शेतीमाल थेट विक्रीचा समन्वय भक्कम केला जाणार : कृषी विभाग घेणार पुढाकार 

लॉकडाउनमुळे भाजीपाला विक्रीची अडचण दूर करण्यासाठी कृषी विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करून विक्री व्यवस्था उभी केली. बहुतांश भागात शेतकरी गट, शेतकरी कंपनी व शेतकरी थेट ग्राहकांना शेतीमाल विक्री करताना दिसत आहेत. मुळात शेतकरी ते ग्राहक थेट शेतीमाल विक्री ही जुनीच संकल्पना आहे. आता आपत्तीच्या निमित्ताने ही साखळी आणि शेतकरी ते ग्राहक समन्वय अधिक दृढ होत आहे. भविष्यात ही साखळी कायम राहावी यासाठी आम्ही नियोजन करत आहोत. — सुहास दिवसे, कृषी आयुक्त.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू असल्याने भाजीपाला, फळे विक्रीसाठी कृषी विभागाने पुढाकार घेतला आहे. शेतकरी गट, कंपन्यांसह अन्य शेतकरी थेट ग्राहकांना शेतीमाल विक्रीचा प्रयत्न करीत असून त्याला प्रतिसादही चांगला मिळत आहेत. आपत्तीच्या निमित्ताने शेतकरी ते ग्राहक यांच्यातील समन्वय चांगला होत असून आगामी काळातही हा समन्वय टिकवून ठेवत तो अधिक भक्कम करण्याचा कृषी विभागाचा प्रयत्न आहे.   

कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी देशभरात लॉकडाउन करण्यात आले आहे. त्याचा भाजीपाला, फळे, व शेतीमाल विक्रीवर परिणाम झाला आहे. मात्र सध्याच्या आपत्तीच्या काळात  शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी कृषी विभागाने प्रशासनाच्या मदतीने भाजीपाला, फळे  विक्रीचे नियोजन केले आहे. त्यामुळेच अनेक शेतकरी गट, शेतकरी कंपन्या व काही शेतकरी थेट ग्राहकांना घरपोच भाजीपाला, फळांची विक्री करीत आहेत. अनेक ठिकाणी बाजार समित्या बंद आहेत. परराज्य तसेच परदेशातही निर्यातही होत नाही.

त्यामुळे नेहमीच्या तुलनेत दर काहीसे कमी मिळत असले तरी थेट ग्राहकांना शेतीमाल विक्री करता येत असल्याने शेतकऱ्यांना होणारा तोटा तितकासा नाही. शिवाय ग्राहकही रास्त दरात ताजा भाजीपाला, फळे मिळत असल्याने समाधानी आहेत. मोठ्या शहरातील वस्त्या, अपार्टमेंटमध्ये शेतकरी ते ग्राहक थेट शेतीमाल विक्रीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे दहा दिवसांत सुमारे सोळा हजार टनांपेक्षा अधिक भाजीपाला, फळे शेतकऱ्यांना विक्री करता आली. राज्यभरातील सुमारे अडीच ते तीन हजार शेतकरी गट, कंपन्यांनी सध्याच्या काळात भाजीपाला, फळे विक्रीसाठी पुढाकार घेतला आहे. राज्यात शेतमाल विक्रीबाबतची मध्यस्थांची साखळी तोडून शेतकरी ते ग्राहक थेट विक्री योजना राबवण्याचा प्रयत्न झाला. त्यातून कृषी महोत्सवासारखी संकल्पना नगर जिल्ह्यातून सर्वप्रथम उदयाला आली. मात्र अनेक वेळा प्रयत्न करुनही त्याला आत्तापर्यंत तरी फारसे यश आले नाही. आता ‘बंद’च्या निमित्ताने शेतकरी ते ग्राहक समन्वय साधला जात असून पुन्हा कृषी विभागाने हा समन्वय अधिक भक्कम करत आगामी काळातही या पद्धतीने शेतीमाल विक्री सुरु राहील यासाठी प्रयत्न करावे अशा सूचना दिल्या आहेत.

सध्या आंब्याचा हंगाम असून ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर निर्यातीला अडचण येत आहे. त्यामुळे आंबा विक्रीतही शेतकरी ते ग्राहक संकल्पना अधिक भक्कम करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. नगर जिल्ह्यात सुरु झालेली शेतकरी ते ग्राहक थेट शेतीमाल विक्री व्यवस्था ‘बंद’नंतरही सुरुच राहील, यासाठी आम्ही नियोजन करत असल्याचे नगरचे समन्वयक श्रीकांत जावळे यांनी सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com