जालन्यात पाच हजार टन खते एकाच दिवशी मिळणार बांधावर

जालना : जिल्ह्यात एकाच दिवशी पाच हजार मेट्रिक टन रासायनिक खते शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचवण्याचा उपक्रम उद्या (ता. ४) राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी दिली.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

जालना  : जिल्ह्यात एकाच दिवशी पाच हजार मेट्रिक टन रासायनिक खते शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचवण्याचा उपक्रम उद्या (ता. ४) राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी दिली.

श्री शिंदे म्हणाले, कृषी आयुक्तालयाच्या परिपत्रकानुसार ‘कोरोना’चा धोका टाळण्यासाठी शेतकरी गटांमार्फत गटातील शेतकऱ्यांना शेताच्या बांधावर रासायनिक खते व बियाणे उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार ३० मेपर्यंत जिल्ह्यात ६३०७.२८ टन रासायनिक खते शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचविण्यात आले आहे. हा उपक्रम अधिक गतिमान करण्यासाठी कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक यांनी गावातील शेतकरी गट शेतकरी उत्पादक कंपन्या व कृषी मित्र, कृषी ताई यांच्या मदतीने जिल्ह्यातील विविध गावांत एकाच दिवशी पाच हजार टन रासायनिक खते शेतकऱ्यांना बांधावर पोहोच करण्याचा उपक्रम हाती घेण्याचे नियोजन केले आहे.

येत्या गुरुवारी (ता.४) जिल्ह्यात हा उपक्रम राबविला जाणार आहे. या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांना बांधावर रासायनिक खत वाटपासाठी प्रति गाव पाच ते दहा टन खतपुरवठ्याचे नियोजन करण्याचे यंत्रणेला सूचित करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना रासायनिक खताची मागणी नोंदविण्यासाठी ऑनलाइन लिंक उपलब्ध करून दिली जात आहे. त्या लिंकच्या आधारे शेतकऱ्यांना आपली खतांची मागणी नोंदविता येणार आहे. युरिया खताची २२५० टनाची रॅक या मोहिमेसाठी राखून ठेवण्यात आली आहे.

या उपक्रमा अंतर्गत उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, व मंडळ कृषी अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील एका ठिकाणी रासायनिक खते वाटप करण्यासाठी उपस्थित राहणे अनिवार्य करण्यात आले आहे. जे अधिकारी सदर प्रात्यक्षिकास हजर राहणार नाही, त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात येणार आहे. ‘कोरोना’चा संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक अंतर, मास्क व सॅनिटायझरचा वापर आवश्यक असणार असल्याची माहिती श्री. शिंदे यांनी दिली.

उत्कृष्ट काम करणाऱ्यांना मिळणार बक्षीस एकाच दिवशी पाच हजार मेट्रिक टन रासायनिक खते शेतकऱ्यांना थेट बांधावर पोहोच करण्याच्या उपक्रमात उत्कृष्ट काम करणारे कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी आदींना बक्षिसेही दिली जाणार आहे. जे सर्वाधिक रासायनिक खते शेतकऱ्यांना बांधावर वाटप करतील त्यांना प्रथम क्रमांकाचे पाच हजार रुपयांची, व्दितीय क्रमांकासाठी तीन हजार रुपयांचे व तृतीय क्रमांकासाठी दोन हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. या तीन बक्षिसांव्यतिरिक्त प्रत्येकी एक हजार रुपयांची दोन प्रोत्साहनपर बक्षीसेही दिली जाणार असल्याची माहिती बाळासाहेब शिंदे यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com