्थिती निर्माण होते. शेतकरी, सूतमिल, कापड उद्योग या सगळ्या घटकांवर त्याचे वाईट परिणाम होतात. 

उत्तर भारतात मुहूर्ताचे सौदे उत्तर भारतात कापसाची लवकर लागवड होत असल्याने आवक लवकर सुरू होते. तिथे काही बाजारपेठांमध्ये मुहूर्ताचे सौदे ४५०० रुपये प्रति मन या भावाने निघाले आहेत. परंतु आवक वाढण्यासाठी अजून एक महिना वाट पाहावी लागणार आहे. हजर बाजारात गुजरात एस-६ चा भाव ४२,५०० ते ४३,२०० रुपये चालू आहे. तर महाराष्ट्रात बन्नीचा दर ४३,००० ते ४३,५०० रुपये, तेलंगणात ४३,३०० रुपये इतका आहे.  जागतिक बाजारपेठेत कापसाचा बाजार नरमच आहे. अमेरिकी कृषी विभागाने (यूएसडीए) गेल्या आठवड्यात कापसाच्या वाढीव उत्पादनाचा अंदाज दिला होता, त्याचा बाजारावर अजूनही परिणाम जाणवतो. पाकिस्तान सरकारने २०१७-१८ या हंगामासाठी १४० लाख गाठी कापूस उत्पादनाच्या अंदाज पूर्वी व्यक्त केला होता. त्यात आता कपात करून १२६ लाख गाठी कापूस उत्पादन होईल, असा सुधारित अंदाज दिला आहे.  थोडक्यात पावसाची स्थिती, लागवडीचे क्षेत्र आणि पिकाची स्थिती यातील संघर्षावर कापसाचे किती उत्पादन येणार या प्रश्नाचे उत्तर दडले आहे. सगळ्या गोष्टींचा मेळ बसला तर २०१७-१८ या हंगामात कापसाचे विक्रमी उत्पादन होईल, हा अंदाज खरा ठरू शकेल.   

हंगाम लागवड (लाख हेक्टर) उत्पादन (लाख गाठी) उत्पादकता (किलो/हेक्टर)
२०१०-११ १११.४२ ३३९ ५१७ 
२०११-१२  १२१.७८ ३६७ ५१२ 
२०१२-१३ ११९.७८  ३७० ५२५ 
२०१३-१४ ११९.६० ३९८ ५६६
२०१४-१५ १२८.४६ ३८६ ५११ 
२०१५-१६  ११८.७७ ३३८ ३३८
२०१६-१७ १०५  ३५१ ५६८ 

- मनीष डागा (लेखक कापूस बाजार विश्लेषक  असून `कॉटन गुरू`चे प्रमुख आहेत.)  Website : www.cottonguru.org

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com