वऱ्हाडात सोयाबीन बियाणेप्रश्नी आंदोलने

अकोला ः यंदाच्या हंगामात वऱ्हाडातील अनेक गावांमधील शिवारांत सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी येत असून, नुकसान भरपाईसाठी आंदोलने केली जात आहेत.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात आंदोलन करताना रविकांत तुपकर
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात आंदोलन करताना रविकांत तुपकर

अकोला  ः यंदाच्या हंगामात वऱ्हाडातील अनेक गावांमधील शिवारांत सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी येत असून, नुकसान भरपाईसाठी आंदोलने केली जात आहेत. सोमवारी (ता.२९) बुलडाण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी कार्यकर्त्यांसह जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या कक्षात ठिय्या आंदोलन केले, तर अकोला जिल्ह्यात बाळापूर तालुक्यात एक शेतकरी पाण्याच्या टाकीवर चढला. शेतकरी संघटनेने या प्रकरणी कायदेशीर लढाई उभारण्याची तयारी केली असून शेतकऱ्यांनी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.

या हंगामात जूनच्या दुसऱ्या आठवड्यात खरीप पेरण्यांना सुरुवात झाली. काही ठिकाणी पेरण्यांवर जोरदार पाऊस झाला तर काही ठिकाणी पावसात खंड पडला. तसेच काही कंपन्यांच्या बियाण्याची उगवण क्षमताच कमी होती. या कारणांमुळे सोयाबीन पिकाची उगवण जेमतेम झाल्याने शेतकऱ्यांना पेरणी मोडावी लागली. हा खर्च पाहता शेतकऱ्यांकडून शेकडोंच्या संख्येत तक्रारी आलेल्या आहेत. प्रामुख्याने खाजगी बियाणे कंपन्यांकडून नुकसान भरपाई कशी मिळेल, याबाबत शेतकऱ्यांमध्ये साशंकता आहे. कंपन्यांकडून शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहे. यामुळे रोष वाढला आहे.

बुलडाणा जिल्ह्यात सुमारे साडेपाचशे हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीन बियाणे उगवलेले नसल्याच्या तक्रारी आतापर्यंत आल्या आहेत. ही संख्या दररोज वाढत आहे. कृषी विभागाकडून गावोगावी पाहणी केली जात असली तरी मदतीबाबत अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. यामुळे शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी करीत रविकांत तुपकर यांनी सोमवारी दुपारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक यांच्या कक्षात ठिय्या आंदोलन सुरू केले. संध्याकाळपर्यंत हे  आंदोलन सुरुच होते.

बाळापूर तालुक्यातील टाकळी येथील महादेव नाजूकराव वानखडे या शेतकऱ्याने नुकसान भरपाईसाठी थेट गावातील पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले. प्रशासनाने ताबडतोब बियाणे द्यावे अशी मागणी कृषी विभागाकडे करीत त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता; परंतु मागणी पूर्ण न झाल्याने त्यांनी पाणीपुरवठा योजनेच्या टाकीवर चढून आंदोलन केले. 

शेतकरी संघटना करणार न्यायालयीन लढ्यासाठी मदत  या हंगामात महाबीजसह विविध कंपन्यांचे सोयाबीन बियाणे उगवले नाही. ज्यांचे बियाणे उगवले नसेल अशा शेतकऱ्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन शेतकरी संघटनेने केले आहे. या कंपन्यांविरुद्ध ग्राहक मंचामध्ये जायचे असल्यास त्यासाठी  ॲड.सतीश बोरूडकर हे शेतकरी संघटनेच्या माध्यमातून मार्गदर्शन करतील. तसेच सर्व तांत्रिक बाजूची माहिती देण्यात येईल. यासाठी शेतकऱ्यांनी लक्ष्मीकांत कौठकर यांच्याशी (अध्यक्ष, माहिती व तंत्रज्ञान आघाडी, शेतकरी संघटना, अकोला) ९६२३६०३७९९ या मोबाईक क्रमांकावर किंवा  lkauthakar@gmail. com या ईमेलद्वारे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com